14 September, 2025

आज गप्प बसून राहिलो तर पुढच्या पिढीला काय आपण काय देणार?

गेल्या काही दिवसांत सर्जनशील, संवेदनशील आणि सतत तर्काच्या कसोटीवर आपले विचार तपासून घेणाऱ्या लोकांच्या पोस्ट वाचल्या. पॉडकास्ट ऐकलेत. त्यात एका प्रकारची हतबलता आहे. किती दिवस हे फक्त आपण लिहीत राहणार आहोत. बोलत राहणार आहोत. याने काही फरक पडत नाहीय. अशी ती हतबलता आहे. सात्विक संताप आहे. त्यानिमित्ताने ..

विवेकी, सद्सद् बुद्धी आजही जागृत असलेल्या लोकांनी एकत्र यावं, संघटित व्हावं याची गरज दिवसेंदिवस वाढते आहे. विवेकवादी, तर्कनिष्ठ लोक तसे एकेकटेच पडतात. माझ्यासारख्या लोकांना काहीच वावगं खपवून घेता येत नाही. त्यात सगळंच येतं. माणसाच्या सार्वजनिक, कौटुंबिक, सांस्कृतिक, राजकीय बाजूतलं सर्वच. जे जे सामान्यतः लोकांना आवडतं त्यावरच प्रश्न उभे करावेत असं सतत मला वाटत असतं.  मेल्यानंतर सगळं इथेच रहाणार; त्यावरुन जिवंत असताना माणसांनी कसलेच घोळ घालू नयेत, हाणामाऱ्या, खून-अत्याचार तर अजिबात करू नये यात वेगळं सांगावं लागायला कशाला पाहिजे असं खुपदा वाटतं.

या *** राजकारणात स्थिर मानसिकतेची, खाऊन पिऊन सुखी आयुष्याची शाश्वती राहिलेली नसताना बायका का म्हणून या पाळी पुढे मागे करायच्या गोळ्या घेतात? जी बाई पहाटे उठून दोन दोन डबे करुन आठ वाजता बाहेर पडत असेल तर ती बाई चार चार दिवसांच्या स्वयंपाकाची तयारी फ्रिजमध्ये ठेवते तर ते शिळं होतं? लगेच तुमच्या घरात भुतं नाचतात??? घराबाहेरचे *** राजकारणी भुतांपेक्षा काय कमी भितीदायक आहेत का? कणीक फ्रिज मध्ये ठेवल्याने यापेक्षा अधिक धोकादायक कुठलं भुत तुमच्या घरात नाचणार आहे? हे एकच उदाहरण झालं, पण सतत अनंत कारणांवरुन कोणाच्या न कोणाच्या भावना दुखावल्या जातात...

मुळात माणसाला घरात देवाची मुर्ती असताना देऊळ हि संकल्पनाच का लागते हा खूप वर्षांपासूनचा माझा प्रश्न आहे. . यावर मी पूर्वीही लिहिले आहे. एकाने त्यावर लिहिलं होतं की पुर्वीच्या काळी चार लोकांना एकत्र यायला जागा हवी. ठीक आहे, काही मिनिटांसाठी आपण हे मान्य करुयात. पण  आजच्या काळात उत्तम कारागीर बोलावून स्थानिक पध्दतीची वास्तुशैली वापरून उत्तम सभागृह उभारावीत. एकत्र येण्यासाठी प्रार्थनास्थळच का? त्या सभागृहात सर्व धर्मातील लोकांनी एकत्र यावं. नृत्य, गायन, संगीत, चित्रकला, वाद्यवादन यांचे नियमित कार्यक्रम करावेत. नाममात्र फी घेऊन मोठमोठी मैदाने सांभाळावीत. तिथे मैदानी खेळ खेळले जावेत. झाडांची जोपासना करावी. वृक्ष म्हणुन पसरले की त्यांना छान लांब, रुंद, ऐसपैस पार बांधावेत. जुन्या वस्तूंची, पुस्तकांची कायमस्वरूपी प्रदर्शन असावीत. हे भविष्यातले स्वप्न रंजन झाले. आज जी मोठेमोठी देवळे आहेत तिथे सरसकट सर्व ठिकाणी असे दर महिन्यातून किमान एक असे बारा महिन्यांचे बारा कार्यक्रम असे कला दर्शनाला प्रोत्साहन देणारे कार्यक्रम हवेत. खरे म्हणजे लोकसंख्येचा विचार केलातर आठवड्याला एक कार्यक्रम हवा. तिथेही मोठमोठे वृक्ष पसरलेले हवेत. सार्वजनिक हळदीकुंकू हा पूर्णत: राजकीय अजेंडा आहे. सांस्कृतिक नव्हे. 

Prince of Wales Museum,  Dr. Bhau Daji Lad Museum ICSE किंवा CBSE शाळांच्या ट्रीपमध्ये समाविष्ट केलं जात का?  RBI Monetary Museum, Mumbai सर्वांसाठी खुले आहे, आणि तेही पूर्णपणे मोफत. पण ही साधी माहिती देखील किती शाळांच्या संस्थाचालकांना आहे? दरवर्षी एकाच रिसॉर्टला मुलांना नेलं जातं, पण दरवर्षी संग्रहालयांना न्यावं हा उत्साह किती शाळांमध्ये आहे? संग्रहालयं, जी खऱ्या अर्थाने ज्ञानाचं आणि अनुभवाचं दालन आहेत, त्याकडे मात्र दुर्लक्ष होतं. दरवर्षी संग्रहालयांना सहली नेणं ही शाळांची जबाबदारी आहे.

आपल्या भारताच्या परंपरा, दानधर्म, पुजा, नैवेद्य करण्याच्या चालीरीती असंख्य आहेत आणि त्या तशा आहेत म्हणुनच आज हा भारत आहे. गेल्या काही वर्षांपासून जे चालु आहे ते थोडं बाजुला ठेवुन पुर्ण सत्तर ऐंशी वर्षांचा विचार केला तर तो एकमेव निधर्मी आणि सर्वसमावेशक देश होता. भविष्यात असेल का नाही मला माहिती नाही. विविधतेने नटलेल्या या परंपरांचा मला अभिमान आहे ह्या वाक्याचा अर्थ सर्वधर्मीय, सर्वजातीय परंपराचा अभिमान असा होतो. फक्त एकाच विशिष्ठ विचारसरणीच्या चालीरीती नव्हेत. जे अस्सल ग्रामीण भारतीय सण आहेत अर्थातच सर्व धर्मांतले सण; मी महाराष्ट्रापुरतं म्हणेन... तर ते सण, त्या सणांची निर्मिती, मूळ शेतकरी, कुळ यांनी त्यांच्या नैसर्गिक ऋतू, कालचक्र त्यायोगे शेतीविषयक व अलुतेबलुतेदारीच्या कामाच्या विभागणी, सोय आणि सवडीनुसार केलेली आहे. नंतर कालौघात त्यांचं धार्मिकीकरण, व्यापारीकरण करुन व्यवसायिक आणि कर्मठ लोकांनी आर्थिक नफातोट्याची गणितं मांडून आपापलं हित जोपासलं असावं असा एक अंदाज आहे.

डॉ. श्रीराम लागू यांचा "माझं बुध्दी प्रामाण्य" नावाचा जुना लेख आहे.  ते लिहितात, "प्राण्यांमध्ये आणि माणसांमध्ये फरक कुठला असेल, तर माणसाला बुद्धिमत्ता आहे, विचारशक्ती आहे, स्मरणशक्ती आहे. तर प्राण्यात ती नाही. असं सांगतात, माणसाचा चार पंचमांश मेंदू जनावराचा आहे आणि एकपंचमांश मेंदू केवळ माणसाचा आहे. हा माणसात व प्राण्यात असलेला फरक आहे. माणूस आपली विचारशक्ती दुसऱ्या कुणाकडे गहाण टाकतो, तेव्हा तो सबंध माणूसजातीचा अपमान करतो. तो जाणूनबुजून एक बौद्धिक, मानसिक गुलामगिरी पत्करतो. ही गोष्ट फार चिंतेची आहे, असं मला वाटतं. ...  सागराला, सूर्याला नमस्कार करणं हा संस्काराचा भाग आहे. मात्र मी नमस्कार केला नाही, तर अपटीत घडेल, हा श्रद्धेचा भाग झाला. पूजेला माझा विरोध नाही, पण पूजा काही स्वार्थी भावनेनं केली जाते, त्याला माझा विरोध आहे. पूजेला विरोध करण्याचं कारण नाही. त्यामध्ये भावना कुठल्या आहेत, ते महत्त्वाचं आहे. समुद्र ही नियतीची एक शक्ती आहे. ती मला भरपूर देते. त्यावर माझं आयुष्य अवलंबून आहे. आणि असा समुद्र थोडा ओसरला आहे. उद्यापासून माझ्या बोटी मी हाकारणार आहे, तर त्याआधी हा तुला नमस्कार. हा अतिशय सुंदर संस्कार आहे. .. म्हणून पूजा करणं या प्रकाराला माझा विरोध नाही. त्यामागे भावना काय आहे हे महत्त्वाचं आहे. परमेश्वराची पूजा करतात, त्याबद्दल मला आदर आहे. मला तो व्यक्त करावासा वाटतो आणि ती कृतज्ञता व्यक्त करणं, हा सुंदर संस्कार आहे. "

दोन गुणिले दोन चार आणि दोन अधिक दोन चार हे असंच असणार आहे हा गणिताचा नियम आहे. हा नियम ब्राह्मण शिक्षकाने शिकवला म्हणुन बदलणार नाही की मुस्लिम शिक्षकाने शिकवला म्हणुन बदलणार नाहीय. पण सतत एकमेकांच्या धर्माचा, जातींचा तिरस्कार करुन, द्वेषपुर्ण वाक्यं फेसबुक, ट्विटर वर लिहुन कोणतं भविष्य साध्य करु पाहतो आहोत आपण?

आज विशी-तिशीच्या पिढीसमोर AI tools  वापरुन स्वतःला नोकरी धंद्याच्या जगात survive करायचं सर्वात मोठं आव्हान आहे. ह्यासाठी आज चाळीशी- साठीच्या पिढीतील लोकांकडे ती टुल्स वापरायची टेक्निक्स नाहीयेत पण बहुतांशी लोकांकडे विचारांचे तारतम्य आहे. हे तारतम्य कसे वापरायचे हे तरुणांना तुम्ही शिकवा. ती मुलं तुम्हाला टेक्निक्स शिकवतील. तुम्ही जर तिरस्कार पेरत राहिलात तर तरुण मुलांच्या अंगातील उसळत्या उर्जेला धोकादायकच वळण लागेल. आता काय केलं म्हणजे घराबाहेर अतिरेकी धर्माचा विचार घेऊन येणाऱ्या माठ लोकांना समजेल? त्यांच्या डोळ्यांवरची जातीपातीची झापडं गळुन पडतील याचं उत्तर मीही शोधतेच आहे. 

मी माझ्यापुरता मार्ग शोधलाय. आपण या समाजात बौध्दिक आणि मानसिक पातळीवर एकटे नसलो तरी असंघटित आहोत. हे मी स्वतःपुरतं मान्य केलंय. मी नोकरी करत नाही. माझ्या आसपासचे जग लहान आहे पण त्यांच्या डोक्यात भरवुन दिलेल्या उलटसुलट टोकाच्या विचारांबद्दल सतत स्वच्छ शब्दांत न चिडता प्रश्न विचारत राहते. मत मांडत राहते. एका पिढीत होणारे हे बदल नव्हेत. आपल्या आधीच्या पिढीत बदल घडवणे सर्वार्थाने कठीणच आहे. पण चिऊला ह्यांपासून दूर ठेवायचा प्रयत्न करते. तिला अभ्यासाचं, logic and rationality यांचं महत्व लहान लहान प्रसंगातून सांगत राहायचं इतकं मी माझ्यापुरतं सांभाळते. 

कधी जमतं, कधी गप्प बसते.

15 June, 2024

सवाष्ण कादंबरी ( डॉ. क्षमा गोवर्धने-शेलार)

#सवाष्ण

आमच्या काळात अक्कल फुटायच्या वयात रुढार्थाने मुलांच्या हातात पु. ल. देशपांडे, रणजित देसाई वगैरे लेखक हातात दिले जायचे. मला व्यंकटेश माडगूळकर आवडायला लागले. नंतर तुंबाडचे खोत हाती लागलं. गोनीदांचे मृण्मयी वाचलं. या अशा पुस्तकांत वतनदार संस्कृती, ब्राह्मण दलित जातीची उतंरड, सुक्ष्म भेद हे केंद्रस्थानी होते. ठिकठिकाणच्या चालीरिती, परंपरा, बायकांची स्वयंपाकघरापुरती मर्यादित असलेली सत्ता, त्यांची खानदानी आदब, पुरूषांचा बाहेरख्यालीपणा त्यातुन बायकांची होणारी घुसमट बरेच कंगोरे उमगायला लागले. मृण्मयी पुस्तक नायिकाप्रधान आहे. पण गुढ, रहस्यमय नाही. मी वाचलेल्या काही नारायण धारप आणि रत्नाकर मतकरी यांच्या गुढकथा/कांदबरी आहेत पण पुरूषसत्ताक संस्कृतीला मध्यभागी ठेवून लिहिल्या गेल्या आहेत.

या पार्श्‍वभूमीवर मी नुकतीच वाचलेली #सवाष्ण कादंबरी वेगळी उठून दिसते. म्हटलं तर सरळ सोपी गोष्ट ... ज्यांचं कथा कादंबरी या प्रकारातले वाचन भरपूर आहे त्यांना हि कादंबरी पुढे काय वळणं घेत जाईल याचा अंदाज येऊच शकतो. सहज येऊ शकतो पण ...

पण... हि कथा आहे सर्वार्थाने समाधानी असणाऱ्या "बाजिंदा" ची... आणि तिने वासनांध "नाना"ला दिलेल्या शापाची... सोन्याने मढलेल्या, खानदानी आदब सांभाळून असणाऱ्या सवाष्णींचा घास घेणारा तो शाप ! भरलेले संसार उध्वस्त करणारा तो एक शाप ! 
" या वाड्यात हळद-कुंकवाचे करंडे आ वासून पडून राहतील... "
फक्त एकच प्रकरण तिच्यावर असलेले आणि तरीही तिचं प्रत्येक पानापानांतून जाणवत राहणारं मुक अस्तित्व हि या कादंबरीची खरी नायिका... 

ठिकठिकाणी शापवाणीवर तोडगा फिरत असणाऱ्या दुर्गाआजीला ऐकुन घ्यावं लागलं, "जे पेरलंय तेच उगवणार दुर्गाबाई !!" हि दुसरी नायिका ! नानाची बायको हिरा शापवाणीने जाते पण त्यावर विश्वास न ठेवणारी मध्यमवयीन दुर्गा म्हातारपणी मात्र विजुच्या बायकोला - लताला मात्र कुलदेवीचं अष्टक अखंडित म्हणत शापापासुन जपत राहते... तेव्हा वाड्याचे संस्कार तिच्यात उतरल्याची जाणीव होते.

या सगळ्यात समांतरपणे सुरू होणारी आणि वाड्याच्या भागधेयाशी येऊन थांबणारी विजु-लताची प्रेमकथा. अवखळ लताचं परिपक्व विचारांत रुपांतर होणं याची ही गोष्ट. आपल्या विजुचे प्राण वाचावेत यासाठी तिने केलेले जगावेगळे अग्निदिव्य... हा खरा क्लायमॅक्स !!
हि लता तिसरी नायिका...

तर्क, मानवी विचार, मानसिक परावलंबत्व, अधोगती, अंधश्रद्धा, परंपरा, रितीरिवाज या सर्वाचा परस्परसंबंध दाखवत शेवटपर्यंत खिळवून ठेवणारी, वेगवान गावाकडची सुंदर गाणी असणारी ही कादंबरी जरूर वाचावी अशी आहे. 
- मृणाल भिडे (१५ जुन २०२४)

29 April, 2024

अमलताश फिल्म

अमलताश .... पुन्हा एकदा !
 राहुल देशपांडे कलेक्टीव्ह करोनाच्या काळात सुरू झालं. मी बरंच सुरूवातीपासून ते फॉलो करत होते... करते आहे. अचानक फेब्रुवारी महिन्यात "तृषा" गाणं ... अमलताशचे पहिले गाणे आले, ऐकले आणि थरारले... पहिल्यांदा आकर्षण, अचंबा वाटला तो अमलताशच्या फुलांचा उल्लेख गाण्यात. ? प्रकाश नारायण संतांच्या घराचं नाव असलेला अमलताश चक्क गाण्यात? काहीच दिवस फुलून अचानक गायब होणारी हि बहाव्याची घुंगरू वजा फुलं काय म्हणून गाण्यात घ्यावी वाटली असतील? मग एकेक गाणं रिलीज होत गेलं... जोडीला युट्यूब व्हिडीओ कव्हर म्हणून (बहूतेक) water color मधली मयुरेश भायदे समीर कुलकर्णी यांची अप्रतिम illustrations... सिनेमा व्यावसायिक नाही हे तर समजलं होतंच. पण प्रायोगिक नाटकं असतात तसा हा सिनेमा? हा बघायचाच. मी फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात पूर्ण ऑडीओ आल्बम स्पोटिफायवर आला. आख्खा दिवस मी "मॅड मॅड मॅड" होऊन तो आल्बम ऐकत राहिले. अगदी ते instrumental pieces ही. 

सतत कुठे रिलीज होतोय कधी रिलीज होतोय याची वाट पाहत होते. "एकदा काय झालं?" सिनेमा मी अशाच आळसापायी चुकवला होता. नंतर तो अजुनही OTT वरही आलेला नाहीय. हा मात्र मी काही झालं तरी चुकवणार नव्हते. म्हणतात न, "पुरी शिद्दत से चाहो तो .. " वगैरे .... तसंच झालं. मी रविवारच्या शो चं तिकीट बुक केलं. थिएटर ला जाऊन जागेवर बसले आणि दीर्घ श्वास घेतला. सिनेमा पाहिला... being a passionate photographer म्हणून तो सिनेमा बेहद आवडला. राहुल देशपांडेची फॅन म्हणून गाणी आवडली. छान त्याच मुडमध्ये तरंगत तरंगत घरी आले.

साधी सोपी (खरंतर चारच ओळीत संपणारी आणि अत्यंत predictable अशी 😉 😀 ) राहुल-किर्तीची प्रेमकथा ... राहुल(राहुल देशपांडे),पवन (भुषण मराठे) आणि त्याचे दोन मित्र अशा चौघांचा Cinnamon Chai नावाचा अस्सल पुणेकरांचा रॉक बँड. आणि दुसरीकडे किर्ती नावाची मुळची भारतीय पण आता कॅनेडियन शेतकरी मुलगी ...

राहुल पुणेकर त्यातही सदाशिवपेठी असल्याकारणाने त्यांचा ऐसपैस स्टुडिओ असुनही गिचमिड जागेत"च" ( च महत्वाचा) रंगणारी jamming sessions... आणि आख्ख्या सिनेमाभर फिरणारे शेंगदाण्याचे लाडुचे हास्यास्पद प्रसंग... ते दाण्याच्या लाडवांचे लाडे लाडे प्रसंग म्हणजे अस्सल रेशमी माहेश्वरीला जुन्या गाऊनची ठिगळं लावल्यासारखे वाटतात. मी तिच्या जागी असते तर दाण्यांची उसाभर करण्यापेक्षा येईल त्या किमतीला दाणे किराणामालाच्या दुकानात विकुन आले असते. तो वेळ दुसरं काही अधिक creative केलं असतं. माझ्यासारख्या नको तितक्या minimalist attitude आणि practical मुलीला ते लाडु खटकलेच. 

तर ते असो.... सिनेमा फक्त दोन कारणांमुळे बघावा.
 1. अप्रतिम अशी सिनेमॅटोग्राफी. तेही तुम्ही जर फोटोग्राफी आणि चित्रकला या दोन्ही कलेच्या बाबतीत aggressively passionate असलात तर आणि तरच हा सिनेमा बघताना तुम्हाला मज्जा येईल. त्या अर्थाने हा सिनेमा मोठ्या पडद्यावर पाहिला त्याचं सार्थक झालं. पुणं हे माझं वैयक्तिक नावडतं असलं तरी शहराच्या प्रेमात असलेली माणसं जेव्हा शहराची फक्त देखणी बाजूच चित्रित करतात तसंच ह्या सिनेमाचं आहे. आणि म्हणुन मी माझी मतं बाजूला ठेवली, मला सिनेमा पाहताना छान वाटलं.

पण. .. लेख लांबेल खरंतर. पण लिहितेच. निम्मा वेळ कॅमेरा पुण्यातल्या रस्त्यावरून आणि खासमखास जागांमधून फिरतो तरीही पुणे शहर एक स्वतंत्र पात्र म्हणुन सिनेमात दिसत नाही. ( In reality Old Pune is itself a good cinematic character. ) सिनेमातली पात्र टिपिकल पुणेरी गोष्टी करतात. उदाहरणार्थ वाडेश्वर भुवन., टेकडीवर जाणे, अमृततुल्य चहा इत्यादी... हे पुणे स्पॉटिंग खुद्द पुणेकरांना कितपत आवडलं असेल कोण जाणे... 

2. राहुल आणि त्यांच्या मित्रांचा बँड कालांतराने बंद झाला असला ( किंवा नाईलाजाने बंद केला असला ) तरी राहुल स्वतः पवनबरोबर वाद्यांचे दुकान चालवतो. बरोबरीने गाणी कंपोझ करणं सुरू असतंच. त्यामुळं संगीत, कविता सिनेमाचा गाभा असला तरी ते हळुवारपणे येत राहतं. अमलताश आल्बम हा एक स्वतंत्र आहे. त्यात असलेली गाणी सिनेमात जशीच्या तशी आलेली नाहीत. शान्ता शेळके यांचे शब्द असलेलं 'सरले सारे तरीही मागे शपथ गळ्याची उरते' हे गाणं आणि मयुरेश वाघ यांचं तृषा हे गाणं फार काळ सोबत राहणार आहे. अमलताश आल्बम ऐकुन सिनेमा बघाल तर भ्रमनिरास होईल. आल्बम जितका श्रवणीय आहे तितक्या ताकदीने कथा उत्तम सुरात, नाट्यमयरित्या पडद्यावर आलेली नाहीय..

आता कथेविषयी... इथे खरंतर फारसं बरं बोलावं असं नाहीय. पण तरीही जे आवडलं तितकंच लिहिते.

बहावा तसा कमी काळासाठी बहरणारा त्यातही सृजनाची चाहूल देणारा वृक्ष मानला जातो. पण बहरतो असा की बघणाऱ्याचा जीव वेडापिसा व्हावा. प्रत्येक पानापानांतून लखलखीत सोनपिवळ्या फुलांचे घोस लटकू लागतात. आणि एकदिवस अचानक बहर ओसरत जातो... बहर ओसरत आला की पावसाची चाहूल लागते. 

राहुल आणि किर्तीची प्रेमकथाही तशीच काहीशी! एका वळणावर दोघे एकत्र येतात. हसतात, गाणी गातात, एकमेकांचे लाड करतात, भरभरून जगतात.. एका कातर क्षणी त्यांना उमगतं हा प्रवास असाच संपणार आहे आणि ... आणि किर्तीला सृजनाची चाहूल लागते. कुठे कॅनडा आणि कुठे सदाशिवपेठ !

जे प्राक्तन आहे, जसं आहे ते स्थितप्रज्ञ राहून स्विकारलेला राहूल पाहताना मीच अस्वस्थ झाले. OT , pre-operative tests मला काही नवीन नाहीत. (इथेही ते शॉट्स विनाकारण लांबवलेत.) मी यातुन गेलेय. मी स्वतः आणि मग आई म्हणुनही ... डोक्यावरचे केस भादरताना पाहणं मला फार रिलेट झालं ... आणि त्याच क्षणार्धात "अमलताश " नावाचा अर्थ काळजात सपकन् घुसला ! खूप कमी वयात मरण जवळून पाहिलेल्या आणि एक स्वल्पविराम आयुष्याला लागल्यावरही पुन्हा उठून उभ्या राहणाऱ्या मला प्रेमाची खुप किंमत आहे. मी निस्वार्थपणे प्रेम करणं हे काय असतं अनुभवलंय आणि हे मी फक्त आज नाही माझ्या पार टीनएजपासुनच्या अनुभवातून म्हणतेय... यात एकतर्फी निखळ प्रेम ते प्रेमाला बसलेले व्यवहाराचे चटके या सगळ्याला हे लागू पडतं. सोबत आणि स्वीकार या दोन्हीकडून मी डील करायला शिकले. अजुनही शिकते आहे. तसंही प्रेमाला व्यवहाराचं, समाजाच्या so called hypocritic बंधनाचं लॉजिक कळत नाही आणि प्रेम करताना फार लॉजिक लावू ही नये. कारण प्रेम करणं ही एकाचवेळी अत्यंत वैयक्तिक आणि वैश्विक गोष्ट आहे. कारण पुर्ण जगात बरंच काही भलंबुरं घडत असताना त्या दोघांच्याच आयुष्यात एक छोटीशीच पण खुप पॉझिटिव्ह गोष्ट होत असते. अशी भावना जी व्यावहारिक पातळीवर ruthlessly competitive आयुष्यात जगायला अर्थ देते.

मी अगदी सुरूवातीला लिहिलंय तसं हे कथानक साधं चार ओळीत संपेल आणि अपेक्षित शेवट असणारं आहे. तरीही हि प्रेमकथा एकाचवेळेस श्वास कोंदुन टाकणारी आहे आणि प्रवाही आहे. असं निखळ, निस्वार्थी प्रेम कि ज्याला कोणत्याही सामाजिक संकेतांचे ओझे नाही की आवश्यकता नाही. प्रेम पूर्णत्वाने न मिळण्याचं दुःख नाही. आणि तरीही वर्तमानात जगत असलेला क्षण उत्कट आहे. जन्म मृत्यूच्या पलिकडचा हा प्रवास आहे.
सिनेमात अनेक रुपकं आहेत, काही कातर, काही अस्फुट काही अबोध क्षण आहेत जे खऱ्या आयुष्यातही असतात असे क्षण फक्त स्पर्श आणि श्वास यांनी भरून काढता येतात. 
You liberate me ...हे फार अर्थपुर्ण गाणं आहे. ज्यांना समुद्र किनाऱ्यावर बसून रहायला आवडतं, शांतता आवडते त्यांना अमलताश आवडेल.

06 March, 2024

अनय

नक्षत्रांच्या गावातून उतरली होतीस तू त्याच्या घरात;
मेघश्याम आभाळाची ओढ तुझ्या रक्तातच होती
हे समजलं होतं त्याला, अगदी पहिल्यापासून,
तुझ्या बाईपणाची जात विजेची, शेजेला घेता न येणारी
ओळखून होता तो आतून, आतून, खोल मनातून
तुझ्या झिळमिळ स्वप्नांच्या मोरपिसांना
त्याने कधी देऊ पाहिले नाहीत आपले डोळे,
आणि नाही गढूळ केले कधी तुझ्या देहात हिंदकळणारे
धुंदमदिर निळे तळे.

त्याच्या मृण्मय आयुष्यात उमटली होती
अमराचा अळता लावलेली तुझी पावले
घरात तुझ्या असण्याचा अविनाशी गंध होता;
काठोकाठ भरून होता तो नुसत्या तुझ्या आसपास वावरण्याने;
तुझ्याशी खोलवर कृतज्ञ होता
पाहिलं त्यानं तुला उंच बेभान उसळताना;
रात्रीच्या रसज्ञ काळ्या अंधारात मिसळताना;
मधुर विषाचे घोट खुळ्या ओठांनी आकंठ घेताना;
पिसावताना, रसावताना,
अस्तित्वाचा कण न्‌ कण
प्रेमाच्या चेहऱ्यावर उत्कट उधळून देताना.

कळली त्याला तहान तुझ्या तृप्तीला लागलेली अतृप्तीची;
दु:खाचं नख लागलेल्या काळजाची तडफड कळली शर्थीची;
कळली कशी असते प्रेमात स्त्री भरतीची आणि सरतीची.
तू हरलीस हे त्याला कळलं, पण निरर्थाच्या वाटेवर
हरवली नाहीस, स्वत्व सांभाळून उरलीस तशीच, हेही कळलं
त्यानं पुढे होऊन तुझ्या पापणीवरचा शोक टिपला,
त्या क्षणी, राधे तुला तुझा पुरुष भेटला.
पुरुष-जो क्षमा करून नाही ऋणी करत;
पाठ फिरवून नाही उणी करत;
घेतो समजून, सावरतो, आवरतो, उराशी धरतो;
आपल्या नसलेल्या स्वप्नांसाठीही आपल्या काळजाचं घर करतो.
राधे, पुरुष असाही असतो.

30 December, 2023

Three of us

#movietime 
#moviereview 
#threeofus 
गेल्या काही वर्षांत थिएटरमध्ये जाऊन सिनेमा पाहणं खुप कमी झालंय. तरीही मला एकदा कायझालं, सॅमबहादुर, three of us हे असले सिनेमे बघायचे होते. जमलंच नाही. असो. नेटफ्लिक्स वर three of us आल्याचं समजलं. लगेच पाहिला. रिव्ह्यू वाचले नव्हते मुद्दामहून. 

जे करण जोहर, चोप्रा ॲन्ड कंपनी, रोहित शेट्टी ॲन्ड कंपनीचे फॅन्स आहेत त्यांनी हा सिनेमा बघुच नका. 

शैलजा आणि दीपांकर देसाई हे मध्यमवयीन जोडपं. आणि सारीका आणि प्रदीप कामत हे दुसरं जोडपं. या चौघांचेही एकमेकांत असलेले तरल.... उत्कट.... प्रगल्भ .... आणि आणि ... मऊ मऊ उबदार गोधडीसारखं नातेसंबंध ! बास हे इतकंच साधं सोपं आयुष्य होतं... आहे ... असेल यावर विश्वास ठेवायला भाग पडणारा हा सिनेमा. 

शैलजाला विस्मरणाचा आजार जडला आहे. ती अचानक दीपांकरला वेंगुर्ल्याला जाऊया, म्हणून विनवते आणि आठवडाभरासाठी ते जातात. तिथे शैलजाची भेट तिच्या बालमित्राशी - प्रदीप कामतशी होते. जुन्या आठवणींना उजाळा मिळतो आणि गतकाळातल्या काही जखमांवरची खपली पुन्हा निघते. उद्गम कविता आणि त्या कवितेचा अर्थ जागोजागी सापडणं हा सिनेमा आहे.

अविनाश अरुण यांचा कॅमेरा चौघांच्या नातेसंबंधांची विचित्र, तरीही अलवार, सुंदर गुंफण टिपत राहतो.
काही संवादातून नात्यात गरजेचा असणारा प्रगल्भपणा दिसतो. 
सारीका मिश्किल पणे प्रदीपला म्हणते, "कवी महोदय, इतक्या वर्षात माझ्यावर कविता लिहावी सुचलं नाही. आज बालपणीचं प्रेम दिसलं तर चार ओळी सुचल्या !" तिच्या या वाक्यावर प्रदीप ज्या उत्कटतेने तिचा हात हातात घेतो, तिला बिलगतो ती कविता त्या क्षणात सारीकाच्या मनात रुजते. तिच्यासाठी नसूनही. ...
किंवा सारिका जेव्हा शैलजाला म्हणते, "अजीब तो लगा, पर अच्छा अजीब लगा" त्या क्षणात या चित्रपटाचा सगळा साधेपणा सामावला आहे. 

एक गंमत आता पोस्ट लिहिताना लक्षात आली. प्रदीप स्वत:ची कविता वाचून दाखवतो आहे आणि कवितेतलं काहीही न कळणारा दीपांकर त्याला 'आगे?' विचारतो. प्रत्यक्षात दीपांकरची भूमिका साकारणारा स्वानंद किरकिरे स्वत: एक उत्तम कवी आणि गीतकार. हा मुद्दाम जुळवून आणलेला गंमतीशीर योगायोग असेल कदाचित, पण आवडला.
एक प्रसंगात आकाशपाळण्यात शैलजा आणि प्रदिप थोडा वेळ वरती असतात तेव्हा त्यांच्यातला संवाद अद्भुत आहे. 
अजुन एका प्रसंगात दीपंकर प्रदीप बद्दल बोलताना म्हणतो की त्याला पुरूषांवर विश्वासच नाहीय. पण तो माझ्यावर विश्वास ठेवू पाहतोय कारण तुझा माझ्यावर विश्वास आहे. वा ! काय सुरेख संवाद आहेत हे.! हे इतकं मोजक्या शब्दांत बायकोबद्दलचं कौतुक कसं कोण मांडु शकेल?
अजुन एक, सहजच वाटेल पण बॉलिवूडच्या टिपिकल पुरूषप्रधान संस्कृतीला हादरे बसतील असा आहे. फिरुन आल्यावर दीपंकर शैलजाच्या केसांना तेल लावतोय आणि एकीकडे ते दोघं मुलाशी गप्पा मारतात. फोन बंद झाल्यावर अचानक शैलजा वळते आणि विचारते मी भरतलाच विसरले तर? दीपंकर काही न बोलता केसांवरच थोपटतो आणि शांतपणे पुन्हा तिच्या डोक्यावर तेल मुरवत राहतो. इन मिन पाच सात मिनिटांचा प्रसंग पण हे असं बायकोने नवर्‍याकडुन तेल लावून घेणं मराठी सिरीयल मध्ये होईल? आणि झालंच तर background ला एखादं दर्दभरं गाणं वाजेल किमान दोन एपिसोड तरी नक्कीच संपतील यात आणि कन्सेप्ट ची पुरी वाट लागेल. असो च ते एक. 

शेफाली छायाने शैलजा ची भूमिका फारच अप्रतिम साकारली आहे. She is class apart... तिच्या चेहऱ्यावर वरचे हावभाव, बोलके डोळे पाहणं म्हणजे भारी अनुभव ठरतो. जयदीप अहलावत हा माझा आवडता अभिनेता आहे. मी पहिल्यांदा त्याला गब्बर इज बॅक मध्ये पाहिला. छोटा रोल होता. पण लक्षात राहिला. नंतर गँग ऑफ वासेपुर मध्ये... मग आवडतच गेला. He is versatile. Good underplay acting ! स्वानंद किरकरे चा किंचित काही काळ जेलस होऊन स्वतःच दुखावलेला नवरा आणि शैलजासोबत नव्याने नातं घट्ट झाल्यावर समंजस नवरा छान आहे. 

आता गेल्या काही वर्षांत अचानक कुठेतरी हरवल्यासारखं वाटू लागलं होतं, ते आज कितीतरी दिवसांनी पुन्हा अनुभवायला मिळालं. मन तृप्त झालं, शांत झालं, कुणाच्यातरी मांडीवर डोकं असावं आणि त्या व्यक्तीचा प्रेमळ स्पर्श आपल्याला काहीच सुचवत नाहीय, ती वासना नाही, सहानुभूती नाही काहीच नाही... फक्त कपाळावर, चेहर्‍यावर फिरणारे त्याचे हात आपल्या आत त्याचं प्रेम झिरपवत नेतात, मुरवत नेतात, मनाच्या दुखऱ्या अवघड जागेवर खपली धरु पाहतेय असं काहीतरी अनुभवायला मिळालं.

19 December, 2022

मौनमुद्रा

मी देसाईंची श्रीमानयोगी तर असंख्य वेळा वाचली आहे. आतु बाबा तर चिडवायचे देखील... आमच्या बाईंनी पोथी लावलीय. बायका देवाच्या पोथी लावतात आमची मृणाल तशी ही श्रीमान योगीची पोथी लावते. पण इतकं असलं तरी मी कथा-कांदबऱ्यात मनाने इतकी घुसत नाही. पण तसं माझं कवितेच्या बाबतीत होत नाही. 

कविता मात्र माझ्या मनात रेंगाळत राहतात... खुप दिवस, महिने, वर्ष देखील... म्हणूनच मी कविता सहसा वाचायलाच जात नाही. 

मोबाईल डिक्लटरींग करताना हा फोटो सापडला. आवडलेल्या कवितांचं फोटो मध्ये कोलाज करणं हा ही एक माझा आवडता प्रकार होता... आजही आहे.
हि कविता पहिल्यांदाच वाचली तेव्हा कॉलेजमध्ये होते. तेव्हा वाटलं हि कविता ब्रेकअप झाल्यानंतरची आहे 🙄 आज लक्षात येतं हि प्रत्येक लग्न झालेल्या, न झालेल्या प्रत्येकीची गोष्ट आहे. 🙂

"दिवसाच्या चोवीस मात्रा संसाराच्या दहा फुटी खोलीत चपखल बसवणारी विंदाच्या नजरेतली प्रसन्न स्त्री " (झपताल) आणि " प्रचंड कल्लोळ प्राणांत सावरून, ओठांवरची मौनमुद्रा उकलून मोजकं बोलणारी शांताबाई यांच्या नजरेतली ती रुक्ष स्त्री" (मौनमुद्रा) हि दोन्ही तिचीच तर रुपं.... पण एका लेखकानं लिहिलेली कविता आणि लेखिकेनं केलेली कविता याच्यातला मुलभूत फरक तो हाच असेल का?


04 December, 2022

माणसं

पंधरावीस नातेवाईकांच्या गर्दीत 
आपल्या माणसाकडे हळूच पाहणारी माणसं...

आसपासचं जग विसरून
एकमेकांत गुरफटलेली माणसं...

तरूणांच्या उत्साहासोबत
थकली भागली पावलं खेचणारी माणसं...

चुकूनमाकून मिळालेला घराबाहेरचा उजेड
नजरेत भरून घेणारी बुरख्याआडची माणसं....

वारंवार लिपस्टीक/ भांगेचा सिंदुर 
निरखणारी घुंगटाआडची माणसं... 

झाडां-फुलांची नावं लिहीणारी
शोधक नजरेची माणसं... 

पिंजऱ्यातले प्राणी बघताना 
आकाशातले पक्षी उत्सुकतेने पाहणारी माणसं...

जिथे ऐसपैस जागा दिसेल तिथे
खाऊच्या पुड्या उघडणारी माणसं... 

पोराबाळांचा उदंड उत्साह बघून
उद्याच्या काळज्या विसरलेली माणसं...

प्रत्येक वळणावर सेल्फी घ्यायला
उभी राहिलेली माणसं...

लेकीसाठी एक फॅन्टा विकत घेताना
चारचारदा खिसा चाचपणारी माणसं...



...

हि सारीजणं
भविष्यात येऊ घातलेल्या 
धर्म-शीतयुद्धात करपवलेली स्वप्नं घेऊन
कुठे जातील?

काय करतील?

...
...
...
न जाणो
कोणी काय सांगावं
...

हि माणसं एक होतील आणि
पाय रोवून उभी राहतील
माणुसकी आणि अहिंसेच्या कातळावर !
  

16 November, 2022

चिऊची डायरी

Multi vitamins and calcium etc drops घेणं हा एक रोजचा धमाल कार्यक्रम असतो. ते ड्रॉप्स मोजूनच द्यावे लागतात. ते मात्र मी काढून देते. पंधरा मिनिटांत आटोपणारा खेळ. अर्थात हे रोज असंच होतं असं नाही. त्याचीच हि गंमतजंमत. 

आई खाली बसताना किंवा डायनिंग टेबलवर पाणी, त्या ड्रॉप्सच्या बाटल्या, चमचा, ड्रॉपर सगळं साहित्य घेऊन बसतेय का यावर चिऊचं बारकाईने लक्ष असतं. माझ्याही अंगात किडे भारी ! मुद्दाम मी एखाद दुसरी गोष्ट देतच नाही. मग चिऊपण काय विसराळू मिळालीय अशा नजरेने बघते. 😂
कॅल्शियम मोजून वाटीत दिलं रे दिलं की प्यायच्या आधीच प्रश्न, " आदून देनाल?" (अजून देणार?) मी नाही म्हणणार माहितेय तरी दरवेळेस विचारेल, मग मिस्कील हसेल... (मी मनातल्या मनात, अग चेंगटा, आधी दिलंय ते तर पी. 🤪)  त्यानंतर मात्र ते जेमतेम दोन-तीन चमचे कॅल्शियम पोटात जायला पाच ते पंधरा मिनिटं कितीही वेळ लागू शकतो... depends upon her mood.  बयेची गाडी फारच रंगात असेल तर वाटीतला शेवटचा थेंब पण कसा बोटावर येत नाहीय याबद्दल स्वतःशीच बडबड करून होते. कॅल्शियम चाटून पुसून पिऊन झालं की तिरक्या नजरेनं आईकडे बघायचं आणि डी व्हिटामिनची बाटली आपल्या पाठीमागे लपवायची..  अशावेळेस आईने, 'अरेच्या बाटलू कुठे गेलीस तु' असे काहीतरी डायलॉग्स म्हणणे शास्त्र असते! मग त्या बाटलीतून आधीच तयार असलेला ड्रॉपर बाहेर येऊन तो तोंडात जातो... (आपोआपच बरं का !) मग आई समोर बसलेली नसली तर आईच्या नावानं जप करायचा. आई मग वरून ड्रॉपरचं रबरी फुगा दाबणार. (मनातल्या मनात : बाई सगळंच तुम्ही करा. फक्त तोंडात ड्रॉपर दाबायला मला ठेवा कामाला. 😂😂😉)
मग येतो फॉलिक ॲसिडचा नंबर ! मोजून 8 थेंब द्यायचे असलेली काचेची बाटली आई तिरकी करते. चिऊनं धरलेल्या चमच्यात ड्रॉप पडतात. हे सवयीचं असलं तरी दरवेळेस चिऊ मात्र अद्भुत काहीतरी घडतंय असला शुद्ध नाटकी आव आणत काहीतरी बडबडते. (ती काय बोलते ते अजूनही समजलेलं नाही.) मग चमचा तोंडात धरून चाटत बसते. मग एकदाचे ड्रॉप संपले की पाणी पिऊन सगळं सिंकमध्ये ढकललं की आई समोर असो - नसो, एकदम थाटात चिऊ ओरडते "झायंऽऽऽ"

चिऊ कसली, तिची आईच सुटकेचा निश्वास टाकते...

फाल्गुनी पाठक

कॉलेज आटपून दुपारी घरी आलं की जेवून टीव्ही लावायचा. आतु झोपलेली असायची. बाबा कामावर... तो वेळ माझा. टीव्हीलाच डायरेक्ट हेडफोन्स लावायचे. म्युझिक चॅनेल्स सर्फिंग करायची. कुठेतरी ती दिसायचीच. तिच्या गोल गोग्गोड चेहर्‍यावरचं हसू, गाणं म्हणत असतानाचा तिने धरलेला ठेका, त्या ठेक्यावर उडणारा तिचा तो बॉबकट की बॉयकट(?), तिच्या ते स्वतःभोवती गिरक्या घेणं. आणि गाणं संपल्यानंतरही मनात गुंजत राहणारा तो मधुर आवाज... अहाहा! 

कितीतरी गाणी तिच्याच नावानं आज फेमस आहेत. आमचीच नाही तर त्यानंतरच्या दोन चार पिढ्या तिच्या गाण्यावर फिदा होत्या... तरूणाईची नस तिने परफेक्ट ओळखली होती. नव्वदच्या दशकात जीन्स-टॉप-जॅकेट आणि केसांचा बॉबकट ही अमेरीकन स्टाईल भारतीय मुलींच्या आयुष्यात येऊ घातली होती. आमच्या पिढीला ती कधी कोणी परकी वाटलीच नाही. आपल्यातलीच एक मोठी बहिण गाण्याच्या माध्यमातून आपल्या क्रशस्टोरीला पॉझिटिव्ह सपोर्ट देतेय असं वाटायचं. जोडीला तिचा मधाळ आवाज. गाण्याच्या पार्श्वभूमीवर रंगत जाणारी एक निरागस क्रशस्टोरी... तिच्या कथा साध्या असायच्या. गाण्यातल्या कपलचे कपडेही साधे असायचे. पटकन केव्हाही आपल्याही आयुष्यात असं कोणीतरी येईल असं वाटेल इतकं ते सारं लोभस होतं. त्या फुलपाखरी दिवसांत तिला पाहताच ह्रदयात धडधडायचं...ती यावर्षी कोणती नवीन गाणी आणणार ही याची उत्सुकता असायची.

 तिने गायलेल्या प्रत्येक गाण्यावर तिच्याच नावचा ठसा होता... आहे... असणार आहे. मग भले कोणीतरी काल उगवलेल्या आणि अर्ध्या हळकुंडाने पिवळ्या झालेल्या मुलीनं कॉपीराईट नसण्याची पळवाट काढून तिच्या गाण्याचं रिमिक्स केलं तरी आजही युट्यूबवर तिच्याच गाण्याचे व्ह्युज वाढतील. 

ती तेव्हाही दांडीया क्वीन होती. आजही आहे. तो फाल्गुनी पाठक नावाचा स्वतःच एक ब्रँड होता. आजही आहे. 

Love you lot FalguniPathak

#Nostalgia90s

#falgunipathak

MajaMaOnPrime

मजा मा
#MajaMaOnPrime 

काल दिवसभरात थोडा थोडा करून मजा मा पाहिला. माधुरी दिक्षित, शिबा चढ्ढा वगैरे नावं बघून आधी वाटलं की असाच टाईमपास सिनेमा असेल. पण हा एकदमच वेगळा सिनेमा आहे. 
साधी, सरळ रेषेत जगणारी आणि दोन वेगवेगळ्या आर्थिक स्तरावरील पण साधारण एकाच विचारसरणीतली भारतीय कुटूंबांची हि गोष्ट ! एक कुटूंब भारतात राहतं, दुसरं अमेरिकेत ... आम्ही अमेरिकन कसे छान, श्रीमंत पण संस्कारी, आम्ही भारतीय कसे authentic, traditional वगैरे वगैरे सुरू असतानाच दुसर्‍या पातळीवर वेगळ्या माणसांच्या गटाच्या अस्तित्वाबद्दल पडद्यावर नाट्य घडत असतं... 
आणि हा वेगळा गट आहे तो म्हणजे LGBTQ + क्वियर कम्युनिटी !

या विषयावरच्या सिनेमाची सुरूवात भारतात दीपा मेहतांनी फायर सिनेमापासून केली. त्यानंतर खुलेपणाने बोलायला इतकी वर्षं मध्ये जावी लागली.... गेल्या वर्षी आलेला "बधाई दो" आणि आताचा "मजा मा" हे दोन्ही सिनेमे साध्या साध्या प्रसंगातून समाजात काय मत आहे ते मांडतात. म्हणूनच या चित्रपटातले प्रसंग अतिशय realistic वाटतात. 

एका बाईला दुसरी बाई आणि एका पुरूषाला दुसरा पुरूष सर्वार्थाने आवडावा यात नैसर्गिक आहे की अनैसर्गिक याबद्दल मतं निरनिराळी आहेत. मी जाणीवपूर्वक इथे नैतिकतेचा मुद्दा आणत नाही. कारण नैतिक/ अनैतिक हे व्यक्तिसापेक्ष असतं. पण त्या दोन व्यक्तींमध्ये असलेली प्रेमाची भावना हि फक्त शारिरीक असेलच असं नाही ती मानसिक पातळीवर देखील असते. हि त्या प्रेमाच्या नात्याची मागणी आहे.  माणसांची नाही. जेव्हा एखादं नात्यात अपेक्षा केली जाते तेव्हाच त्या नात्यात ओलावा तयार होतो, सहवास असेल, सुसंवाद असेल तर प्रेम वाढीस लागतं. भले ते नातं दोन पुरूषांमधील असेल (gay relationship) किंवा दोन स्त्रियांमधील असेल (lesbian relationship)... यात नैतिक-अनैतिक या कन्सेप्ट कायमच बदलत राहणार आहेत. आजचं अनैतिक कदाचित उद्या नैतिक असेलही. पुर्वी HIV झाला की भुवया उंचावल्या जायच्या... सरोगसी,  स्पर्म डोनेशन म्हटलं की नाकं मुरडली जायची.  आज गल्लोगल्ली IVF च्या पाट्या दिसतात. तसंच हे !

अजूनही या नात्याला खुद्द त्या दोन व्यक्तींची सहमती असेलच असंही नाही. सिनेमात एक प्रसंग आहे, पल्लवी पटेल ला  संजना म्हणते, "तु जशी आहेस ते आधी स्वतःशी प्रामाणिकपणे मान्य कर. आणि कोणाला, कधी, कसं, केव्हा आणि "का" सांगायचं ह्या प्रश्नांची उत्तर तु स्वतः शोध. मग बाकीचा विचार !"    हे अतिशय महत्त्वपूर्ण आहे मला वाटतं. 
आपल्या पुराणकथांत यक्ष, यक्षिणी, किन्नर होतेच पण तरीही आज आपण ज्या समाजात राहतोय तो समाज अजून या क्वियर कम्युनिटीला खुलेपणानं स्विकारायला तयार होत नाही. (फक्त भारतीय नव्हे तर जागतिक पातळीवर कोणताही समाज) 
संजनाने मांडलेल्या प्रश्नांची उत्तरं शोधताना पल्लवी पटेल सारख्या व्यक्तीने पुढच्या काही मुद्द्यावर विचार करणंही गरजेचं आहे. "लोग क्या कहेंगे" या प्रश्नाची चौकट मोडण्याचं धाडस, या विषयावरचं वैद्यकीय ज्ञान, कायदेशीर पाठींबा, आर्थिक स्वावलंबन, शारिरीक क्षमता, पूर्ण कुटूंबाचा खंबीर आणि डोळस सपोर्ट हेही तितकंच महत्त्वाचं आहे. 

जेव्हा पल्लवी पटेल लाय डिटेक्टर टेस्टला धाडसाने सामोरी जाते तेव्हा त्या स्त्री ला पुरूषी मानसिकतेचा पूर्ण अंदाज आलेला असतो. या चित्रपटातला हाच दहा मिनिटांचा क्लायमॅक्स सिन पूर्ण सिनेमाचं यश आहे.  क्वियर कम्युनिटीला देखील माणूस म्हणून आधी बघा नंतर त्यांच्या gender, sexuality, physical relations याचा विचार करा हे लक्षात आणून देण्याचं काम हा क्लायमॅक्स करतो. 

बाकी गोष्ट फेसबुकवरच कुठे ना कुठे वाचायला मिळेल.  नाही तर आज रविवार आहे. डायरेक्ट सिनेमाही बघता येईल. ❤️

द शम्मी कपूर



पावसाळ्यातली कुंद दुपार ! कॉलेज आटपून घरी येऊन आळसावले होते. आतु रोजच्यासारखी झोप म्हणून दटावून गेलेली. टीव्हीलाच हेडफोन्स लावून म्युझिक चॅनेल सिनेमा चॅनेल सर्फिंग सुरू होतं. एका जुन्या गाण्यापाशी रेंगाळले. संपतच आलेलं. पुढचं गाणं सुरू झालं.....
ड्रमबिट्सचा आवाज... चढत जाणारा सॅक्सोफोन... क्षणाची शांतता आणि तो पडद्यावर अवतरला. 

"पलभर ठहर जाए ... दिल ये संभल जाए " अशी माझी अवस्था. 

त्याची ती मधाळ जादुई नजर... उफ्फ ... छातीत ह्रदय मन वगैरै नावाची जागा असते याची लख्ख जाणीव झाली ! मला माझ्याच ह्रदयाचे ठोके पहिल्यांदाच लख्ख ऐकायला आले. अंग शहारलं. मी "मोठी" झालेय याची जाणीव मला यानेच तर करून दिली होती. आयुष्यातला माझा पहिला आणि खरंतर तोच शेवटचा क्रश ! तो गात होता ...  जणू माझ्याचसाठी ....

तुमने मुझे देखा हो कर मेहरबां ! 
रुक गयी ये जमीं, थम गया ये आसमाँ 
जाने मन, जाने जाँ ... 💞 💕

वय वाढत गेलं, जगाचे भलेबुरे अनुभव आले तसं मन निबर होत गेलं. शम्मीवरचं माझं प्रेमही मॅच्युअर्ड होत गेलंय. मात्र शम्मी साठी माझ्या ह्रदयाचे ठोके आजही तितकेच गडबडतात. ! Love for him is a pure emotion. हो ! शम्मीच ! आज तो जिवंत असता तर तो वास्तव आयुष्यात माझ्या आजोबा- पणजोबांच्या वयाचा असता. तरीही तो माझ्या तरल भावविश्वातला एकारान्त शम्मी "च".  

आज हे लिहीतानाही तो क्षण जसाच्या तसा आठवतो आहे. 

खरंतर तुमने मुझे देखा या गाण्यातली त्याचे नजरेतले भाव होते ते खरंतर त्याच्या नूकत्याच गेलेल्या लाडक्या गीता बाली साठी होते. ती नजरेतली आर्तता एका अस्सल प्रियकराची होती. कांजण्या झालेल्या आणि मृत्यूशी झुंज देताना अपयशी ठरलेल्या आपल्या प्रियतम बायकोसाठी तो गाणं म्हणत होता. त्याच्याबद्दलच्या सगळ्या चांगल्या वाईट बातम्या, अफवा सर्वांना धीराने तोंड देत, सतत त्याच्या पाठीमागे गीताबाली उभी राहात आली होती आणि तोच आधार त्याच्या नजरेसमोर कोसळत असताना शम्मीमधला कलाकारही खचत चालला होता. लग्न केलं तेव्हा गीताबाली प्रसिद्ध नायिका होती आणि शमशेरराज कपूरचे तोपर्यंत "द शम्मी कपूर" मध्ये रुपांतर व्हायचे होते. 

जानेवारी १९६५ मध्ये गीता बाली गेली. ऑक्टोबर १९६६ मध्ये तिसरी मंजील पूर्ण होऊन रिलीज झाला. मधल्या पावणेदोन वर्षांत शम्मी पूर्ण खचून गेला होता. १९६८ मध्ये आलेल्या ब्रह्मचारी सिनेमाने त्याला बेस्ट ॲक्टरचं ॲवार्ड मिळवून दिलं खरं. याच काळात त्याचं वजन वेगाने वाढत होतं. नीला देवी यांच्याशी त्याने दुसरं लग्न केलं आणि स्वतःच्या मर्यादा पूर्ण ओळखून असलेल्या शम्मीने चरित्रात्मक भुमिका निवडल्या. मग त्याने सिनेमे केले खरे पण त्यात "द शम्मी कपूर" ची जान नव्हती. आणि त्याने स्वतःहूनच सिनेमातून रिटायरमेंट घेतली. 

मी कॉलेज संपवून पोस्टग्रॅज्युएशनच्या अभ्यासात गुंतले... त्याच सुमारास एकीकडे मी जिथे कुठे छापून आलंय ते वाचत असायचे. हे सारं समजत गेलं आणि अभिनेता म्हणून प्रेमात होतेच आणि मनापासून आनंदी आयुष्य जगणारा माणूस म्हणून तो कांकणभर अधिकच आवडत गेला. पडद्यावर इतका धुमाकुळ घालणारा हा प्रिन्स सिनेक्षेत्रापलिकडे मात्र स्वतःच्या लेकरांत, बायकोत रमणारा कुटूंबवत्सल पुरूष होता.  

सिनेमात हिरॉईनशी शारीर सलगी करून, बिनधास्त उघड उघड तिच्या नजरेला नजर देत तिला जागीच आपल्या प्रेमात पाडणारा, दिलखेचक अदा करून बेधुंद नाचणारा तो एक निळ्या डोळ्यांचा राजकुमार होता. प्रोफेसर, तिसरी मंजील सारखे मोजके सिनेमे वगळता तो अभिनयाच्या फंदात पडला नाही. अभिनयाचं वगैरे बघायला बाकी सुसंस्कृत, अतिआदर्शवादी, नाकासमोर चालणारे, गोग्गोड बोलणारे बाकीचे होतेच की. त्यांचाही अपना अपना एक फॅनक्लास होता. पण शम्मी हा शम्मीच होता.  वास्तवातल्या प्रेमाची शारीर ओढ शम्मीनं खास त्याच्या स्टाईलने पडद्यावर पहिल्यांदा दाखवली. एका अर्थाने तो काळाच्या पुढेच दोन पावलं चालणारा... 
पडद्यावर जसा तो काळाच्या पुढेच होता तसा वास्तविक आयुष्यात तो रसरसून आयुष्य जगत भविष्याचा वेध घेणारा माणूस होता. 

२००६-२००७ मध्ये माझी अजून एक मजा झाली.  पोस्टग्रॅज्यूएशनला IT in library अशा काहीतरी नावाचा स्वतंत्र शंभर मार्कांचा पेपर होता. तेव्हा इंटरनेटच्या हतिहासाच्या संदर्भांत नोटस काढताना एक छोटं आर्टीकल हाती लागलं. कोपर्‍यात शम्मीचा फोटो आणि website programming language बद्दलची माहिती असं काहीतरी होतं ते. मला धक्काच बसला. शम्मी इतका टेकसॅव्ही इतका काळाच्या पुढे जाऊन विचार करणारा आहे हे तोपर्यंत मला माहितीच नव्हतं. अजूनही जुन्या नोटसमध्ये ते आर्टीकल असलं तर असेलही. मी लगेचच बॅग आवरली. घरी आले. तो ऑर्कुटचा जमाना होता. ऑर्कुट सुरू केलं. शोधाशोध केल्यावर असंख्य फॅनगृप्स दिसले. सोशल मिडीया कन्सेप्ट बाल्यावस्थेतच होती. पण त्या ऑर्कुटवर सर्वात मोठी फॅनलिस्ट लता खालोखाल शम्मीची होती हे आमच्या आजच्या पिढीला माहिती देखील नसेल.  त्याची स्वतःची वेबसाईट आहे हेही समजलं. खरा धक्का पुढेच बसायचा होता. ज्याकाळात आपल्यामधील अनेकांना कॉम्पुटर, इमेल, इंटरनेट हे शब्दसुध्दा माहीत नव्हते, या गोष्टींचा प्रसार झाला नव्हता, त्याकाळी तो त्याचा वापर करीत असे. अनेकांसाठी तो भारतातला पहिला इंटरनेटचा गुरू होता. कॉम्प्युटर टेक्नॉलॉजी चा पहिला "C" भारतीय लोकांपर्यंत पोचला नव्हता त्या काळात त्याने लंडनहून खास हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर मागवलं होतं. १९६०च्या दशकातच तो स्वतः website programming (HTML वगैरे) शिकला आणि कपूर खानदानाची वेबसाईट स्वतः तयार केली. VSNL ने अधिकृतरित्या सामान्य लोकांपर्यंत इंटरनेट पोचवण्याआधीच ज्या बड्या लोकांपर्यंत इंटरनेट आलेलं होतं त्यातला एक माझा "द शम्मी कपूर" आहे हे समजल्यावर मला ती रात्र झोप लागली नव्हती. 

याहू डॉट कॉम वेबसाईट जेव्हा भारतात लॉन्च झाली तेव्हा शम्मी कपूरला आदराने तिथे निमंत्रण दिलं गेलं होतं ते त्याच्या टेकसॅव्ही असल्यामुळेच. पण प्रत्यक्षात त्याच्या जंगली सिनेमातल्या याऽऽहु या सुप्रसिद्ध आरोळीमूळे गमतीदार गैरसमज सामान्य लोकांमध्ये तयार झाले. अनेकांना; अगदी त्याच्या कुटूंबातील लोकांना देखील वाटायचं की शम्मी कपूर याहू इंडीया वेबसाईटचा मालक आहे ! शम्मी ने स्वतःच एका मुलाखतीत हसत हसत म्हटलेलं की, " एक दिवस रणधीर जवळ आला आणि म्हणाला, काका आम्हालाही माहिती नव्हतं की याहु इंडिया चे हक्क तुमच्याजवळ आहेत. मी त्याला म्हणालो; बाबा रे, याहूचा मी खरोखरच मालक असतो तर आज मी इथे तुमच्याजवळ नसतो राहिलो. अमेरीकेत राहिलो असतो... " 

मध्यंतरी सिनेमा बघण्यापलिकडे आणि रोजचा पेपर वाचण्यापलिकडे माझं वाचन कमी झालेलं. रणबीर कपूर - त्याचा नातू सिनेमात आलाय, त्याच्या बातम्या वाचल्या पण त्याचा सिनेमा पाहिला नव्हता. अचानक एक दिवस समजलं, रॉकस्टार मध्ये शम्मी आहे. त्याच्या शॉट्स पूरता तो सिनेमा पाहिला आहे. रॉकस्टारची गाणी तेवढ्यापूरती गुणगुणावी वाटली तरी तो सिनेमा अजूनही पाहिलेला नाही. खुप नंतर रणबीर कपूरचे बाकीचे सिनेमे पाहिले. आवडलेत पण माझा मेंदू आजही रणबीर आणि शम्मी यांची नकळत तुलना करतोच करतो. 

२०११ मध्ये मी एका emotionally confused stage मध्ये होते. माझ्या आयुष्यात नक्की काय चाललं आहे, कोणासाठी चालू आहे हे सर्व मला समजत नव्हतं... तयार होऊ पाहणारं अलवार नातं एका दिवसात खाड्कन तुटलं होतं... त्या काळात शम्मीचा किडनीचा विकार बळावलाय हेही समजायचं. तो काही आपल्या वयाचा नाहीय. तो जाणारच आज न उद्या हेही मी जाणून होते. माझं त्याच्यासाठी पागल असणं याबद्दल आमच्या घरात काहीसा मिस्कील सुर असायचा. पण मला ते आवडायचं...  " तो " तर निघून गेलाय माझ्या वास्तव आयुष्यातून, आता "शम्मी कपूर" ही माझ्या हळव्या स्वप्नांच्या जगातून जाणार... खरंतर ही एका व्यक्तीची दुसर्‍या व्यक्तीसोबत केलेली विचित्र आणि वरवर विनोदी वाटणारी तुलना आहे. हे ही मेंदूला समजायचं. पण माझं मन ते मानायला तयार नव्हतं. 

आणि १४ ऑगस्ट २०११ ला शम्मी गेलाच ... मी नंतरचे अनेक महिने यंत्रवत जगत होते. बरं हे कोणालाच काही न सांगता येण्यासारखं नव्हतं. परक्याला हा प्रसंग ठार विनोदी देखील वाटू शकेल इतका खोलवर आघात मला शम्मीच्या मृत्यूने आणि त्या ब्रेकअपने झाला होता. तेव्हा  जवळपास रोज रात्री मला वाटायचं, टाईम मशीन मध्ये बसावं आणि चांगलं दोन तीन पिढ्या आधीच जन्माला यावं. कॉम्प्युटर, इंटरनेट, ऑटोमेशन याच्याआधीचं संथ आयुष्य जगायला मिळावं. 

आज जवळपास अकरा वर्षांनंतर कसं कोण जाणे हे ब्लॉगसाठी लिहावं वाटलं.... 


टीपः त्याचे सगळे सिनेमे मला प्रचंड आवडतात. 
तरीही काही मस्ट वॉच: 
१. तिसरी मंज़िल
२. राजकुमार (प्रिन्स नावाचा वेगळा सिनेमा आहे.)
३. जंगली
४. प्रोफेसर
५. कश्मीर की कली
६. An evening in Paris
७. ब्रह्मचारी 

12 July, 2020

रात हमारी तो... (परिणीता)

परिणीता मला अनेक कारणांमुळे आवडतो. तो सिनेमा पाहायचा तर त्या दोघांच्या लव्हस्टोरीसाठी बघावा... आणि संजय दत्त / रेखा / आणि बाकी सगळी मेलोड्रामॅटीक लोक पडद्यावर येतात तेव्हा डोळे मिटून घ्यावेत... रेखाच्या जुन्या सिनेमांवर फिदा असलेल्या रेखाला या सिनेमात पाहणं माझ्यासाठी नकोसं होतं... रेखा हा खरंतर एका स्वतंत्र पोस्टचा विषय आहे... असो. रेखा आठवली की भरकटायला होतंच!


एकमेकांशी प्रेमात एकनिष्ठ असणं ही भावना आहे... लग्नसंस्था त्याला फक्त सामाजिक आणि कायदेशीर मान्यता देते इतकंच. हे असं एकनिष्ठ आणि तरीही

स्वाभिमानी असणं विद्या बालनने सहज अभिनयातुन दाखवलाय. कपाटातुन पैसे घेणं... जाऊ नकोस म्हटल्यावर रेखाच्या नाईट क्लबला न जाणं.. वगैरे अनेक प्रसंग आहेत.


पण एक इनमिन पाच-सात मिनिटांचा शॉट आणि त्याला जोडुन आलेलं गाणं मेरे दिल के बहोत करीब है...


लोलिता ... इथे ललिता असा मराठीतला वेडपट उच्चार करायचा नसतो... हां तर ... लोलिताचे वडील आजारी पडल्यावर शेखर त्यांना आणि खरेतर लोलिताला भेटायला आलेला असतो. तिथे आल्यावर शेखरला समजतं की गिरीशच्या खर्चाने लोलिता आणि तिचं कुटूंब परदेशात जातंय.. तिच्या वडलांच्या उपचारासाठी. आधीपासुनच चिडलेला शेखर याही वागण्याचा जाब विचारायला लोलिताकडे जातो आणि तेव्हा शेखरशी जुजबी बोलून गिरीशशी (संजय दत्त .. यांना दुसरा कोणी भेटला नाही का ) सहजपणे बोलत बोलत लोलिता बाहेर जाते. ते पाहून शेखर अजुनच भडकतो. पण त्याला तिच्याशी बोलण्याची गरजही वाटत नाही... (टीपिकल जुन्या काळचा नवरा फिलींग... मेरे होते हुए तुमने ऐसा किया क्यू टाईप्स) शेखर तरातरा पायऱ्या उतरतो आणि भराभर गिरीशशी बोलणं संपवून ... त्याला औषधं आणायला कटवून लोलिता शेखरला भेटते. पायऱ्यांवर फक्त दोघेच पायरीवर असतात... विलक्षण वेगाने आणि आसुसून ती त्याला पाठुन मिठी मारते ... त्या एका मिठीत, चेहऱ्यावरचे भाव सगळं सांगतात... तिचा एकलेपणा... माझा शेखर लग्नाला तयार झाला असेल तरीही तो मनापासून नाही हा विश्वास... कम्यूनिकेशन गॅप असली की हे असं होतं याची जाणीव... ती उत्कटता...


पुढे लोलिता म्हणते, "अब सबकुछ ठीक हो जायेगा." त्या एका वाक्यात तिचा त्याच्याबद्दल असलेला दृढविश्वास शब्दात व्यक्त होतो. नवरा-बायकोने कधीही सर्वासमोर उघड प्रेम दाखवु नये हा त्याकाळचा संस्कार सगळं काही त्या एका मिठीत दिसलाय.


पण भडकलेला शेखर तिचं काहीही ऐकून घेत नाही. त्या दोघांची भांडणं होतात ... तो तिला अद्वातद्वा बोलतो. तिला अवाक होऊन ऐकत राहते. आणि स्वतःची बाजू सांगायला जाते पण खाडकन तिच्या कानफटात वाजवून तो निघून जातो. शेखरचं हे रूप पाहून कमालीचा धक्का बसलेली लोलिता पायरीवर बसते. मागून सूर वाजतात. गाणं वाजायला लागतं. ...रात हमारी तो


कालांतराने सैफ लग्न करायचं ठरवतो आणि तिचं भावविश्व साफ कोलमडते. तिचा स्वाभिमान इथून पुढे फक्त आणि फक्त प्रसंगातून आणि अभिनयातुन दिसतो...


एका प्रेयसीच्या नंतर बायकोच्या नात्याने त्याच्या कपाटातुन घेतलेले सारे पैसे कर्जाऊ होतात आणि ती एक अक्षर मेलोड्रामा न करता गिरीशच्या हातून घराचे पेपर्स पाठवते. तिथून पुढचा मेलोड्रामा बघण्याचा उत्साह मला नसतो. आणि आतापर्यंतच्या अवीट गोडीच्या गाण्यांचा आणि त्यांच्या लव्हस्टोरीचा मझा मी किरकिरा करत नाही.




रात हमारी तो... स्वानंद किरकिरे

पक्ष्यांच्या दुनियेत - भाग - ४ (गायबगळा आणि ढोकरी)

गायबगळा (Cattle Egret)


बदलत्या (खरंतर अस्वच्छ!) परीस्थितीतही अजुनपर्यंत टिकुन राहिलेल्या बगळ्यांच्या जातीमधील बगळा म्हणजे “ग़ायबगळा”...

सडपातळ बांध्याचे गायबगळे विणीच्या हंगामाव्यतिरिक्त पांढरे शुभ्र दिसतात. सोनसळी पिवळ्या रंगाचे डोळे, भाल्यासारखी निमुळती, टोकदार चोच, पायांवर पिसांचा अभाव, नर-मादी दिसायला एकसारखी... “व्ही आकाराच्या रेषेत” थव्याने उडताना दिसतात तेव्हा ‘बगळ्यांची माळफुले अजुनि अंबरात’ ह्या भावगीताची आठवण झाल्याशिवाय राहात नाही. पाळीव गाई-म्हशी, बैल, जंगलांमध्ये – रानरेडे, गेंडे, गवे अशा प्राण्यांच्या पाठीवर बसुन निर्वेधपणे राजासारखे हिंडतात. त्यांच्या पायाने उडणारे शेती, पाणथळींच्या ठिकाणी असणारे किडेमकोडे, नाकतोडे, चतुर, टोळ तर खातातच शिवाय प्राण्यांच्या पाठीवरचे, कानामागचे चिलटे, गोचीड वगैरे किटक खातात आणि कासावीस झालेल्या त्यांच्या जिवाला थोडा दिलासा देतात. 

गायबगळे खरंतर एकावेळेस ५०-५० च्या संख्येने एकत्र राहणारे पक्षी, पण वाढत जाणार्‍या शहरीकरणामुळे आणि बेफाम, अविचारी वृक्षतोडीमुळे सर्वच प्रजातीमधील बगळ्यांची संख्या झपाट्याने कमी होते आहे. दिवसभराच्या खाण्याच्या शोधासाठी उडुन-फिरुन थकलेले हे गायबगळे संध्याकाळी रातनिवा-यासाठी (roosting) चिंच, आंबा, वड, पिंपळ अशा आपल्या ठरलेल्या झाडांकडे झेपावतात. त्यातही अशा प्रकारची झाडे शक्यतो माणसांच्या वस्तीनजीक असल्यास त्यांना घुबड आणि गरुड-घारीसारख्या शिकारी पक्ष्यांपासुन असलेला धोका कमी होतो. त्यांना घरटी बांधणे सुरक्षित वाटते. एकाच वेळेस पुर्ण ५०-६० पक्ष्यांच्या थवा वर्षानुवर्षे एकाच झाडावर रात्री राहण्यासाठी आणि काही ठिकाणी तेथेच घरटी बांधायला राहतो. अशा झाडांना सारंगागार असंही म्हटलं जातं. व्यंकटेश माडगुळकर, मारुती चितमपल्ली यांच्या लेखांमध्ये या सारंगागाराची सुरेख वर्णने आहेत. “हा सृजनाचा सोहळा” पाहात राहणे अतिशय विलक्षण असते असंही माडगुळकरांनी त्यांच्या एका पुस्तकात म्हटले आहे.

आपल्या पनवेल गावाच्या थोडं बाहेर आता जिथे डोमिनोज पिझ्झाचं आऊटलेट आहे तिथे आणि तिथुनच जवळ असलेल्या पंचमुखी मारुतीच्या देवळाजवळ बगळ्यांची दोन झाडे होती. अलिबागला जाता-येता दरवेळेस पनवेलमध्ये शिरताना संध्याकाळ व्हायचीच. तेव्हा तिथला फ्लायओव्हरही नव्हता. बगळ्यांचा कालरव सरावाने ऐकु यायचा. आणि पाठोपाठ ते देऊळ दिसायचं. ती झाडे दोन्ही माणसांच्या वस्तीजवळ होती आणि जवळच काळुंद्रे नदीचं पाणी वाहायचं. सारंगागार म्हणुन आदर्श जागा होती ती... कालांतराने रस्ता रुंदीकरणात देऊळ ठेवलं आणि ती दोन्ही झाडे मात्र तोडली गेली. बगळ्यांचे निवासस्थान कायमचे गेले. कोणाला न खेद, न खंत! गेल्याच वर्षीच्या पावसाळ्यात बल्लाळेश्वर तलावामध्ये बगळ्यांचा लहान थवा दिसला होता पण आता या वर्षी अविचारी बुजविण्यामुळे तिथुनही जवळपास सारेच पाणपक्षी गायब झालेत.


ढोकरी (Indian Pond Heron)

ढोकरी म्हणजेच हेरॉन च्या प्रजातीदेखील अगदी सहजपणे पाणथळ जागी, धरणे, पाण्याचे कालवे, खाडीची दलदल, शेती इत्यादी ठिकाणी दिसुन येतात. सोबत दिलेला फोटो इंडियन पॉन्ड हेरॉन या जातीच्या पक्ष्याचा आहे. याशिवाय राखी ढोकरी (Grey Heron), जांभळी ढोकरी (Purple Heron) तसेच उरण आणि पणजे गावाजवळील पाणथळी (uran and panje wetlands conservation area) असणारी रातढोकरी (Black  Night Heron) इत्यादी प्रजाती सहजपणे दिसतात. 

दिसायला कोंबडीएवढ्या आकाराचा मातकट पाठीचा आणि पांढर्या  पंखांचा हा पक्षी कोकणातील भातखाचरांमध्ये सहजपणे दिसतो. भातखाचरांमधील खेकडे, कोळी, छोटे मासे, बेडुक हे यांचं मुख्य खाद्य... भातांची रोपे आपसुक सुरक्षित राहात असल्याने शेतकरीदेखील हाकलुन लावत नाहीत. कोकणात त्यांना भुरे बगळे असंही त्यांना म्हटलं जातं. गळा, मान आणि छातीच्या बाजुस पांढर्याु रंगावर पिवळ्या- गडद तपकिरी रेषांमुळे आणि खाद्य पकडताना अतिशय निश्चल उभा राहात असल्याने पटकन आजुबाजुच्या वातावरणात इतका मिसळुन जातो की एकदम उडाल्यावरच लक्षात येतो. इतर बगळ्यांप्रमाणेच हेरॉन्स देखील थव्याने एकत्र शक्यतो एकाच झाडांवर वस्ती करतात. 


इंग्रजी भाषेतील “Heronry” म्हणजे आपल्याकडील सारंगागार शब्द यांच्याचवरुन आलेला आहे. बेसुमार वृक्षतोडीमुळे आणि दिवसेंदिवस कमी होत जाणार्याक पाणीसाठे, प्रदुषित होणारे नदीकिनारे, खाडीकाठची दलदल यांच्यामुळे हेरॉन्स, इग्रेट, आयबिस, इत्यादी पक्ष्यांची संख्या झपाट्याने कमी होते आहे. हे सारेच पाणपक्षी आणि त्यांची सारंगागारे निसर्गचक्रात महत्वाची भुमिका बजावतात. ह्या पक्ष्यांची विष्ठा जमवुन त्यांचे शेतजमिनीत खत म्हणुन वापर केला जातो. तसेच ह्या पक्ष्यांचे मुख्य खाद्य टोळ, चतुर, गोचीड, सरडे यासारखे किटक आणि बेडुक, खेकडे यासारखे पाण्यातले लहान प्राणी हे ह्या प्रकारच्या पक्ष्यांचे मुख्य खाद्य असल्याने खरंतर पिकांवरील कीड नैसर्गिकरीत्या नियंत्रणात राहण्यास मदत होते. महाराष्ट्रात सर्वच ठिकाणी झपाट्याने सारंगागारे कमी होत असताना मात्र गडचिरोली जिल्ह्यातील वघाळा या गावी मात्र असलेल्या मोठ्या सारंगागारचे रक्षण तेथील गावकरी मोठ्या प्रेमाने करत आहेत...


पक्ष्यांच्या दुनियेत - भाग - ३ (खंड्या आणि भारतीय नीलपंख)

लांब शीळ घालणारा खंड्या (white-throated kingfisher) आणि कर्नाळ्याच्या जंगलात आढळणारा भारतीय नीलपंख (Indian Roller) ह्या दोघांनी ऑक्टोबर महिन्याच्या अंकांत हजेरी लावलीय. खंड्या आपल्या पनवेलमध्ये बल्लाळेश्वरचा तलाव आणि फडके नाट्यगृहासमोरचा देवाळे तलाव इथे अगदी सहजपणे दिसतो. बल्लाळेश्वरच्या तलावाचे बुजविणे सुरु केल्यापासुन तिथुन या खंड्याचे जातभाई “Pied Kingfisher” यांना आपला बाडबिस्तरा हलवावा लागलेला आहे. खरंतर मला पांढर्‍या गळ्याच्या खंड्यापेक्षा हा Pied KF जास्त आवडतो. कारण त्याचं पाण्यावर गोल घिरट्या घालणं, २-३ सेकंद एकाजागी स्थिरपणे पंखांची फडफड करत(process of hovering) अचानक एका क्षणी सुर्र्कन पाण्यात बुडी मारुन मासोळी पाण्यात बाहेर काढणं(and catching fish)... हे सारं सारं तो ज्या सफाईदारपणे आणि ज्या नजाकतीने करतो ते पाहाणं लक्षवेधक असतं. पण खंड्यावर कॅमेर्‍याचा डोळा ठेवुन ह्या हालचाली फोटोत पकडणं मात्र सारा श्वास रोखुन धरण्याचा आणि शटरस्पीडचा खेळ ! त्यामानाने पांढर्‍या गळ्याचा खंड्या मात्र तुलनेने सुशेगात असतो. तरीदेखील त्याला उडताना आणि खाद्य पकडताना मात्र फोटो काढणं तितकंच कर्मकठीण. आपल्या सावजावर एकाग्रपणे लक्ष ठेवुन निमिषार्धात सुरु मारुन त्याला पकडणं ह्या कलेमध्ये “बकध्याना”नंतर ह्या खंड्यांचाच नंबर लागतो.




पांढरा गळा, निळ्या-मोरपिशी रंगाचे पंख, गडद लाल-गुलाबी रंगाची चोच आणि चमकदार तपकिरी रंगाचे डोके आणि मान यामुळे पक्षी आकाराने लहान असला तरी सहज दिसुन येतो. त्याची नजर मोठी वैशिष्ट्यपुर्ण असते. खंड्या पक्षी जेव्हा हवेत किंवा पाण्याबाहेरुन पाण्यात बघत असतो तेव्हा याचे दोन्ही डोळे स्वतंत्रपणे काम करतात (monocular) आणि ज्या क्षणी तो पाण्यात सुर मारतो त्याक्षणी त्याच्या नजरेला मेंदुकडुन सिग्नल्स जातात आणि दोन्ही डोळे एकच काम करु लागतात (binocular stage). जिवंत खेकडे आणि मासे हे सर्वच खंड्या जातवर्गाचे मुख्य अन्न. पाणथळ जागा, तलाव आणि आता बदलत्या हवामानाशी आणि बदलत्या जागांशी जुळवुन घेत हे खंड्या आजकाल कोळीवाड्याच्या आसपास देखील दिसतात. पण तेव्हा मात्र पोटात कालवल्याशिवाय राहात नाही. कारण जिवंत मासे-खेकडे पकडणे आणि एखाद्या खडकावर आपटुन खाणे ही त्यांची खरी सवय आणि शरीराची गरज आहे. 

आपल्या पनवेलमध्ये आगरी समाज हॉलच्या बाजुच्या परीसरात, पटेल हॉस्पिटलच्या बाजुने त्या समोरच्या तलावावरुन जाणार्‍या तारेवर बसुन हे महाराज मजेत हेलकावे घेत असतात आणि मधुनच एखाद्या टारगटाने तारस्वरात लांब शिट्टी वाजवावी तशी त्यांची खास शिट्टी वाजवतात. अगदी पहिल्यांदा भर दुपारी १२ वाजता मी समोर आलेल्या टेम्पो-बाईक-ऑटोरीक्क्षांचे हॉर्नस या सर्व कोलाहलामधुन याची शीळ फारच जवळुन ऐकली आणि दचकलेच. एकतर तो तापलेला उन्हाळ्याचा दिवस, हातात भाजीच्या पिशव्या आणि रस्त्यावरच्या गाड्या ओंलाडुन समोर बसलेल्या नारळवाल्याकडे कसं जावं याचा विचार करत असताना ह्या खंड्याने जोरकस शीळ घातली. आणि मला काही समजायच्या आत मी १८० अंशांत फिरुन माझी मान तलावाकडे आणि त्यावरच्या वायरकडे ! इतकं की बाजुने जाणार्‍या बायकरने काय येडपट बाई आहे असं पाहिलं देखील. हे पनवेलमधलं खंड्याचं पहिलं दर्शन. सोबत दिलेला फोटो तर मी आगरी समाज हॉलच्या परीसरात खंड्या होता तेव्हा काढलेला आहे. 





भारतीय नीलपंख मात्र सहसा शहराजवळ दिसत नाहीत. मात्र नीलपंखाची नोंद कर्नाळ्याच्या जंगलात झालेली आहे. मैंनेहुन किंचितसा लहान आणि निळ्या-तपकिरी रंगांचा हा अतिशय देखणा पक्षी जेव्हा हिरव्या झाडांच्या आणि फिक्या निळ्या आकाशाच्या पार्श्वभुमीवर हवेत भरारी घेतो तेव्हा त्याला फोटोमध्ये अचुक पकड्ण्यासाठी हौशी फोटोग्राफर्समध्ये मोठी चुरस लागते.... असंख्यवेळा क्लिकक्लिकाट केल्यावर एखादाच फोटो मनासारखा येतो आणि फ्रेम होऊन हॉलच्या भिंतीवर विराजमान होतो. या पक्ष्यांचे पंख आणि शेपटी उडताना गडद निळे दिसतात. छातीचा आणि पाठीचा रंग तपकिरी, आणि चोच काळ्या रंगाची असते. भारतीय नीलपंख खुल्या मैदानी भागात, पानगळीच्या जंगलात, शेताच्या जवळ, रस्त्याच्या कडेने असलेल्या विद्युत तारांवर दिसतो. याचे खाद्य कीटक, बेडुक, पाली हे आहे. मुंबई-पुणे रस्त्यावर किंवा पेण-अलिबाग रस्त्यावरती कमी वर्दळीच्या जागीदेखील हा नीलपंख सहज दिसुन येतो. 

दक्षिण भारतातातील काही राज्यांचा हा राज्यपक्षी आहे. गमतीशीर गोष्ट म्हणजे त्याच्या या निळ्याशार रंगामुळे त्याला काहीसं धार्मिक महत्व प्राप्त झालेलं आहे. काही भाषांच्या लोककथांमध्ये ह्या पक्ष्याला शंकराचं रुप मानलेलं आहे. (कृष्ण का नाही? तोही निळाच होता की...) तसेच दसर्‍याच्या दिवशी ह्या पक्ष्याचं दर्शन होणं अत्यंत शुभ आणि धनप्राप्ती होणार असल्याचं मानतात. !

03 September, 2019

पक्ष्यांच्या दुनियेत- भाग २ (सुर्यपक्षी)


महाराष्ट्रात सुर्यपक्ष्यांचे सामान्यपणे चार ते पाच प्रकार दिसतात.
(1) purple sunbird
(2) purple-rumped sunbird (with its different eclipsed plumage stages)
(3) Crimson-backed Sunbird
(4) Loten’s Sunbird.

जवळपास सर्वच सुर्यपक्ष्यांची हालचालीमध्यें आणि राहण्याच्या, अन्नाच्या सवयींमध्ये फारसा फरक नसतो. कायमस्वरुपी निवासी असलेले किंवा बदलत्या ऋतुप्रमाणे देशांतर्गत स्थलांतर करणारे हे चिमणीपेक्षा लहान आकाराचे पक्षी आहेत. माळरानांच्या जोडीलाच अगदी आपल्या बागांमध्ये, उद्यानांमध्येही हे पक्षी सहज दिसुन येतात. आकाराने लहान असल्याने शिकारी पक्ष्यांकडुन, मांजरींकडुन शिकार होण्याचे भय अधिक आणि म्हणुनच सतत इकडेतिकडे वेगाने उडत राहणे हा या पक्ष्यांचा स्थायीभाव. शहरांमध्ये लोकप्रिय होत असलेल्या गच्ची बागेमध्ये पाण्याची उथळ, पसरट परातीच्या आकाराची भांडी ठेवली तर मात्र ठराविक वेळेस हे सुर्यपक्षी तिथे येऊन पाण्यात डुंबण्याचा आनंद अनुभवताना हमखास दिसतात. पण आपल्या बिल्डिंगच्या आसपास काटेसावर, गुलमोहर,फणस, पळसासारखी झाडे असली आणि वर्दळ कमी असली तर हे पक्षी अगदी जवळुन पाहायला मिळायची शक्यता अधिक असते. लांब आणि टोकेरी चोचीच्या सहाय्याने पळस, जास्वंद, चाफा, रुईची फुले, सोनटक्का यासारख्या फुलांमधले रस पिणं, आसपासचे किटक, बारीक अळ्या हे यांचं आवडतं खाणं. इतर निवासी पक्ष्यांप्रमाणेच मार्च ते जुन हा याही पक्ष्यांचा विणीचा हंगाम. इतर वेळेस काहीसे फिकट दिसणारे ह्यांच्या पिसांचे रंग अधिक आकर्षक होतात आणि लाल रंगांच्या पळस-पांगार्‍याच्या पार्श्वभुमीवर हे लाल-पिवळे-काळे तजेलदार रंगांचे देखणे पक्षी प्रकर्षाने लक्षात येतात. आपल्या सामान्य लोकांच्या लक्षात येणारा फरक म्हणजे या सर्व पक्ष्यांचे बदलते आणि आकर्षक होणारे रंग.

त्यातले चटकन ओळखता येणारे आणि आपल्या शहरी भागात दिसणारे दोन सुर्यपक्षी आहेत. जांभळा सुर्यपक्षी (Purple Sunbird) आणि शिंजीर किंवा जांभळ्या पाठीचा सुर्यपक्षी (Purple-rumped sunbird).


जांभळा सुर्यपक्षी (Purple Sunbird):
विणीचा हंगामात नराचा मुळचा तपकिरी रंग बदलला जातो आणि चकचकीत काळा होतो. अंगावर उन पडल्यावर हा काळा रंग जांभळा दिसतो म्हणुनच ह्याला जांभळा सुर्यपक्षी असं म्हटलं जातं आणि मादीचा रंग वरच्या बाजुला हिरवट आणि खालच्या बाजुला पिवळा असतो. आपल्या पनवेलमध्ये गोखले हॉल समोरच्या असलेल्या सरकारी वसाहतींच्या आसपास आणि गार्डन हॉटेलच्या परीसरात मला एक-दोन वेळा जांभळा सुर्यपक्षी अचानकपणे दिसुन आला होता. कर्नाळ्याच्या जंगलात तर हा जागोजागी दिसतो.




जांभळ्या पाठीचा सुर्यपक्षी (purple rumped snbird) आणि गेल्यावेळेस सांगितलेला शिंपी पक्षी ह्यांच्या आकारात आणि आवाजात कमालीचे साम्य असले तरी सुर्यपक्ष्याच्या टोकेरी आणि टोकाशी किंचित वाकड्या असलेल्या चोचीमुळे हा शिंजीर लक्षात राहतो. या सुर्यपक्ष्याच्या नराचे डोके चकाकदार हिरवे, पाठीच्या वरच्या बाजुला लाल-चॉकलेटी रंग, खालच्या बाजुची पाठ आणि मान चमकदार जांभळ्या रंगाची अशा अफलातुन रंगांमुळे हे सुर्यपक्षी उन्हात आले की कमालीचे लोभसवाणे दिसतात. मादी मात्र तुलनेने अनार्षक दिसते...वरच्या बाजुस राखाडी-तपकिरी आणि खालची बाजु पिवळी....बस्स! तिच्या बाबतीत रंगांचा खेळ संपला. 

पनवेलमध्ये शहरात अजुनतरी मला हा पक्षी कमीवेळा दिसलाय. नाही म्हणायला एक-दोनदा जुन्या भाजीबाजारात पंचमुखी मारुतीच्या देवळाजवळ आणि रोटरी गार्डनच्या आसपास हा दिसला.

15 August, 2019

अच्युत गोडबोले यांची फेसबुकवरील पोस्ट.

स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा.
वाढदिवस..
आज १५ ऑगस्ट म्हणजे स्वातंत्र्य दिन आणि माझा वाढदिवसही! मला चक्क ७०वं वर्ष सुरु होईल. “तुम्ही एव्हढे मोठे (म्हणजे म्हातारे!) असाल असं वाटत नाही.” असं मला अनेक जणं म्हणतात. पण एव्हढं म्हातारं न दिसण्यामागचं रहस्य केस रंगवण्यात आहे हे अजून लोकांच्या लक्षात आलेलं नाहीये. पण आता थकवा जाणवतो. माझं लिखाण आणि भाषणं यांचा वेग जरी कमी झाला असला तरी ते अजून चालूच आहेत. अजून मला माझी काही ४-५ मुख्य पुस्तकं पुढच्या २-३ वर्षांत पूर्ण करायची आहेत. आणि त्यानंतर काही वर्षं असलीच तर ती वाचनात आणि संगीत ऐकण्यात घालवायची आहेत.
तसं पाहिलं तर आयुष्याकडे मागे वळून पाहाताना मी बरंच कमावलं आणि बरंच गमावलं असं वाटतं. पैसा आणि प्रसिद्धी हे माझे खूप मोठे सोबती कधीच नव्हते, पण मी त्याबाबत खूपच समाधानी आहे. पण यापेक्षा जास्त महत्वाचं म्हणजे मला सामान्य वाचकांकडून प्रचंड म्हणजे प्रचंडच प्रेम मिळालं. अगदी लहान लहान तालुक्यांतल्या खेडयांपासून ते देशापरदेशांतल्या मोठ्या शहरांपर्यंत!आणि विशेष म्हणजे ज्येष्ठांबरोबरच हजारो तरुणांनीही मला खूपच उचलून धरलं. एखाद्या लेखकाला इतकं स्टारडम मिळेल असं मला स्वप्नातही वाटलं नव्हतं. नाटकं, सिनेमे किंवा ललित साहित्य लिहिणार्‍यांपैकी काहींना असं स्टारडम मिळालेलं आपण जाणतोच. पण विज्ञान, तंत्रज्ञान, अर्थशास्त्र, मानसशास्त्र, गणित आणि अनेक कला अश्या विषयांवर लिहिणार्‍याल्या समाजात इतका मान मिळू शकतो हे बघून मला खूप भारावून जायला होतं. त्यामुळेच मला लिहिण्याचं बळ येतं. मी सगळ्या वाचकांचा ऋणी आहे.
एक खंत मात्र सतत वाटत राहाते. आपण आयुष्यात काय मिळवलं ? मला अजूनही प्रचंड बेचैन करणारी गोष्ट म्हणजे मी ज्या प्रेरणेनं एकेकाळी समाज बदलायला निघालो होतो, त्या तर्‍हेनं समाज किंचितही बदलला नाही. इतकंच नाही तर तो दिवसेंदिवस जास्तच वाईट होत चाललाय. इथे मी कुठलाही इझम किंवा कुठलाही पक्ष यांचा विचार करत नाहीये. या सगळ्याच्या पलीकडे जाऊन आपण बघितलं तर गेल्या तीस वर्षांपासून आपण प्रचंड आत्मकेंद्री झालो आहोत. एव्हढंच नव्हे तर तसं होणं चांगलं, असंही म्हणायला लागलो आहोत. आज गुन्हेगारी आणि हिंसा पूर्वीपेक्षा खूपच वाढल्या आहेत. गेल्या ३० वर्षात भ्रष्टाचार प्रचंड वाढला, आतंकवाद वाढला, युद्धं आणि मारामार्‍या वाढल्या, विस्थापितांची संख्याही वाढली, धर्म आणि जातींमधली दरी वाढली, धर्म आणि जातीवरुन खून, मारामार्‍या आणि दंगली व्हायला लागल्या. विषमता वाढली आणि बेकारीही प्रचंड वाढली, सट्टेबाजीही वाढली. तेजी-मंदीचे बुडबुडे आणि अरिष्टंही वाढली. त्याचबरोबर रोजगारातली आणि एकूण आयुष्यातली अस्थिरताही वाढली. मनोविकार वाढले, नैराश्याचं प्रमाण वाढलं, आत्महत्या वाढल्या. शेतकरी, विद्यार्थी अश्या सगळ्यांच्या मिळून रोज भारतात १००० आत्महत्या होतात ! असा समाज माझ्या डोक्यातला आदर्श समाज होता का ? या समाजाला आपण सुखी म्हणायचं का ?
या सगळ्यांपेक्षा जास्त महत्वाची गोष्ट म्हणजे आपण गेल्या ३० पर्यावरणाची अपरिमित हानी केली. त्यामुळे सतत पूर, दुष्काळ, वादळं, अतिवृष्टी अश्या चित्रविचित्र गोष्टी अवकाळी व्हायला लागल्या आणि त्यातून अब्जावधी रुपयांचं नुकसान व्हायला लागलं; आणि त्यामुळे अनेक लोक मरायला लागले आणि कोट्यवधी बेघर व्हायला लागले. सध्या महाराष्ट्र, केरळ आणि कर्नाटक या राज्यांत एकीकडे दुष्काळ आणि दुसरीकडे पूर याचं जे अमानुष तांडव चाललंय ते या सगळ्याची साक्ष देताहेत. पूर्वीही यातल्या काही गोष्टी व्हायच्या पण त्यांची तीव्रता आणि वारंवारिता आज प्रचंड वाढली आहे. पण हे सगळं अचानक झालेलं नाहीये. या सगळ्यांमध्ये एक सुसूत्रता आहे. या सगळ्या गोष्टी फक्त मानवनिर्मितच नाहीयेत तर त्या आपल्या चुकीच्या समाज-अर्थव्यवस्थेमुळे आणि चुकीच्या विकासनीतीमुळे झालेल्या आहेत. या सगळ्या तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे वाढत्या उत्पादकतेचा फायदा फक्त १५-२० टक्के श्रीमंत लोकांना आणि फारफारतर थोडाफार मध्यमवर्गाला झाला. पण तो खालच्या ५०-६० टक्के लोकांपर्यंत खूपच कमी प्रमाणात पोहोचला. आणि त्यामुळे विषमता भीषण आणि बिभत्स दिसेल एव्हढी वाढली. तरीही ‘जी.डी.पी. वाढतोय, देशाची प्रगती होतेय’, अश्या घोषणा देऊन जगभर अनेक सरकारांनी जनतेला भुलवत ठेवलं. पण या जी.डी.पी. वाढीच्या अतिवेडामुळे (जीडीपीइझम) सतत प्रचंड ऊर्जा खाणारी आणि रोजगार निर्मिती न करणारी यंत्रं आणि रोबोज वापरुन फक्त वरच्या १५-२० टक्के लोकांसाठीच चैनीच्या चंगळवादी वस्तूंचं शहरांमध्ये उत्पादन करणारी एक विकासनीती आपण उभी केली आणि त्यामुळे गेल्या ३० वर्षांमध्ये वाढती विषमता, बेकारी आणि प्रदूषण या तीन राक्षसांची आपणच निर्मिती केली. ही विकासनीती आपण बदलली नाही तर तापमानवाढीमुळे या शतकाअखेरीस पृथ्वीचं आणि माणसाचं काय होईल हे सांगता येत नाही, अशी आज परिस्थिती आहे.
या उद्विग्नतेतूनच मी ‘अनर्थ’ हे पुस्तक लिहिलं. त्याला प्रतिसाद चांगला मिळतोय ही आनंदाची गोष्ट आहे. पण त्याचबरोबर सध्या दुष्काळ आणि पूर यांचं जे तांडव चाललंय ते या पुस्तकातल्या थिअरीला दुजोराच देतंय हे बघून वाईटही वाटतंय.
खरं म्हणजे आपण विकासाची व्याख्याच बदलली पाहिजे. विकास म्हणजे फक्त जीडीपीची वाढ असं न धरता, समाजातल्या प्रत्येकाचे शारीरिक, मानसिक, भावनिक, बौद्धिक, कौटुंबिक, सामाजिक आणि पर्यावरणीय असे सर्व विकास झाले पाहिजेत. तंत्रज्ञान वापरू नये असं मुळीच नाही; जीडीपीत वाढ करू नये असंही नाही, पण जेवढी वाढ निसर्गाला, पर्यावरणाला मान्य आहे, त्याचा विद्धंस न होता करता येईल तेवढीच वाढ व्हायला हवी. शिक्षण, आरोग्य, रोजगार, पाणी, वीज, रस्ते यांकडे लक्ष देऊन निदान सर्वांना समान संधी तरी उपलब्ध करून दिली पाहिजे. अपंग, वृद्ध, रुग्ण आणि अशा अनेकांची काळजी घेणारी शांतताप्रिय, विवेकवादी समाजव्यवस्था निर्माण करणं याला ‘खरा विकास’ म्हणता येईल. यासाठी शांततामय आणि लोकशाही मार्गानं एक चळवळ उभी करायची गरज आहे. त्यासाठीच खरं तर ‘अनर्थ’ लिहिलंय. माझ्या आयुष्यात मी फारसे सामाजिक बदल घडवून आणू शकलो नाही याची मला प्रचंड खंत आहे आणि ती मला सतत बेचैन करत असते. पण आता निदान शेवटी त्यात थोडाफार का होईना आणि जेव्हढा शक्य आहे तेव्हढा बदल घडवण्यासाठी मी माझ्या परीनं त्यात मतं मांडली आहेत. जरुर वाचा आणि वाचल्यावर काय वाटलं ते कळवा.
नमस्कार.
अच्युत गोडबोले.
achyut.godbole@gmail.com

Cafe Coffee Day: एक कप कॉफीने अनेकांचं आयुष्य बदलवलं !


#repost from my facebook wall:


व्यवसायातील अनेक गणिते चुकली असतीलही... पण "त्याने" अस्सल भारतीय brand तयार केला ! #CCD मध्ये भेटुयात असं सहजपणे म्हणायला "त्याने" शिकवलं... "Lot of things can happen over a cup of coffee" हा प्रेमाचा मुलमंत्र कळत-नकळत त्याने भारतीय तरुणाईला दिला. दोष दाखवणंं सहजशक्य असतं पण समानतेच्या नवीन कल्पना टिपिकल महान आणि सोवळ्या (?) भारतीय संस्कृतीमध्ये रुजवणं, त्या फुलवणं तितकंच कठीण !!!


#CCDMemories It was not our "First Romantic Date" It was not his first time to be in CCD. But It was my first time to go in CCD. सीएसटीला सगळे बोर्ड आणि जाणार्‍या-येणार्‍या गाड्या बघत २०-२५ मिनिटं वेळ घालवला होता. अनेकवेळा फोना-फोनी झाल्यावर त्याने सांगितलं, "CCD मध्ये बस. मी आता १५-२० मिनिटात येतोय... ट्रेनमध्येच आहे." स्टेशनच्या बाहेर पडुन उजवी-डावी वळणं घेत मी CCD समोर येऊन थांबले. समोरच्या झुलत्या काचेच्या दरवाजातुन आत जावं न जावं या संभ्रमात दोन क्षण उभी राहिले. इतर वेळेस कायम जीन्स- टीशर्टमध्ये असणारी मी त्याच दिवशी सैलसर पंजाबी ड्रेस घालुन ऑफिसवरुन डायरेक्ट तिथे थडकले होते. टिपिकल काकुबाईचा अवतार ! महाबावळट वाटत होतं. त्यात आमचं भांडणांचा अखेरचा फैसला करायचा असल्याने मी फार उत्साही नव्हतेच.
अचानक दार उघडलं आणि हसत-खिदळत दोन मुली बाहेर पडल्या. थंडगार वार्‍याचा झोत अंगावर आला आणि नकळत मी आत शिरले. आत गेल्यावर कॉफी कुठे मागायची असते हेही तेव्हा मला माहित नव्हतं. क्षणभर असंही मनात आलं, इतक्या पॉश ठिकाणी कॉफी प्यायची आणि मुळात ती कशी सांगायची, काहीच माहिती नाही... किती बावळट दिसतो आहोत आपण या सर्व माहोलमध्ये... तितक्यात CCD ची मुलगी समोर आली आणि शुध्द मराठीत म्हणाली, मॅडम कोणी येणार आहे का? माझा नकळत आ वासला गेला असावा आणि काही समजायच्या आत मी होकारार्थी मान हलवली. असाच काही वेळ गेल्यावर कंटाळुन मी पुन्हा मन लावुन त्यांचं मेन्युकार्ड वाचायला सुरुवात केली. अचानक दाणकन कोणी समोर येउन उभं राहिलं. मान वर करुन पाहिली. "तो" आला होता. क्षणार्धात आजुबाजुचं सगळं जग फ्रीज होऊन सगळा फोकस त्याच्या चेहर्‍यावर आला. तो बसला आणि मला विचारलं, कॉफीची काय ऑर्डर दिलीस. मी म्हटलं, मला समजत नाही, सीसीडी मध्ये पहिल्यांदा आलेय. आधी हसला पण तोच मला घेऊन काऊंटर जवळ गेला, तिथे जाऊन मला लहान मुलाला सांगावं तसं समजावुन सांगितलं. आम्ही ऑर्डर दिली. आम्ही परत कोचवर येऊन बसलो... आणि ..... बोलत राहिलो.... बोलत राहिलो.... कॉफीचे मग बराचवेळ तसेच हातात धरुन.
On that evening, LOT of things changed in my life over a cup of cappuccino... Big decisions taken for our professional and personal life. We became best friends, soulmates and beyond that.


03 August, 2019

पक्ष्यांच्या दुनियेत- भाग १ (दयाळ आणि शिंपी)


प्रस्तावना !
झाडे, पक्षी, प्राणी, किटक यांच्याप्रमाणेच मानवजात ही मुलत: निसर्गपरिसंस्थेचा (part of ecosystem) एक भाग आहे. माणसाने मात्र वेगाने विकसित होत जाणार्‍या आकलनशक्त्ती आणि बुध्दीमत्तेच्या जोरावर निसर्गातील सर्वच घटकांचा स्वार्थासाठी वापर करण्यास सुरुवात केली आणि परिणामी आज जैवविविधता (biodiversity) कमी होते आहे आणि त्याचा दृष्य परिणाम तात्काळ पक्ष्यांच्या विविधतेवर दिसुन येतो आहे. पक्षी हे जैवविविधतेचे प्रथम आणि सहजगत्या लक्षात येणारे मापक (Indicator) समजले जाते. एखाद्या परिसरात जितक्या विविध प्रकारचे पक्षी दिसतात तितका तो अधिवास माणसासाठी राहण्यास उपयुक्त असे मानले जाते.
उदाहरणार्थ, वेडे राघु, २-३ प्रकारच्या मैना, कावळे, चिमण्या, पोपट, बुलबुलच्या दोन-तीन जाती, सुर्यपक्षीच्या ३-४ जाती, तांबट, अधुनमधुन दिसणारे घुबड, घारी यासारखे पक्षी जर तुमच्या परिसरामध्ये (३-४ किलोमीटरचा साधारण गोलाकार परीसर) आढळत असतील तर घराच्या आसपास वड-पि‌पळ, गुलमोहर, पळस, पांगारा, उंबर यासारखी झाडे आहेत आणि तुमच्या घराच्या आसपासची ऑक्सिजनची पातळी चांगली आहे हा महत्त्वाचा आणि आपल्यासारख्या सहज सामान्य लोकांना लक्षात येण्यासारखा निर्देशक आहे.
कावळे, कबुतर आणि चिमण्या वगळता ८-१० प्रकारचे पक्षी आपल्या बिल्डिंगच्या आसपास सहज दिसतात. त्यांची संख्या वाढविणे सर्वस्वी आपल्या हातात आहे. यातीलच काही पक्ष्यांची माहिती या सदराद्वारे मी देण्याचा प्रयत्न करते आहे. या सदरामध्ये नमुद केलेले जवळजवळ सर्वच पक्षी मी पनवेलमधील व्ही. के. हायस्कुल (बल्लाळेश्वर-वडाळे तलाव) परिसर, नित्यांनद नगर, पनवेल महानगरपालिकेचा गोखले हॉलजवळील अत्यंत रहदारीचा भाग इथे पाहिलेले आहेत. पाहिले आहेत असे म्हणण्यापेक्षा चालत असताना सहज दिसलेले आहेत किंवा त्यांचा आवाज ऐकु आलेला आहे. या सदरामुळे आपल्या सर्वांमध्ये किमान आपल्या जागेआसपासची झाडे जोपासण्याची आणि पर्यायाने पक्ष्यांबद्दलची जागरुकता निर्माण व्हावी अशी सदिच्छा!
- मृणाल भिडे (सोमणी)

दयाळ (Oriental Magpie Robin)

रोज सकाळी अत्यंत सुमधुर आवाजात शीळ घालत मला उठवणारा आणि माझ्या माहेरचा comfort zone इथे पनवेलमध्ये नित्यनियमाने रोज जपणारा हा माझा लाडका दयाळ या सदराचा पहिला मानकरी ठरलाय. सकाळच्या वेळेस घराच्या कोणत्याही खिडकीतुन पाहिलं की चिमणीपेक्षा थोडासाच मोठा, काळ्या पाठीचा आणि पांढर्‍या पोटाचा हा दयाळ झक्कासपैकी तारांवर हेलकावे घेत बसलेला दिसतो. त्याला मध्येच काय हुक्की येते देव जाणो, त्याच्यापेक्षा मोठ्या असलेल्या कावळ्यालाही तो उगाचच हुसकावुन लावतो. ‘बस्स बाबा, तुच एकटा तारेवर’, असं म्हणत कावळा देखील बापडा उडुन जातो. खरंतर पळस, पांगारा अशी फुलांची झाडं याला फार प्रिय. पण माझ्या घरासमोरचा दयाळ मात्र उंबरावर बसुन बहुदा उंबरामधले किडे शोधुन शोधुन खात असतो. किंवा आजुबाजुच्या घरांमधे लावलेली फुलझाडांवरही याचं बारीक लक्ष असतं. कोणी नाहीसं बघुन झपकन त्या झाडात घुसेल, फुलांमधला रस पिईल, पाणी साचलेलं असेल ते पिईल नाहीतर कुंड्यामधल्या अळ्या शोधुन, त्या मटकावुन परत तारेवर हेलकावे घेत राहिल.
या दयाळचा विणीचा हंगाम (breeding season) मार्च अखेरीस सुरु होतो आणि जुलै अखेरीस पिल्लं घरट्याबाहेर येउन उडायला शिकतात. विणीच्या हंगामात एरवी शांत लयीत गाणार्‍या दयाळाला नव्याने गाणी सुचायला लागतात. अशाच एका एप्रिलमधल्या शांत दुपारी माझी झोपमोड करुन अव्याहतपणे हा नेहमीपेक्षा वरच्या पट्टीत कोणाला साद घालतोय हे मी वाकुनवाकुन सगळीकडे शोधत राहिले.. तेवढ्यात मला बर्‍यापैकी दुरच्या बिल्डिंगमधे काहीतरी काळं-पांढरं हलताना दिसलं. दुर्बिणीतुन निरखुन पाहिल्यावर लक्षात आलं की हे मिस्टर दयाळ या विणीच्या हंगामामधली आपली प्रेयसी शोधण्याकामी मग्न आहेत. १-२ दिवसांतच त्यांना यश मिळाल्याचं लगेच दिसुन आलं. कारण नंतर पुढचे काही दिवस तारेवर एका ऐवजी दोन दयाळ पक्षी हेलकावे घेत बसलेले दिसले, दोघेही जण आपल्या चिमुकल्या शेपट्या सतत वरखाली नाचवत अळ्या, किडे शोधुन खाण्यात तल्लीन झालेले होते.

शिंपी (Common Tailorbird)

च्युईट, च्युईट असा सलग न थकता सकाळचा गजर लावुन मला उठविणारा दुसरा पक्षी म्हणजे शिंपी.... सर्वप्रथम मी गेल्यावर्षी अर्धवट झोपेत पहाटे याचा खणखणीत स्वर ऐकला तेव्हा माझी उरली सुरली झोप देखील उडाली.. मला क्षणभर वाटलं, हा जणु खिडकीच्या बाहेरच बसुन ओरडतोय, इतका जवळुन याचा आवाज ऐकु येत होता. एकतर हा रंगाने पोपटी-हिरवा आणि आकाराने चिमणीइतका पिटुकला असल्याने पटकन झाडांच्या पानांत मिसळुन जातो. तेव्हाही त्याला शोधुन काढताना माझी दमछाक झाली आणि प्रत्यक्षात हे राजे खालच्या झाडाऐवजी घराबाजुला असलेल्या शेजारच्या सदाफुलीच्या रोपात बसुन साद घालत होते. काही दिवस गेले आणि अचानक एकाऐवजी दोन-तीन आवाज ऐकु लागले. निरखुन पाहिलं तर तब्बल ७-८ पक्षी एकत्र कौलांवर बसुन उन्हं खात खात; माश्या, लहान सुंरवट, अळ्या, चिलटं वगैरे किडेमकोडे शोधत होते आणि एकीकडे खणखणीत च्युईट, च्युईट स्वरात एकमेकांशी गप्पा मारत होते. आंब्याचा मोहोर, त्याभोवती फिरणारे किडे, पळस, पांगारा या फुलांचा मध हेदेखील यांचं आवडतं खाणं. ज्या अर्थी ७-८ जण एकत्र दिवसभर मला अधुनमधुन दिसतातच त्या अर्थी त्यांची घरटी देखील जवळपास कुठेतरी असावीत. मला मात्र ती अजुन पाहायला मिळालेली नाहीत. सहसा रुंद पानांचे झाड किंवा बारमाही हिरवे राहणारे वड-आंबा यासारखे झाड शिंपी पक्षी शोधतात. दोन पानांच्या कडा बाजुबाजुने एकमेकांत गुंतवत किंवा एकच मोठे रुंद पान गोल वळवुन त्याचे लहान बोगद्यासारखे देखणे घरटे बांधण्याचे कसब बघण्यासारखे असते. शहरात मात्र मोठी झाडे कमीकमी होत असल्याने शिंपी पक्षी सोनटाका, क्रदळ (कर्दळ), रुंद पानांचे पामट्री अशा झाडांमध्ये देखील घरटे बांधताना आढळुन येतात.
थोडे विषयांतर करुन सांगायचे तर ज्यांच्याकडे पाळीव प्राणी नसतील आणि सोनटाका/कर्दळीच्या जोडीला जाई-जुई, जास्वंद, अनंत, झेंडु अशी फुलझाडे असतील आणि गॅलरीला बर्डनेट नसेल त्यांनी पाण्याचे पसरट भांडे जरुर ठेवावे. सुरुवातीला काही दिवस फक्त कावळे आणि कबुतरं येऊन घाण करतील पण एकदा चिमण्या आणि बुलबुल यांना पाण्याचा सुगावा लागला की आपोआप बाकीचे छोटे पक्षी निर्धास्त होतात आणि त्यांचा किलबिलाट दिवसभर सुरु राहतो. मांजर, कुत्रा घरात असेल तर मात्र कावळा, कबुतरं सोडुन सहसा कोणी पक्षी येत नाही. सलग दोन अडीच वर्षं हे सारे पक्षी येत राहिले की त्यातल्याच कोणीतरी आपली नजर चुकवुन ठराविक काळासाठी आपला संसार थाटतात. (आणि बरेचदा तो पक्षी शिंपी किंवा बुलबुलच असतो.)

05 February, 2019

कण न् कण


कण न् कण

तो कणाकणाने जगतो आहे.
दोन वेण्या, शाळेचे डब्बे -अभ्यासाची धांदल,
स्प्रेडशिटस‍- टारगेटसची मारामारी,
सगळ्यांची एकत्र मोट वळतो आहे.

ती कणाकणाने मरते आहे.
मेडीकल रीपोर्टस, औषधे,
सतार आणि कॅनव्हास,
स्वत:मध्येच रमते आहे.

ते दोघे दोन धृवांवर जगासाठी.
नियती हसते मनाशीच कारण,
ते दोघे एकमेकांसाठी, एकमेकांत
गुंतलेले... मिसळुन गेलेले...

भौतिक जग म्हणते,
तो एकटाच मागे राहिलाय.
तो म्हणतो,
तिचं कण न् कण अस्तित्व
माझ्यातच सामावलं.

(मृणाल भिडे - १९/०१/२०१९)

एक कोंब रुजतो आहे