Showing posts with label कविता. Show all posts
Showing posts with label कविता. Show all posts

06 March, 2024

अनय

नक्षत्रांच्या गावातून उतरली होतीस तू त्याच्या घरात;
मेघश्याम आभाळाची ओढ तुझ्या रक्तातच होती
हे समजलं होतं त्याला, अगदी पहिल्यापासून,
तुझ्या बाईपणाची जात विजेची, शेजेला घेता न येणारी
ओळखून होता तो आतून, आतून, खोल मनातून
तुझ्या झिळमिळ स्वप्नांच्या मोरपिसांना
त्याने कधी देऊ पाहिले नाहीत आपले डोळे,
आणि नाही गढूळ केले कधी तुझ्या देहात हिंदकळणारे
धुंदमदिर निळे तळे.

त्याच्या मृण्मय आयुष्यात उमटली होती
अमराचा अळता लावलेली तुझी पावले
घरात तुझ्या असण्याचा अविनाशी गंध होता;
काठोकाठ भरून होता तो नुसत्या तुझ्या आसपास वावरण्याने;
तुझ्याशी खोलवर कृतज्ञ होता
पाहिलं त्यानं तुला उंच बेभान उसळताना;
रात्रीच्या रसज्ञ काळ्या अंधारात मिसळताना;
मधुर विषाचे घोट खुळ्या ओठांनी आकंठ घेताना;
पिसावताना, रसावताना,
अस्तित्वाचा कण न्‌ कण
प्रेमाच्या चेहऱ्यावर उत्कट उधळून देताना.

कळली त्याला तहान तुझ्या तृप्तीला लागलेली अतृप्तीची;
दु:खाचं नख लागलेल्या काळजाची तडफड कळली शर्थीची;
कळली कशी असते प्रेमात स्त्री भरतीची आणि सरतीची.
तू हरलीस हे त्याला कळलं, पण निरर्थाच्या वाटेवर
हरवली नाहीस, स्वत्व सांभाळून उरलीस तशीच, हेही कळलं
त्यानं पुढे होऊन तुझ्या पापणीवरचा शोक टिपला,
त्या क्षणी, राधे तुला तुझा पुरुष भेटला.
पुरुष-जो क्षमा करून नाही ऋणी करत;
पाठ फिरवून नाही उणी करत;
घेतो समजून, सावरतो, आवरतो, उराशी धरतो;
आपल्या नसलेल्या स्वप्नांसाठीही आपल्या काळजाचं घर करतो.
राधे, पुरुष असाही असतो.

19 December, 2022

मौनमुद्रा

मी देसाईंची श्रीमानयोगी तर असंख्य वेळा वाचली आहे. आतु बाबा तर चिडवायचे देखील... आमच्या बाईंनी पोथी लावलीय. बायका देवाच्या पोथी लावतात आमची मृणाल तशी ही श्रीमान योगीची पोथी लावते. पण इतकं असलं तरी मी कथा-कांदबऱ्यात मनाने इतकी घुसत नाही. पण तसं माझं कवितेच्या बाबतीत होत नाही. 

कविता मात्र माझ्या मनात रेंगाळत राहतात... खुप दिवस, महिने, वर्ष देखील... म्हणूनच मी कविता सहसा वाचायलाच जात नाही. 

मोबाईल डिक्लटरींग करताना हा फोटो सापडला. आवडलेल्या कवितांचं फोटो मध्ये कोलाज करणं हा ही एक माझा आवडता प्रकार होता... आजही आहे.
हि कविता पहिल्यांदाच वाचली तेव्हा कॉलेजमध्ये होते. तेव्हा वाटलं हि कविता ब्रेकअप झाल्यानंतरची आहे 🙄 आज लक्षात येतं हि प्रत्येक लग्न झालेल्या, न झालेल्या प्रत्येकीची गोष्ट आहे. 🙂

"दिवसाच्या चोवीस मात्रा संसाराच्या दहा फुटी खोलीत चपखल बसवणारी विंदाच्या नजरेतली प्रसन्न स्त्री " (झपताल) आणि " प्रचंड कल्लोळ प्राणांत सावरून, ओठांवरची मौनमुद्रा उकलून मोजकं बोलणारी शांताबाई यांच्या नजरेतली ती रुक्ष स्त्री" (मौनमुद्रा) हि दोन्ही तिचीच तर रुपं.... पण एका लेखकानं लिहिलेली कविता आणि लेखिकेनं केलेली कविता याच्यातला मुलभूत फरक तो हाच असेल का?


04 December, 2022

माणसं

पंधरावीस नातेवाईकांच्या गर्दीत 
आपल्या माणसाकडे हळूच पाहणारी माणसं...

आसपासचं जग विसरून
एकमेकांत गुरफटलेली माणसं...

तरूणांच्या उत्साहासोबत
थकली भागली पावलं खेचणारी माणसं...

चुकूनमाकून मिळालेला घराबाहेरचा उजेड
नजरेत भरून घेणारी बुरख्याआडची माणसं....

वारंवार लिपस्टीक/ भांगेचा सिंदुर 
निरखणारी घुंगटाआडची माणसं... 

झाडां-फुलांची नावं लिहीणारी
शोधक नजरेची माणसं... 

पिंजऱ्यातले प्राणी बघताना 
आकाशातले पक्षी उत्सुकतेने पाहणारी माणसं...

जिथे ऐसपैस जागा दिसेल तिथे
खाऊच्या पुड्या उघडणारी माणसं... 

पोराबाळांचा उदंड उत्साह बघून
उद्याच्या काळज्या विसरलेली माणसं...

प्रत्येक वळणावर सेल्फी घ्यायला
उभी राहिलेली माणसं...

लेकीसाठी एक फॅन्टा विकत घेताना
चारचारदा खिसा चाचपणारी माणसं...



...

हि सारीजणं
भविष्यात येऊ घातलेल्या 
धर्म-शीतयुद्धात करपवलेली स्वप्नं घेऊन
कुठे जातील?

काय करतील?

...
...
...
न जाणो
कोणी काय सांगावं
...

हि माणसं एक होतील आणि
पाय रोवून उभी राहतील
माणुसकी आणि अहिंसेच्या कातळावर !
  

05 February, 2019

कण न् कण


कण न् कण

तो कणाकणाने जगतो आहे.
दोन वेण्या, शाळेचे डब्बे -अभ्यासाची धांदल,
स्प्रेडशिटस‍- टारगेटसची मारामारी,
सगळ्यांची एकत्र मोट वळतो आहे.

ती कणाकणाने मरते आहे.
मेडीकल रीपोर्टस, औषधे,
सतार आणि कॅनव्हास,
स्वत:मध्येच रमते आहे.

ते दोघे दोन धृवांवर जगासाठी.
नियती हसते मनाशीच कारण,
ते दोघे एकमेकांसाठी, एकमेकांत
गुंतलेले... मिसळुन गेलेले...

भौतिक जग म्हणते,
तो एकटाच मागे राहिलाय.
तो म्हणतो,
तिचं कण न् कण अस्तित्व
माझ्यातच सामावलं.

(मृणाल भिडे - १९/०१/२०१९)

एक कोंब रुजतो आहे


31 May, 2018

खामोशी : The Loudest Noise


मेरी खामोशी में सन्नाटा भी है,
शोर भी है।
तुने देखा ही नही,
आखों में कुछ और भी है।

गप्प राहुन समुद्राची गाज ऐकतेय ती... तिचं अस्फुट हसु पाहतोय तो... लाटांचं पाणी उडवुन तिचा समुद्र स्वत:कडे खेचु पाहतोय... ती पायाखालची वाळु सरकत असताना तिथेच उभी आहे एका निर्धाराने... जणू आव्हान देतेय नियतीला, ‘कर तुला हवं ते, तु तुझ्याच मर्जीने मला जगायला लावणार हे मलाही माहितीय पण कसं जगायचं, आणि कसं मरायचं हे मात्र मी ठरवणार.’

तिचं सर्वस्व, तिचा सखा, तिचा समुद्र आहे तिच्यासोबत... ती गप्प असली तरी मनातला कल्लोळ ओळखतो बरोबर... सहस्त्र लाटांची गाज ऐकवत राहतो तिला... मग तिच्या विचारांचा कल्लोळ देखील विरुन जातो... तिचा सखा तिला आयुष्याचं शहाणपण शिकवतो...



ती असते काहीशी अंर्तमुख
तिचा बाळपणीचा मित्र मात्र मस्तमौला, फकीर.

ती असते निरागस, अल्लड वगैरे
तो मात्र असतो व्यवहारी, बिलंदर वगैरे.

उध्वस्त होतं जातं तिचं बालपण
तो मात्र खेळण्याच्याच नादात.

दुखावलं जातंय तिचं मन
ज्याची त्याला जाणीवच नाही.

आर्तता आहे तिच्या नजरेत
जी त्याला उमजत नाही.

तिच्या डोळ्यांतल्या स्वप्नांच्या ठिकर्‍या उडाल्यात.
त्याची पहाटेची स्वप्नं मात्र खरी होतात.

स्वत:च्याच कोशात गुरफटुन जातेय ती
त्याला मात्र आकाशाचे वेध लागलेत.


वरवर मात्र हे सारं सहजपणे घेत, तुटल्या-फुटल्या मनाला सांभाळत ती येते तिच्या सख्याजवळ... लाटा झेपावत राहतात तिच्या पायांशी.. ती बसुन राहते त्याला लगटुन... गाज ऐकता ऐकता तिच्या मिटल्या डोळ्यांतुन पाणी वाहु लागतं.... क्षणार्धात लाटा तिला आपल्याजवळ खेचुन घेतात. माणसांच्या जगात माझं कोणी नसलं तरी माझा सखा माझ्याजवळ आहे हे ती जाणून असते... तिचा सखा तिचं सारं काही ऐकुन घेतो. तिच्या दुखल्या-खुपल्या मनाला गाजेचं मलम लावतो... खार्‍या वार्‍याची फुंकर घालतो. तिचा सखा तिला व्यवहारी कोरड्या माणसांच्या जगात अलिप्त राहायला शिकवतो.
.
.
.
.
.

आता मात्र तिला माणसांचं जग नकोच आहे. तिला ओढ लागलीय तिच्या सख्याची... तिची आजवरची सारी गुपितं त्याच्याच पोटात तर आहेत. तिचे आसु त्यानेच तर आपल्या लाटांकरवी पुसलेत. पण ती मात्र आता बेभान झालीय, उन्मुक्त... आसुसलीय... बेफाट, बेताल वागतेय.... तिचा सखा, तिचा समुद्र तिला सर्वार्थाने तिच्याजवळ हवाय... तो मात्र ओहोटीला जाऊन आयुष्यात अलिप्त राहायला शिकवतोय... भरतीला येऊन तिला काठाजवळ सोडतोय, तिच्या माणसांच्या जगात....







एका रात्री... 
ती अशीच बेभान होते... बसते तिच्या सख्याला लगटुन.. अंधाराची गोधडी पांघरुन तिच्या सख्यामध्ये अलगद एकरुप होऊन जाते.

तोही तसाच उधाणलेल्या लाटांनी घट्ट कवळुन घेतो तिला स्वत:जवळ...


दुसर्‍या पहाटे...
तिचं तृप्त, थकलं-भागलं शरीर सापडतं किनार्‍यावर.
लोक म्हणतात, काल रात्री समुद्राच्या लाटा खवळलेल्या... एक वेडी मुलगी त्यात बुडुन मेली...


व्यवहारी जगाने इतकीच दखल घेतलेली... बस्स! इतकंच...

खरं नादीष्ट कोण ते तिच्या सख्यालाच माहिती !

28 December, 2015

कविता -३





कविता चित्ररुपात वाचता येत नसेल तर:


(१)
प्रिय किंवा अप्रिय,
भुतकाळ परतुन येतो म्हणतात.

तु ही येशील का असंच?

..
(२)
प्रिय किंवा अप्रिय,
भुतकाळ परतुन येतो म्हणतात.
तु ही असाच येशील.

पुन्हा परत न जाण्यासाठी.. हो न?
...
(३)
प्रिय किंवा अप्रिय,
भुतकाळ परतुन येतो म्हणतात.
तु ही असाच येशील.
पुन्हा परत न जाण्यासाठी...

आणि समजा परत जावं लागलंच तर रे?

...
(४)
प्रिय किंवा अप्रिय,
भुतकाळ परतुन येतो म्हणतात.
तु ही असाच येशील.
पुन्हा परत न जाण्यासाठी...
आणि समजा परत जावं लागलंच तर,

यावेळेस तुझ्या आईला सोबत नेशील न?
...
(५)
प्रिय किंवा अप्रिय,
भुतकाळ परतुन येतो म्हणतात.
तु ही असाच येशील.
पुन्हा परत न जाण्यासाठी...
आणि समजा परत जावं लागलंच तर,
यावेळेस तुझ्या आईला सोबत नेशील.

कारण ती फक्त माझीच आई नव्हे.
...
(६)
प्रिय किंवा अप्रिय,
भुतकाळ परतुन येतो म्हणतात.
तु ही असाच येशील.
पुन्हा परत न जाण्यासाठी...
आणि समजा परत जावं लागलंच तर,
यावेळेस तुझ्या आईला सोबत नेशील.
कारण ती फक्त माझीच आई नव्हे.


गेली दहा वर्ष ‘मी’ सांभाळलाय तिचा लहरीपणा,

...
(७)
प्रिय किंवा अप्रिय,
भुतकाळ परतुन येतो म्हणतात.
तु ही असाच येशील.
पुन्हा परत न जाण्यासाठी...
आणि समजा परत जावं लागलंच तर,
यावेळेस तुझ्या आईला सोबत नेशील.
कारण ती फक्त माझीच आई नव्हे.
गेली दहा वर्ष ‘मी’ सांभाळलाय तिचा लहरीपणा,

आता तु सांभाळ तिला
आणि…
मलादेखील.
...

27 June, 2015

Listening to पाऊस with दिल दोस्ती दुनियादारी

...

आता तुच हो पावसाची सर,
आणि बरस माझ्या अंगणात,
आणि अशीच ये तुझ्या आठवणींसारखी,
न सांगता, मी कुठेही गेली तरी !!!
--- रेश्मा


माझ्या काही मित्रांना खुप काही
कविता होत होत्या,त्या काळाची गोष्ट...
...
...
जमाना तो राहिला नाही...
प्रेमकविता, भुर्जीपाव आणि भजी मिळतील फारफार तर नाक्यावर
तुझ्या नावाची...
--- कैवल्य


आता पड, नाहीतर बघ...
...
माझ्या मायच्या शिलाई मशिनीची शप्पथ सांगतोय,
एकएक ढग ...
एकएक ढग शिवुन तुझी मऊ रजई परत देईन तुला
--- आशु


सध्या झी मराठीवर रात्री उशिरा ‘दिल दोस्ती...’ प्रक्षेपित होतेय. अनेक वर्षांनी, ‘पिंपळपान’, ‘प्रपंच’ सारख्या मालिकांनंतर जवळपास त्याच दर्जाची प्रसारीत होणारी ही पहिलीच मालिका आहे. त्यात झी मराठीने ती रात्री १०.३० वाजता दाखवण्याचं (काही अंशी) धाडस आणि (बर्‍याच अंशी) चतुराई दाखवलीय त्याबद्द्ल झी चं कौतुक करायला हवं.
आजच्या तरुणाईचा दिवसभर कामाने पिट्ट्या पडतो. हे लोक बॉसच्या शिव्या खाऊन, रस्त्यावर, गाडी-बस-लोकल मध्ये लोकांशी भांडुन, गर्दीचे धक्के खाऊन घरी पोचतात... त्यावेळेस त्यांना टीव्हीवर राजकारणातल्या मारामार्‍‍या आणि टीव्हीवरच्या सासु-सुने मध्ये काहीही रस नसतो. नेमकी हिच नस ‘झी’ ने पकडली आणि रात्री उशिराच्या वेळेत ‘फ्रेंडस‍’ ला टक्कर देणारी मालिका आणली.

गेले अनेक महिने मी या मालिकेबद्द्ल, कलाकारांबद्द्ल अनेक ठिकाणी वाचतेय. फेसबुक वर हजारोंनी लाईक्स आणि कमेंट्स येताहेत.. मालिकेचा आशय, संवाद, कलाकारांची कामं सगळ्याचीच छान भट्टी जमलीय. पण त्या मालिकेच्या संगीताबद्द्ल खास कौतुक करणारं असं काहीच मी (निदान मी तरी) वाचलं नाही. आजची ही पोस्ट खास “पंकज पडघन” यांच्याबद्द्ल!
‘टिक टिक वाजते(दुनियादारी)...’ या गाण्यापासुन पंकज पडघन यांचं नाव सर्वांना माहिती झालं. तसंच ‘दाद मी मागू कुठं? गा-हाणं नेऊ कुठं”, ‘स्वप्न चालुन...’(क्लासमेट्स) आणि मितवा या (मला माहित असलेल्या) तीन सिनेमासांठी पंकज पडघन यांनी संगीतदिग्दर्शन केलंय. ‘जय मल्हार’ मालिका बघावी कि नाही हा ज्याच्या-त्याच्या भावनेचा मुद्दा असला तरी एक लक्षात घेण्यासारखं म्हणजे मालिकेचं शीर्षकगीत.. ते मात्र सुरेख आहे. साधारण या प्रकारची गीतं लयबध्द करताना संगीतकाराला फारसे प्रयोग करता येत नसावेत. पण तरीही या गाण्यात मात्र ठेका धरावासा वाटतो. ते सहज गुणगुणता येईल असं आहे. असो. जरासं विषयांतर झालं.

दुनियादारी, मितवा, क्लासमेट्स असे लागोपाठ तीन प्रेम, दोस्ती वगैरेंशी संबंधित चित्रपट करुन त्यातील कोणतीही जिंगल/ ट्युन पंकजने ‘दिल,दोस्ती...’ साठी वापरली नाहीय. “दिल,दोस्ती...”चं संगीत अस्सल आहे. सहज गुणगुणता येणारं आहे. सतत ऐकावसं वाटणारं आहे. “दिल,दोस्ती...” चा एकही भाग मी चुकवत नाही हा मुद्दा वेगळा... पण एपिसोडस पाहताना एक लक्षात येतं की, अ‍ॅना -आशु किंवा कोणाच्याही टिंगलीचा मुड असेल की पार्श्व-संगीत मिश्किल असतं. एकदम हलकं-फुलकं!! गंभीर किंवा हळव्या मुडचं असेल (शुध्द मुंबई-मराठीत कोणी सेंटी मारत असेल ! ) तर नेहमीच्या सिग्नेचर ट्युनचाच एक निराळी स्टाईल ऐकायला मिळते... हे सगळं आता सवयीचं होत होतं... पण परवाचा पावसाळी एपिसोड मात्र अप्रतिम झाला. आणि एकाहुन एक सुंदर अशा कवितांबरोबरच पार्श्व-संगीताला पण फुल मार्क्स... !!!! गेल्या आठवड्यात धो-धो पाऊस पडत असताना माझ्या सहज मनात आलं की, “दिल- दोस्ती...”ची सिग्नेचर ट्युन पावसाच्या आवाजाच्या बॅकग्रांऊड वर ऐकायला मज्जा येईल आणि पुढच्याच दोन-तीन दिवसात ‘दिल-दोस्ती’ मध्ये पाऊस पडला... आजपर्यंत “दिल- दोस्ती...” मध्ये न ऐकलेली ट्युन ऐकायला मिळाली. सगळे कविता म्हणत असताना पाठीमागे पाऊस वाजतो आहेच... भिजल्याने सर्वांच्या आवाजात किंचिंत कापरेपणा आलाय तो देखील रेकॉर्ड झालाय. सर्वांच्या कवितेच्या मुडप्रमाणे नेहमी वाजत असणार्‍या ट्युन्स आहेत. पण...

पण आशुची कविता सुरु होण्याआधी नीट लक्ष देऊन ऐकलं तर एक-दोन सेंकदांसाठी काहीच आवाज नाहीय. कविता पुढे सरकत जाते. पार्श्वसंगीत सुरु होतं... आशु म्हणत असतो...‘ आता पड, नाहीतर बघ’... बस्स, इथेच! पुर्ण मुड बदलतो... सलग एका लयीत (बहुदा) सिंथेसायझर वाजत राहतो आणि ठराविक अंतराने ड्रमबीट्स वाजत राहतात... कविता संपते. कोणीच बोलत नाही... फक्त पावसाचा आवाज... थोड्या वेळाने आशुच म्हणतो, ‘नाही, मी ओके आहे...’ आपण भानावर येतो. कैवल्य शायरी म्हणतो. पुढे मिनिटभर नेहमीची हळुवार ट्युन वाजत राहते... आणि मुख्य पाहुणा पाऊस, तो कोसळत राहतो. पावसाचा आवाज ठळक होतो. एपिसोड संपतो...

बस्स! एपिसोड संपला त्याक्षणी काय वाटलं ते शब्दांत व्यक्त करण्यापलिकडचं आहे... हा भाग फक्त ऐकण्याचा होता. बघण्याचा नाही...

मला साधं गाणं सुद्धा सुरात गुणगुणता येत नाही. मोठ्याने म्हणणं तर लांबची गोष्ट. पण मला सुर आवडतात, गाणं ऐकायला आवडतं... आज मी ‘दिल, दोस्ती..’ची जिंगल मनाशी म्हणते.... आणि हेच "डि3" चं यश आहे.


ता.क.: मी ही पोस्ट लिहिली तेव्हा संगीतकार म्हणुन  फक्त 'पंकज पडघन' याचं नाव येत होतं. पण आता मात्र अधुनमधुन 'गंधार संगोराम' याचंही नाव दिसतंय. त्यामुळे शीर्षकगीत एकाने आणि मालिका-भागांमधील (एपिसोडस) जिंगल्स गंधार संगोराम याने केल्या असाव्यात.... (१७-०१-२०१६)

03 March, 2015

कविता - १

पहिली कविता माझी नाही...दुसरी कविता पहिल्या कवितेचं उत्तर !!! (दुसरी कविता मात्र माझी)

28 July, 2012

प्रेम सुकुन गेलंय
बकुळफुला सारखं,
गंध मात्र दरवळतोय...


मैत्री निष्पर्ण झालीय
ग्रीष्माचा तडाखा सोसत,
वठलेलं खोड मात्र उभंच आहे...


वात्सल्य आटुन गेलंय
दुष्काळाची चाहुल घेत
निवडुंग मात्र बहरतोय ....


भावना जळुन गेल्यात
कापरासारख्या,
राख देखील उरली नाही...

नाती संपुन गेलीत,
आयुष्य संपत आलंय,
अस्तित्वाच्या पाऊलखुणा पुसल्या जातील
एका क्षणात!!

--
मृणाल भिडे
28 जुलै 2012




11 April, 2010

निवली खळबळ
निवांत झुलती लाटा
कधींच गेल्या
रेतीवरल्या
पुसून पाउलवाटा

पुळणी वरती
तरल ओलसर शांती
झिळमिळते वर
तृप्त उन्हाची
पिवळी रेशिमकांती

उठती अलगद
पाण्यावरति तरंग
नुकता न्हाऊन
संथपणाने
खडक वाळवी अंग

-मंगेश पाडगावकर