Showing posts with label थिम्फु. Show all posts
Showing posts with label थिम्फु. Show all posts

14 June, 2010

थिम्फु बदलतंय...




ठिकठिकाणी नव्याने होणारी बांधकामं, ड्रील मशीन... कॉक्रींट मिक्सर... आणि कसले कसले शांततेवर ओरखडे उठवणारे आवाज... आणि त्याच वेळेस चारी बाजुंना दिसणार्‍या हिरव्या डोंगररांगा हे काहीसा विरोधाभास असलेलं माझं पहिलं थिम्फु दर्शन!! माझ्या संग्रही असलेल्या 8-10 वर्षापुर्वीच्या प्रवासी कात्रणांवरुन थिम्फु अतिशय शांत देखणं हिरवंगार छोटं शहर असेल असं मला वाटायचं. माझी काहीशी निराशाच झाली. थिम्फु देशाची राजधानी आहे आणि उल्लेखनीय गोष्ट अशी की तिचा नियोजनबध्द विकास होतोय आणि म्हणुनच थिम्फु गावाचा आखीव-रेखीवपणा टिकुन आहे. पण गावाची पुर्वीची शांतता हरवल्यासारखी वाटत होती.



थिम्फुबद्दल.
थिम्फु देशाची राजधानी असल्याकारणाने देशाचा विकास काहीसा याच शहराभोवती केंद्रीत झालाय. इथली हॉटेल्स बर्‍यापैकी महाग आहेत. आम्हांला खोली मिळायलादेखील बराच त्रास झाला. मालबझार रस्त्याच्या दोन्ही बाजुस 1760 हॅन्डीक्राफ्टसची दुकानं आणि वरच्या मजल्यावर हॉटेल्स... याच रस्त्याच्या दुसर्‍या टोकाला आणि याच रस्त्याला समांतर अशा दुसर्‍या रस्त्यावर सरकारी कार्यालयं असा साधा सोपा थिम्फु शहराचा नकाशा!! अर्थात याला बरेच छोटे छोटे उपरस्ते वगैरे आहेतच.. पण तेही फारसं समजायला क़ठीण नाहीय. थिम्फु पायी फिरायला एकदम छान आणि सुरक्षितदेखील... National Handicrafts Museum, Textile Museum, ताज पंचतारांकीत हॉटेल (हॉटेल अर्थातच बाहेरुन), क्लॉक टॉवर चौक, राष्ट्रीय ग्रंथालय आणि पोस्ट ऑफिस पाहण्यासारखं आहे. एकुणएक सगळ्या खाजगी आणि सरकारी कार्यालयांवर/इमारतींवर भुतानी चित्रशैलीचा सुरेख ठसा आहे. अगदी पेट्रोलपंप पण यातुन सुटलेला नाही.

गाडी पार्कींग.
खड्डे नसलेले सरळ आखीव रस्ते... आणि रस्त्यांच्या एका बाजुला सलगपणे खास पार्कींगसाठी ओढलेले पांढरे पट्टे. भुतान देशात फक्त चारचाकी गाड्यांना परवानगी आहे. सायकल, सायकलरिक्क्षा, तीन/सहा आसनी रिक्षा असे बहुविध प्रकार चालवायला तेथे परवानगी नाही. याबाबत माझे निरीक्षण असे की फार पुर्वी सहजपणे गाड्या उपलब्ध होत नसाव्यात. याला कारणं दोन. एक म्हणजे लोकांची तितके पैसे खर्च करण्याची क्षमता नव्हती आणि दुसरं गाड्या परदेशातुन आयात करण्यासाठी भुतान सरकार उत्तेजन देत नसावं. पण बदलत्या जागतिक आणि सामाजिक परिस्थितीनुसार त्या उपलब्ध करुन देण्याचा सरकारने निर्णय घेतला तेव्हा सर्वप्रथम रस्त्यांची वाहतुक (म्हणजे वन-वे कुठे आणि टु-वे कुठे) कशी हवी आणि रस्त्यावर येणार्‍या गाड्यांना पार्कींगसाठी जागा हवी याचा विचार करण्यात आला असावा आणि मगच गाड्या विकत घेण्यास उत्तेजन देण्यात आले. आज थिम्फुच्या मालबझार रस्त्यावर वन-वे वाहतुक आहे आणि दुसरी बाजु पुर्णतः पार्कींगसाठी राखुन ठेवली आहे. आणि आखुन दिलेल्या जागेतच गाडी पार्क करणे कायद्याने बंधनकारक आहे. जिथे दोन्ही बाजुंना वाहतुक सुरु असते तेथील रस्ते चांगले रुंद आहेत आणि तेथेही एक बाजु राखुन ठेवली आहे. गाडी विरुध्द दिशेला असेल तर गाडी पुर्ण वळवुन ती पार्कींग च्या रस्त्यावर आणुन तिथे ठेवावी लागते अगदी 5 मिनिटांचं काम असेल तरी. आणि थोड्याफार फरकाने हीच पध्दत सर्व भुतानमधे आहे. (असं आपल्याकडे कधी बरं घडेल???)

आजही ज्या भुतानी लोकांकडे गाडी नाही त्यांच्यासाठी मिनीबसेसची ठराविक वेळेने सेवा आहे आणि ठरलेल्या वेळेस ठरलेली बस येते. (म्हणजे आपल्याकडचा लाल डबा!!पण तो लाल डबा अशी छान सेवा देत नाही हा भाग निराळा). थिम्फु शहरात वेगळी सिटीबस आहे(हिच्याबद्दल फारसं माहीत नाही). पण गाडीचा प्रकार एकच... मिनीबस!! तो तिथे घाटांत चालवायला सोयीस्कर असावा...

अजुन एक चांगली गोष्ट म्हणजे इथल्या ड्रायव्हर्सना सतत हॉर्न वाजवायची सवय नाही. (हे आपल्याकडे होणं अशक्य आहे!!!) आणि हे कायद्याने बंधनकारक देखील आहे. पण त्यांना सवय नाही हे महत्वाचंच!! शिवाय तेथील गाड्यांच्या इजिंनाना सायलेन्सर बसवणं बधंनकारक असावं कारण गाड्या सुसाट वेगात असतील तेव्हा आणि सिग्नलला थांबल्या असतील तेव्हादेखील त्यांचा आवाज येत नव्हता अगदी बाईक असेल तरीसुध्दा जो आपल्याकडे नेहमी येतो.(याच्यात देखील आपल्याकडे सुधारणा होणं अशक्य आहे!!! माझ्याकडे बाईक आहे हे सर्वांना कळायला हवंच आणि आवाज करत नाही ती बाईक कसली...अशी समस्त भारतीय बायकर्सची मनोवृत्ती आहे.मोजके अपवाद असतीलही). यामुळे रात्री उशिरापर्यंत (म्हणजे जास्तीतजास्त 10 पर्यंत) वाहतुकीची वर्दळ असली तरी तिच्या आवाजाचा त्रास असा होतच नाही.

26 तारखेला दुपारी पोचलो त्यादिवशी फारसं काही माहीत नसल्याकारणाने जास्त न फिरता आम्ही मात्र लौकरच जेवुन घेतलं आणि हॉटेलवर परतलो.

11 June, 2010

थिम्फुच्या वाटेवर...



26 तारखेला सकाळी 10 वाजता ग़ाडीने थिम्फुला जायला निघालो. फुंटशोलिंग-थिम्फु प्रवास 5 ते 6 तासाचा आहे. सुरेख निवांत रस्ते... क्षणा क्षणाला बदलत जाणारा निसर्ग यामुळे प्रवास फार मजेचा झाला.. भुतानमध्ये जवळपास 70% भागात वनं राखुन ठेवली आहेत. अर्थात त्याला थोडं धार्मिक कारण आहे. तेथील जनतेची भुतं-खेतं, आत्मे, पुर्नजन्म वगैरे गोष्टीवर श्रध्दा आहे आणि तेथील निसर्गाला हात लावला, गरजेपेक्षा जास्त उपयोग केला तर निसर्गात राहाणारे आत्मे दुखावले जातील अशी जुन्या भुतानी लोकांची भावना आहे. “Gross National Happiness” ही तेथील विकासाची मुलभुत संकल्पना मानली जाते. पैशापेक्षा आत्मिक समाधान महत्वाचे!! आणि याच भावनेपोटी आज इतर देशांपेक्षा तेथील वनसंपत्ती अजुन तरी टिकुन राहिली आहे. त्याचा प्रत्यय भुतानमध्ये फिरताना जागोजागी आला. सर्वत्र जमिनीवर आणि डोंगरउतारावर असंख्य जातीची झाडं दिसुन आली. बराचसा प्रवास देखील सावलीमधुनच झाला.

भुतान मधील सर्वच रस्ते भारतीय सेना आणि भारतीय सीमा रस्ते संघटना [Border Road organization (BRO)] यांच्या सहकार्याने बांधण्यात आले आहेत. आणि रस्त्यांच्या देखभालीसाठी देखील भारत सरकारची मदत घेतली जाते. घाटांमधुन प्रवास करताना एक महत्वाचा फरक सातत्याने जाणवला. आपल्या इथे घाटांमध्ये रस्ते तयार करताना पार वरपर्यंत झाडं तोडली जातात. कारण काहीही असो... भुतानमध्ये मात्र जितकी गरज आहे तितक्याच उंचीपर्यंत झाडं तोडली आहेत आणि खालच्या भागाला बहुधा सिमेंटचं आणि मोठ्मोठ्या दगडांचा आधार देणारं बांधकाम केलेलं आहे. (बहुधा अशासाठी की चालत्या गाडीतुन पाहिलं असलं कारणाने नीटसं कळलं नाही.) तिथेही चा प्रश्न आहेच. पण तुलनेने तोडलेला भाग लवकर सेट होतो म्हणजे सुरुंगस्फोटामुळे जिथपर्यंत माती ढासळली आहे तितकीच खाली येते असं ड्रायव्हरच्या बोलण्यावरुन ज़ाणवलं याला माझ्या अंदाजाने अजुन एक कारण असेल ते म्हणजे झाडं पार वरपर्यंत तोडली जात नाहीत. परिणामी खालची माती निसटुन जाते पण वरची माती मात्र झाडांची मुळं धरुन ठेवत असावीत. असो...

निसर्गाने भुतानमधलं स्वागत मात्र अप्रतिम केलं... ढगांचे पुंजके... रिपरिपणारा पाऊस...हिरव्यागार डोंगररांगा... असंख्य पक्ष्यांचा किलबिलाट... प्रवासाचा शीण असा जाणवलाच नाही आणि दुपारी 3 च्या सुमारास थिम्फु आलं सुध्दा.