26 August, 2012

आपण परत मागे का जातोय?


आज टिव्हीवरती काकस्पर्शपाहिला... झी टॉकिजचा गाजलेला (की गाजवलेला???) चित्रपट. ज्या लोकांनी जुनं कोकण पाहिलेलं नाही, कथा-कादंबर्‍यांतुन वाचलेलं नाही त्यांच्यासाठी छान छान चित्रीकरण आहे. बाकी आजकाल कोकणाततरी बायका कुठे नऊवारी नेसुन कामं करतात म्हणा. असो. मुद्दा तो नाही. कथा अतार्किक होतीच. कथेचा शेवटही तसाच असणार हे लक्षात आलेलं होतंच... पण तरीही तो अपेक्षेबाहेर अतार्किक झाला. अखेरीस कथेचा नायक हरी म्हणतो... ‘मी कायम तिच्याशी वाईट वागलो. पण तिने माझ्या प्रेमाखातर मी महादेवाला दिलेला शब्द मोडु नये म्हणुन आधीच प्राण सोडला.

कथेचा शेवट असाही होऊ शकतो, ‘महादेव मरतो तेव्हा पिंडाला कावळा शिवला नाही कारण महादेवाचा जीव उमेत अडकला होता... आणि आपल्या भावाने शब्द दिलेला असताना देखील महादेवाचा (म्हणजे त्याच्या आत्म्याचा !!) त्या शब्दावर विश्वास नव्हता. म्हणुनच आपला भाऊ आपल्याला दिलेला शब्द मोडतोय हे समजल्यावर महादेवाच्या आत्म्यानेच उमेला स्वर्गात बोलावुन घेतलं...’ नाहीतरी उमेला काय वाटतंय किंबहुना स्त्रियांना काय वाटतं याला त्या काळी कुठे किंमत होती? मग महादेवाचा आत्मा देखील तसाच विचार करेल नं? मुळात कावळा पिंडाला शिवतो किंवा शिवत नाही याचाच दुसरा अर्थ आत्म्याला विचार करता येतो, त्याला भावना असतात असाही असु शकतो, नव्हे होता आणि आजही आहेच....

आजच्या विज्ञानवादी जगात या अशा आलवणातल्या बायका दाखवण्यामागे, इतर जुन्या रुढी, परंपरा दाखवण्यामागे आणि गाजवण्यामागे (विशेषत: ब्राह्मणांच्या ) नक्की काय अर्थ आहे... या अशा रुढी, परंपरा पाळल्या किंवा मालिका, सिनेमां मधुन गाजवल्या की मगच आपण खरे हिंदुत्ववादी ठरतो का? हिंदुत्वाचा हाच खरा अर्थ आहे का?
हातभर बांगड्या घातल्या, सासु- सुना एकत्र घरात राहिल्या म्हणजेच प्रेम वाढतं हा संदेश मालिकांमधुन का दाखवला जातोय? आज मुंबई मध्ये टीचभर जागेत कोंबुन राहण्यापेक्षा एकाच बिल्डींगमध्ये, एकाच गल्लीत किंवा एकाच गावात दोन वेगवेगळ्या घरांत राहणार्‍या कुंटुबात प्रेम असुच शकत नाही का? काळजी घेतली जाऊच शकत नाही का? ज्यांना शक्य असेल तरी जरूर राहावं पण 300-400 स्क्वे.फुटच्या जागेमध्ये एकत्र राहण्यात काय मजा आहे? आज एकही मालिका किंवा सिनेमा किमान रक्तदानाचं महत्व सांगणारा नाहीय, नेत्रदान, त्वचादान, देहदान वगैरे लांबची गोष्ट आहे... असं का?

चिंता करण्यासारखी गोष्ट आहे!!!

02 August, 2012

वाढदिवस,
दिवाळी नसताना देखील आईकडुन शिकेकाईने धुऊन घेतलेले केस.

वाढदिवस,
आजीने केलेलं मायेचं औक्षण.

वाढदिवस,
मैत्रीणींबरोबर खाल्लेली भेळ.


वाढदिवस,
"अहों" नी आणलेल्या भेटीचं अप्रुप.

वाढदिवस,
"हॅप्पी बत्दे अज्जु" म्हणत गळ्यात पडलेले नाजुक हात.

वाढदिवस,
नचिकेताला भेटण्याची तीव्र होत जाणारी ओढ...

--
मृणाल भिडे.
2 ऑगस्ट 2011