30 December, 2023

Three of us

#movietime 
#moviereview 
#threeofus 
गेल्या काही वर्षांत थिएटरमध्ये जाऊन सिनेमा पाहणं खुप कमी झालंय. तरीही मला एकदा कायझालं, सॅमबहादुर, three of us हे असले सिनेमे बघायचे होते. जमलंच नाही. असो. नेटफ्लिक्स वर three of us आल्याचं समजलं. लगेच पाहिला. रिव्ह्यू वाचले नव्हते मुद्दामहून. 

जे करण जोहर, चोप्रा ॲन्ड कंपनी, रोहित शेट्टी ॲन्ड कंपनीचे फॅन्स आहेत त्यांनी हा सिनेमा बघुच नका. 

शैलजा आणि दीपांकर देसाई हे मध्यमवयीन जोडपं. आणि सारीका आणि प्रदीप कामत हे दुसरं जोडपं. या चौघांचेही एकमेकांत असलेले तरल.... उत्कट.... प्रगल्भ .... आणि आणि ... मऊ मऊ उबदार गोधडीसारखं नातेसंबंध ! बास हे इतकंच साधं सोपं आयुष्य होतं... आहे ... असेल यावर विश्वास ठेवायला भाग पडणारा हा सिनेमा. 

शैलजाला विस्मरणाचा आजार जडला आहे. ती अचानक दीपांकरला वेंगुर्ल्याला जाऊया, म्हणून विनवते आणि आठवडाभरासाठी ते जातात. तिथे शैलजाची भेट तिच्या बालमित्राशी - प्रदीप कामतशी होते. जुन्या आठवणींना उजाळा मिळतो आणि गतकाळातल्या काही जखमांवरची खपली पुन्हा निघते. उद्गम कविता आणि त्या कवितेचा अर्थ जागोजागी सापडणं हा सिनेमा आहे.

अविनाश अरुण यांचा कॅमेरा चौघांच्या नातेसंबंधांची विचित्र, तरीही अलवार, सुंदर गुंफण टिपत राहतो.
काही संवादातून नात्यात गरजेचा असणारा प्रगल्भपणा दिसतो. 
सारीका मिश्किल पणे प्रदीपला म्हणते, "कवी महोदय, इतक्या वर्षात माझ्यावर कविता लिहावी सुचलं नाही. आज बालपणीचं प्रेम दिसलं तर चार ओळी सुचल्या !" तिच्या या वाक्यावर प्रदीप ज्या उत्कटतेने तिचा हात हातात घेतो, तिला बिलगतो ती कविता त्या क्षणात सारीकाच्या मनात रुजते. तिच्यासाठी नसूनही. ...
किंवा सारिका जेव्हा शैलजाला म्हणते, "अजीब तो लगा, पर अच्छा अजीब लगा" त्या क्षणात या चित्रपटाचा सगळा साधेपणा सामावला आहे. 

एक गंमत आता पोस्ट लिहिताना लक्षात आली. प्रदीप स्वत:ची कविता वाचून दाखवतो आहे आणि कवितेतलं काहीही न कळणारा दीपांकर त्याला 'आगे?' विचारतो. प्रत्यक्षात दीपांकरची भूमिका साकारणारा स्वानंद किरकिरे स्वत: एक उत्तम कवी आणि गीतकार. हा मुद्दाम जुळवून आणलेला गंमतीशीर योगायोग असेल कदाचित, पण आवडला.
एक प्रसंगात आकाशपाळण्यात शैलजा आणि प्रदिप थोडा वेळ वरती असतात तेव्हा त्यांच्यातला संवाद अद्भुत आहे. 
अजुन एका प्रसंगात दीपंकर प्रदीप बद्दल बोलताना म्हणतो की त्याला पुरूषांवर विश्वासच नाहीय. पण तो माझ्यावर विश्वास ठेवू पाहतोय कारण तुझा माझ्यावर विश्वास आहे. वा ! काय सुरेख संवाद आहेत हे.! हे इतकं मोजक्या शब्दांत बायकोबद्दलचं कौतुक कसं कोण मांडु शकेल?
अजुन एक, सहजच वाटेल पण बॉलिवूडच्या टिपिकल पुरूषप्रधान संस्कृतीला हादरे बसतील असा आहे. फिरुन आल्यावर दीपंकर शैलजाच्या केसांना तेल लावतोय आणि एकीकडे ते दोघं मुलाशी गप्पा मारतात. फोन बंद झाल्यावर अचानक शैलजा वळते आणि विचारते मी भरतलाच विसरले तर? दीपंकर काही न बोलता केसांवरच थोपटतो आणि शांतपणे पुन्हा तिच्या डोक्यावर तेल मुरवत राहतो. इन मिन पाच सात मिनिटांचा प्रसंग पण हे असं बायकोने नवर्‍याकडुन तेल लावून घेणं मराठी सिरीयल मध्ये होईल? आणि झालंच तर background ला एखादं दर्दभरं गाणं वाजेल किमान दोन एपिसोड तरी नक्कीच संपतील यात आणि कन्सेप्ट ची पुरी वाट लागेल. असो च ते एक. 

शेफाली छायाने शैलजा ची भूमिका फारच अप्रतिम साकारली आहे. She is class apart... तिच्या चेहऱ्यावर वरचे हावभाव, बोलके डोळे पाहणं म्हणजे भारी अनुभव ठरतो. जयदीप अहलावत हा माझा आवडता अभिनेता आहे. मी पहिल्यांदा त्याला गब्बर इज बॅक मध्ये पाहिला. छोटा रोल होता. पण लक्षात राहिला. नंतर गँग ऑफ वासेपुर मध्ये... मग आवडतच गेला. He is versatile. Good underplay acting ! स्वानंद किरकरे चा किंचित काही काळ जेलस होऊन स्वतःच दुखावलेला नवरा आणि शैलजासोबत नव्याने नातं घट्ट झाल्यावर समंजस नवरा छान आहे. 

आता गेल्या काही वर्षांत अचानक कुठेतरी हरवल्यासारखं वाटू लागलं होतं, ते आज कितीतरी दिवसांनी पुन्हा अनुभवायला मिळालं. मन तृप्त झालं, शांत झालं, कुणाच्यातरी मांडीवर डोकं असावं आणि त्या व्यक्तीचा प्रेमळ स्पर्श आपल्याला काहीच सुचवत नाहीय, ती वासना नाही, सहानुभूती नाही काहीच नाही... फक्त कपाळावर, चेहर्‍यावर फिरणारे त्याचे हात आपल्या आत त्याचं प्रेम झिरपवत नेतात, मुरवत नेतात, मनाच्या दुखऱ्या अवघड जागेवर खपली धरु पाहतेय असं काहीतरी अनुभवायला मिळालं.