24 February, 2012

कौस्तुभ आमटे यांच्या आवाहनाच्या निमित्ताने


14 जानेवारीला ठाण्यात कौस्तुभ आमटे आले होते. दुर्दैवाने माझ्याजवळ कॅमेरा नव्हता त्यामुळे मोबाईल मधल्या रेकॉर्डींगवरच समाधान मानावं लागलं. ऑडिओ क्लिप्सची क्वालिटी फारशी चांगली नाहीय. तरीही सर्व लिंकस इथे देते आहे.

मी काही वर्षापुर्वी आनंदवन प्रकल्पाला भेट दिली तेव्हा आणि त्यानंतरही आजपर्यंत जेव्हा जेव्हा हा विषय निघतो तेव्हा ज्या परस्पर विरोधी प्रतिकिया ऐकायला मिळाल्या... त्या सहजपणे आठवत राहिल्या..... मॅगसेसे पुरस्कार मिळाला तेव्हा मी पेपर मधली बातमी वाचत होते.. आता काय मॅगसेसे मिळालाय न... फंडिंग सुरु होईल. हा सहजोदगार होता बाजुच्या बायकांकडुन आलेला...
त्यानंतर एकदा असंच दुपारचं प्रवास करत असताना सोशल टुरीझमच्या नावाखाली अकरावी-बारावीचा कॅम्प गेला होता बहुधा... दोन शिक्षिका आपापसात क्रारवजा सुरात बोलत होत्या, आम्ही गेलेलो न... प्रकल्प वगैरे सगळं आवडलं... मुलांनी प्रश्नही खुप विचारले...पण जेवण एकदमच साधं होतं ग.. आणि रात्री लाईट वगैरे नाहीत मग जरा रीस्कीच वाटलं ते...काही चावलं वगैरे तर.. एकतर जंगल आजुबाजुला.. (ह्या वाक्यावर मात्र मला हसु आलं... जसं काय ह्यांची भर जंगलांत झोपायची व्यवस्था केलेली अशा सुरात सुरु होतं)

मी स्वतः गेले तेव्हा आनंदवन प्रकल्प आणि ताडोबा अशी एकत्रित सहल(?) होती. पण काही कारणास्तव ताडोबाला जाणं अचानक रद्द करावं लागलं तेव्हाही थोडा नाराजीचा सुर उमटलाच!

खरंतर आज आयटी अथवा तत्सम ठिकाणी काम करणार्‍या आणि लाखोंनी पगार घेणार्‍या आमच्या तरुण पिढीला काहीच कठीण नाहीय... पण देण्याची वृत्ती हवी... ती कुठेतरी कमी पडतेय. आज महारोगी सेवा समिती जो 55 कोटींचा शाश्वत निधी जमा करतेय त्यासाठी ह्या तरुणाईला फक्त 10 हजार रुपयांची मदत करणं सहज शक्य आहे.
माझ्या लेखी हा त्यांचा अधिकार आहे, त्यांनाही हक्क आहेच आपल्यासारखं आनंदी आयुष्य जगण्याचा. फक्त त्यांच्या आणि आपल्या आनंदाच्या व्याख्या निराळ्या असतील. स्वतःच्या पोटाला चिमटा घेऊन मदत करा असं नाही म्हणत मी... पण एक महिना मॉल/सिनेमा/ अनावश्यक खरेदी टाळून तो पैसा तिथे द्या बसं इतकीच अपेक्षा आहे. आणि जे कराल ते मनापासुन करा...
आणि ही मदत तुमच्या Corporate Social Responsibility मध्येही बसेल... कारण आज त्यालाही Annual Personal Appraisal मध्ये महत्व आलंय!!
अर्थात सारं काही निराशाजनक नाहीय. कारण 55कोटींच्या सहयोग निधीसाठी आजपर्यंत 13.50 कोटी जमा झालेत...

बस! इतकंच...बाकी जे काही आहे, ते सारं काही कौस्तुभ आमटेंनी आपल्या गप्पांमधुन सांगितलंच आहे...