Showing posts with label तत्संग मोनेस्ट्री. Show all posts
Showing posts with label तत्संग मोनेस्ट्री. Show all posts

16 June, 2010

पारोचा मुक्काम

27 तारखेला बुध्दजयंती निमित्त सरकारी सुट्टी होती म्हणुन पुनाखा गावी जाण्यासाठी लागणार्‍या परमिटचं काम होणं शक्य नव्हतं. म्हणुन आदल्याच रात्री प्रोग्राम बदलुन पारो गावी जायचं ठरवलं.थिम्फुच्या अनुभवावरुन आधी राहण्याची सोय लावली. बॅगा टाकल्या. आणि मग भटकायला बाहेर पडलो. तिथे देखील राष्ट्रीय संग्रहालय बंद!! ते दुसर्‍या दिवशी करायचं ठरवुन बाकीची ठिकाणं पाहीली. तत्संग मोनेस्ट्री, किशु मोनेस्ट्री आणि द्रुगयालचा किल्ला पाहण्यासारखं आहे. मुळातच पारो गाव अतिशय सुरेख आणि कमालीचं शांत.
पारो गावात शिरण्यापुर्वी आम्ही पारो गावाला उंचावरुन वळसा घातला आणि उंचावरुनच पारोचा विमानतळ पाहिला. तीन बाजुंना डोंगर आणि एका बाजुला विमानतळाची धावपट्टी आणि त्याला समांतर असा पारो गावातला रस्ता.
त्यावेळेस तेथे सहजच आकाशाकडे लक्ष गेलं असता निसर्गाचा अद्भुत चमत्कार पाहायला मिळाला. सुर्याभोवती रिंग़ण तयार झालं होतं आणि रिंगणातला भाग काळा होता (की तसा भास होत होता माहीत नाही.) आणि रिंगणाबाहेरचं आकाश मात्र छान निळं होतं. फोटोमध्ये ते टिपण्याचा प्रयत्न तितकासा यशस्वी झाला नाही. फोटोत मात्र दोन्ही ठिकाणी आकाश काळं दिसतंय.

तत्संग मोनेस्ट्री ला ‘Tiger’s Nest’ असंही नाव आहे. तीन हजार फुट उंचीवर असलेल्या या चा खडा चढ चढुन जायला कमीत कमी 3 ते 4 तास लागतात. पद्मसंभव स्वामींनी वाघाच्या पाठीवर बसुन भुतानमध्ये प्रवेश केला ती हीच जागा... अशी आख्यायिका आहे. आयुष्यात एकदा तरी ह्याजागी भेट द्यावी अशी भुतानी लोकांची श्रध्दा आहे.

(नाहीतर आपल्याकडचं काशी-बनारस. तिथे जाऊन काय पुण्य लाभतं माहीत नाही. पण चारधामपैकी एक असलेल्या यमनोत्रीला मात्र खरंच आयुष्यात एकदातरी जावं आणि कोणताही दानधर्म न करता, भरपुर फोटो काढुन, सगळा निसर्ग-हिमालय अनुभवुन, तृप्त मनाने परत यावं तरच आयुष्याचं सार्थक होतं!!!) आम्हांला वारंवार यमनोत्रीची आठवण येत होती. हातात फारसा वेळ नसल्याने आणि तितका उत्साह नसल्याने आम्ही आपले उगाच पाऊण-एक तासाचा चढ चढुन गेलो. इकडे तिकडे फेरफटका मारला. आणि परत आलो.


त्यानंतर असंच मजा म्हणुन द्रुग्यालचा किल्ला पाहिला. द्रुग्यालचा शब्दशः अर्थ “Pride of Bhutan” असा आहे. 1600-1651 मध्ये भुतानमध्ये तिबेटबरोबर झालेल्या अनेक लढाया जिंकल्या आणि वर्चस्व निर्माण केले. त्याची आठवण म्हणुन हा किल्ला बांधला अशी माहीती तेथील एका स्थानिक पर्यटकाने दिली. त्यानंतर किशु मोनेस्ट्री पाहिली. अतिशय प्राचीन आणि मोजक्या मोनेस्ट्री पैकी एक आहे. मग मात्र दुपार झाल्यावर आमचा फिरुन पाहण्याचा उत्साह संपत आला आणि पावसानेपण आपले रंग दाखवायला सुरुवात केली. मग हॉटेलवर आलो आणि थोडावेळ आराम केला. बाहेरचा पाऊस थोडा थांबल्यासारखा वाटल्यावर आम्हांला खोलीवर स्वस्थ बसवेना म्हणुन परत संध्याकाळी बाहेर पडलो आणि एक पायी फेरफटका मारुन आलो... मस्त वाटलं... (असं स्वर्गसुख कोणतीही पर्यटक कंपनी देत नाही...)