16 November, 2022
MajaMaOnPrime
द शम्मी कपूर
12 July, 2020
रात हमारी तो... (परिणीता)
परिणीता मला अनेक कारणांमुळे आवडतो. तो सिनेमा पाहायचा तर त्या दोघांच्या लव्हस्टोरीसाठी बघावा... आणि संजय दत्त / रेखा / आणि बाकी सगळी मेलोड्रामॅटीक लोक पडद्यावर येतात तेव्हा डोळे मिटून घ्यावेत... रेखाच्या जुन्या सिनेमांवर फिदा असलेल्या रेखाला या सिनेमात पाहणं माझ्यासाठी नकोसं होतं... रेखा हा खरंतर एका स्वतंत्र पोस्टचा विषय आहे... असो. रेखा आठवली की भरकटायला होतंच!
एकमेकांशी प्रेमात एकनिष्ठ असणं ही भावना आहे... लग्नसंस्था त्याला फक्त सामाजिक आणि कायदेशीर मान्यता देते इतकंच. हे असं एकनिष्ठ आणि तरीही
स्वाभिमानी असणं विद्या बालनने सहज अभिनयातुन दाखवलाय. कपाटातुन पैसे घेणं... जाऊ नकोस म्हटल्यावर रेखाच्या नाईट क्लबला न जाणं.. वगैरे अनेक प्रसंग आहेत.
पण एक इनमिन पाच-सात मिनिटांचा शॉट आणि त्याला जोडुन आलेलं गाणं मेरे दिल के बहोत करीब है...
लोलिता ... इथे ललिता असा मराठीतला वेडपट उच्चार करायचा नसतो... हां तर ... लोलिताचे वडील आजारी पडल्यावर शेखर त्यांना आणि खरेतर लोलिताला भेटायला आलेला असतो. तिथे आल्यावर शेखरला समजतं की गिरीशच्या खर्चाने लोलिता आणि तिचं कुटूंब परदेशात जातंय.. तिच्या वडलांच्या उपचारासाठी. आधीपासुनच चिडलेला शेखर याही वागण्याचा जाब विचारायला लोलिताकडे जातो आणि तेव्हा शेखरशी जुजबी बोलून गिरीशशी (संजय दत्त .. यांना दुसरा कोणी भेटला नाही का ) सहजपणे बोलत बोलत लोलिता बाहेर जाते. ते पाहून शेखर अजुनच भडकतो. पण त्याला तिच्याशी बोलण्याची गरजही वाटत नाही... (टीपिकल जुन्या काळचा नवरा फिलींग... मेरे होते हुए तुमने ऐसा किया क्यू टाईप्स) शेखर तरातरा पायऱ्या उतरतो आणि भराभर गिरीशशी बोलणं संपवून ... त्याला औषधं आणायला कटवून लोलिता शेखरला भेटते. पायऱ्यांवर फक्त दोघेच पायरीवर असतात... विलक्षण वेगाने आणि आसुसून ती त्याला पाठुन मिठी मारते ... त्या एका मिठीत, चेहऱ्यावरचे भाव सगळं सांगतात... तिचा एकलेपणा... माझा शेखर लग्नाला तयार झाला असेल तरीही तो मनापासून नाही हा विश्वास... कम्यूनिकेशन गॅप असली की हे असं होतं याची जाणीव... ती उत्कटता...
पुढे लोलिता म्हणते, "अब सबकुछ ठीक हो जायेगा." त्या एका वाक्यात तिचा त्याच्याबद्दल असलेला दृढविश्वास शब्दात व्यक्त होतो. नवरा-बायकोने कधीही सर्वासमोर उघड प्रेम दाखवु नये हा त्याकाळचा संस्कार सगळं काही त्या एका मिठीत दिसलाय.
पण भडकलेला शेखर तिचं काहीही ऐकून घेत नाही. त्या दोघांची भांडणं होतात ... तो तिला अद्वातद्वा बोलतो. तिला अवाक होऊन ऐकत राहते. आणि स्वतःची बाजू सांगायला जाते पण खाडकन तिच्या कानफटात वाजवून तो निघून जातो. शेखरचं हे रूप पाहून कमालीचा धक्का बसलेली लोलिता पायरीवर बसते. मागून सूर वाजतात. गाणं वाजायला लागतं. ...रात हमारी तो
कालांतराने सैफ लग्न करायचं ठरवतो आणि तिचं भावविश्व साफ कोलमडते. तिचा स्वाभिमान इथून पुढे फक्त आणि फक्त प्रसंगातून आणि अभिनयातुन दिसतो...
एका प्रेयसीच्या नंतर बायकोच्या नात्याने त्याच्या कपाटातुन घेतलेले सारे पैसे कर्जाऊ होतात आणि ती एक अक्षर मेलोड्रामा न करता गिरीशच्या हातून घराचे पेपर्स पाठवते. तिथून पुढचा मेलोड्रामा बघण्याचा उत्साह मला नसतो. आणि आतापर्यंतच्या अवीट गोडीच्या गाण्यांचा आणि त्यांच्या लव्हस्टोरीचा मझा मी किरकिरा करत नाही.
पक्ष्यांच्या दुनियेत - भाग - ४ (गायबगळा आणि ढोकरी)
गायबगळा (Cattle Egret)
बदलत्या (खरंतर अस्वच्छ!) परीस्थितीतही अजुनपर्यंत टिकुन राहिलेल्या बगळ्यांच्या जातीमधील बगळा म्हणजे “ग़ायबगळा”...
सडपातळ बांध्याचे गायबगळे विणीच्या हंगामाव्यतिरिक्त पांढरे शुभ्र दिसतात. सोनसळी पिवळ्या रंगाचे डोळे, भाल्यासारखी निमुळती, टोकदार चोच, पायांवर पिसांचा अभाव, नर-मादी दिसायला एकसारखी... “व्ही आकाराच्या रेषेत” थव्याने उडताना दिसतात तेव्हा ‘बगळ्यांची माळफुले अजुनि अंबरात’ ह्या भावगीताची आठवण झाल्याशिवाय राहात नाही. पाळीव गाई-म्हशी, बैल, जंगलांमध्ये – रानरेडे, गेंडे, गवे अशा प्राण्यांच्या पाठीवर बसुन निर्वेधपणे राजासारखे हिंडतात. त्यांच्या पायाने उडणारे शेती, पाणथळींच्या ठिकाणी असणारे किडेमकोडे, नाकतोडे, चतुर, टोळ तर खातातच शिवाय प्राण्यांच्या पाठीवरचे, कानामागचे चिलटे, गोचीड वगैरे किटक खातात आणि कासावीस झालेल्या त्यांच्या जिवाला थोडा दिलासा देतात.
गायबगळे खरंतर एकावेळेस ५०-५० च्या संख्येने एकत्र राहणारे पक्षी, पण वाढत जाणार्या शहरीकरणामुळे आणि बेफाम, अविचारी वृक्षतोडीमुळे सर्वच प्रजातीमधील बगळ्यांची संख्या झपाट्याने कमी होते आहे. दिवसभराच्या खाण्याच्या शोधासाठी उडुन-फिरुन थकलेले हे गायबगळे संध्याकाळी रातनिवा-यासाठी (roosting) चिंच, आंबा, वड, पिंपळ अशा आपल्या ठरलेल्या झाडांकडे झेपावतात. त्यातही अशा प्रकारची झाडे शक्यतो माणसांच्या वस्तीनजीक असल्यास त्यांना घुबड आणि गरुड-घारीसारख्या शिकारी पक्ष्यांपासुन असलेला धोका कमी होतो. त्यांना घरटी बांधणे सुरक्षित वाटते. एकाच वेळेस पुर्ण ५०-६० पक्ष्यांच्या थवा वर्षानुवर्षे एकाच झाडावर रात्री राहण्यासाठी आणि काही ठिकाणी तेथेच घरटी बांधायला राहतो. अशा झाडांना सारंगागार असंही म्हटलं जातं. व्यंकटेश माडगुळकर, मारुती चितमपल्ली यांच्या लेखांमध्ये या सारंगागाराची सुरेख वर्णने आहेत. “हा सृजनाचा सोहळा” पाहात राहणे अतिशय विलक्षण असते असंही माडगुळकरांनी त्यांच्या एका पुस्तकात म्हटले आहे.
आपल्या पनवेल गावाच्या थोडं बाहेर आता जिथे डोमिनोज पिझ्झाचं आऊटलेट आहे तिथे आणि तिथुनच जवळ असलेल्या पंचमुखी मारुतीच्या देवळाजवळ बगळ्यांची दोन झाडे होती. अलिबागला जाता-येता दरवेळेस पनवेलमध्ये शिरताना संध्याकाळ व्हायचीच. तेव्हा तिथला फ्लायओव्हरही नव्हता. बगळ्यांचा कालरव सरावाने ऐकु यायचा. आणि पाठोपाठ ते देऊळ दिसायचं. ती झाडे दोन्ही माणसांच्या वस्तीजवळ होती आणि जवळच काळुंद्रे नदीचं पाणी वाहायचं. सारंगागार म्हणुन आदर्श जागा होती ती... कालांतराने रस्ता रुंदीकरणात देऊळ ठेवलं आणि ती दोन्ही झाडे मात्र तोडली गेली. बगळ्यांचे निवासस्थान कायमचे गेले. कोणाला न खेद, न खंत! गेल्याच वर्षीच्या पावसाळ्यात बल्लाळेश्वर तलावामध्ये बगळ्यांचा लहान थवा दिसला होता पण आता या वर्षी अविचारी बुजविण्यामुळे तिथुनही जवळपास सारेच पाणपक्षी गायब झालेत.
ढोकरी (Indian Pond Heron)
ढोकरी म्हणजेच हेरॉन च्या प्रजातीदेखील अगदी सहजपणे पाणथळ जागी, धरणे, पाण्याचे कालवे, खाडीची दलदल, शेती इत्यादी ठिकाणी दिसुन येतात. सोबत दिलेला फोटो इंडियन पॉन्ड हेरॉन या जातीच्या पक्ष्याचा आहे. याशिवाय राखी ढोकरी (Grey Heron), जांभळी ढोकरी (Purple Heron) तसेच उरण आणि पणजे गावाजवळील पाणथळी (uran and panje wetlands conservation area) असणारी रातढोकरी (Black Night Heron) इत्यादी प्रजाती सहजपणे दिसतात.
दिसायला कोंबडीएवढ्या आकाराचा मातकट पाठीचा आणि पांढर्या पंखांचा हा पक्षी कोकणातील भातखाचरांमध्ये सहजपणे दिसतो. भातखाचरांमधील खेकडे, कोळी, छोटे मासे, बेडुक हे यांचं मुख्य खाद्य... भातांची रोपे आपसुक सुरक्षित राहात असल्याने शेतकरीदेखील हाकलुन लावत नाहीत. कोकणात त्यांना भुरे बगळे असंही त्यांना म्हटलं जातं. गळा, मान आणि छातीच्या बाजुस पांढर्याु रंगावर पिवळ्या- गडद तपकिरी रेषांमुळे आणि खाद्य पकडताना अतिशय निश्चल उभा राहात असल्याने पटकन आजुबाजुच्या वातावरणात इतका मिसळुन जातो की एकदम उडाल्यावरच लक्षात येतो. इतर बगळ्यांप्रमाणेच हेरॉन्स देखील थव्याने एकत्र शक्यतो एकाच झाडांवर वस्ती करतात.
इंग्रजी भाषेतील “Heronry” म्हणजे आपल्याकडील सारंगागार शब्द यांच्याचवरुन आलेला आहे. बेसुमार वृक्षतोडीमुळे आणि दिवसेंदिवस कमी होत जाणार्याक पाणीसाठे, प्रदुषित होणारे नदीकिनारे, खाडीकाठची दलदल यांच्यामुळे हेरॉन्स, इग्रेट, आयबिस, इत्यादी पक्ष्यांची संख्या झपाट्याने कमी होते आहे. हे सारेच पाणपक्षी आणि त्यांची सारंगागारे निसर्गचक्रात महत्वाची भुमिका बजावतात. ह्या पक्ष्यांची विष्ठा जमवुन त्यांचे शेतजमिनीत खत म्हणुन वापर केला जातो. तसेच ह्या पक्ष्यांचे मुख्य खाद्य टोळ, चतुर, गोचीड, सरडे यासारखे किटक आणि बेडुक, खेकडे यासारखे पाण्यातले लहान प्राणी हे ह्या प्रकारच्या पक्ष्यांचे मुख्य खाद्य असल्याने खरंतर पिकांवरील कीड नैसर्गिकरीत्या नियंत्रणात राहण्यास मदत होते. महाराष्ट्रात सर्वच ठिकाणी झपाट्याने सारंगागारे कमी होत असताना मात्र गडचिरोली जिल्ह्यातील वघाळा या गावी मात्र असलेल्या मोठ्या सारंगागारचे रक्षण तेथील गावकरी मोठ्या प्रेमाने करत आहेत...

