10 June, 2010

प्रवास सुरु...

ती दिव्य लेखी परीक्षा... आणि अजुन काय काय... हजार-बाराशे शैक्षणिक सोपस्कार पुर्ण झाले.. आणि मी एकदाची सुटले.... अभ्यासाची हौस पुरेपुर फिटली.

24 मे ते 2 जुन असा 10 दिवसाचा प्रोग्राम ठरवला होता.. पण जास्त वेळ प्रवासात घालवायची इच्छा नसल्याने मुंबई-कोलकाता विमान प्रवास आणि कोलकाता-न्युअलिपुरदुआर हा प्रवास रेल्वेने केला. न्युअलिपुरदुआर हे स्टेशन न्युजैलपैगुडी या स्टेशनच्या पुढे आहे. या स्टेशनला उतरुन सिक्किम वगैरेसाठी जाता येतं. त्यामुळे काहीजण सिक्किम वगैरे करुन तिथुनच भुतान साठी जातात. पण त्यासाठी हातात किमान 15 दिवस हवेत आणि प्रोगाम व्यवस्थितपणे आखायला हवा. कारण भुतान मध्ये प्रवेश करताना आधी सिक्किम वरुन खाली NJPला (न्युजैलपैगुडी) यावं लागतं आणि तिथुन फुंटशोलिंगला (भारत-भुतान हद्दीवरील भुतान मधील गाव) जावं लागतं. तिथे प्रवेश परवाना तयार केला जातो आणि या सगळ्यासाठी किमान एक दिवस तरी जातोच.
आम्ही हे असे काही तिरपागडे उद्योग न करता सरळ न्युअलिपुरदुआरला उतरलो. आणि तिथुन स्थानिक बसने जॉयगावला (भारत-भुतान हद्दीवरील भारतामधील गाव) गेलो. कोलकाता-न्युअलिपुरदुआर (कामरुप एक्सप्रेस) रेल्वेप्रवासात काय वाटेल ते विकायला येत होतं. दुर्बिणीपासुन सिंथेसायजर पर्यंत....मोबाईल चार्जरपासुन रुबी जिगॅसा पझलपर्यंत आणि शहाळ्यापासुन उकडलेल्या अंड्यांपर्यत वाटेल ते. एका शर्टविक्रेत्याला आणि एका पानवाल्याला आमच्या शेजारच्या लोकांनी प्रश्न विचारुन मस्त भंडावलं... त्यामुळे मस्त करमणुक झाली. पहाटे (म्हणजे माझी पहाटच !!) 6.30ला NJP आलं आणि 9.25ला न्युअलिपुरदुआर.

6 पासुनच सगळा बाहेरचा परीसर छान हिरवागार दिसायला लागला होता. छोटी बांबुच्या चटयांची टुमदार घरं आणि घरासमोर किंवा शेतात एका कडेला असलेली तळी... मधुनच बांधाकडेला फुललेली रानफुलं... एकुण सगळा माहोल मस्त ओला गच्च हिरवा होता. हिरव्या रंगाच्या अगणित छटा... कुठे करडा-हिरवा, कुठे पोपटी, क़ुठे गडद हिरवा... लांबवर पसरलेली शेतं. भरुन आलेलं आभाळ. काही ठिकाणी पडुन गेलेला पाउस आणि निरभ्र झालेलं आकाश. रस्त्याकडेला आलेली ओल....हा असाच माहोल पार पुढपर्यंत म्हणजे जॉयगावपर्यंत टिकुन होता... जॉयगावला आता आलेला शहरी बकालपणा जाणवत होता. तिथुनच पाच मिनिटाच्या अंतरावर भुतानच्या हद्दीत असलेलं फुंटशोलिंग गाव मात्र छान आखीव-रेखीव आहे आणि हाच आखीव रेखीवपणा भुतानला आम्ही पाहिलेल्या तिन्ही शहरांमध्ये दिसला. घरगुती परिचयातील एक स्नेहींच्या ओळखीने तेथील स्थानिक व्यक्तीशी मुंबईमधुनच फोनवर बोलणं झालं होतं. त्यानुसार त्यांनी फुंटशोलिंगच्या हॉटेलमध्ये राहायची व्यवस्था केली होती. केवळ त्यांच्याच ओळखीने इमिग्रेशन ऑफिस बंद झाल्यावर देखील प्रवेश परवाना मिळाला. अर्थात आपण भारतीय असल्याचा हा अजुन एक फायदा!! त्यांनीच पुढील 7-8 दिवसांसाठी गाडीची व्यवस्था करुन दिली.

1 comment: