11 June, 2010

थिम्फुच्या वाटेवर...



26 तारखेला सकाळी 10 वाजता ग़ाडीने थिम्फुला जायला निघालो. फुंटशोलिंग-थिम्फु प्रवास 5 ते 6 तासाचा आहे. सुरेख निवांत रस्ते... क्षणा क्षणाला बदलत जाणारा निसर्ग यामुळे प्रवास फार मजेचा झाला.. भुतानमध्ये जवळपास 70% भागात वनं राखुन ठेवली आहेत. अर्थात त्याला थोडं धार्मिक कारण आहे. तेथील जनतेची भुतं-खेतं, आत्मे, पुर्नजन्म वगैरे गोष्टीवर श्रध्दा आहे आणि तेथील निसर्गाला हात लावला, गरजेपेक्षा जास्त उपयोग केला तर निसर्गात राहाणारे आत्मे दुखावले जातील अशी जुन्या भुतानी लोकांची भावना आहे. “Gross National Happiness” ही तेथील विकासाची मुलभुत संकल्पना मानली जाते. पैशापेक्षा आत्मिक समाधान महत्वाचे!! आणि याच भावनेपोटी आज इतर देशांपेक्षा तेथील वनसंपत्ती अजुन तरी टिकुन राहिली आहे. त्याचा प्रत्यय भुतानमध्ये फिरताना जागोजागी आला. सर्वत्र जमिनीवर आणि डोंगरउतारावर असंख्य जातीची झाडं दिसुन आली. बराचसा प्रवास देखील सावलीमधुनच झाला.

भुतान मधील सर्वच रस्ते भारतीय सेना आणि भारतीय सीमा रस्ते संघटना [Border Road organization (BRO)] यांच्या सहकार्याने बांधण्यात आले आहेत. आणि रस्त्यांच्या देखभालीसाठी देखील भारत सरकारची मदत घेतली जाते. घाटांमधुन प्रवास करताना एक महत्वाचा फरक सातत्याने जाणवला. आपल्या इथे घाटांमध्ये रस्ते तयार करताना पार वरपर्यंत झाडं तोडली जातात. कारण काहीही असो... भुतानमध्ये मात्र जितकी गरज आहे तितक्याच उंचीपर्यंत झाडं तोडली आहेत आणि खालच्या भागाला बहुधा सिमेंटचं आणि मोठ्मोठ्या दगडांचा आधार देणारं बांधकाम केलेलं आहे. (बहुधा अशासाठी की चालत्या गाडीतुन पाहिलं असलं कारणाने नीटसं कळलं नाही.) तिथेही चा प्रश्न आहेच. पण तुलनेने तोडलेला भाग लवकर सेट होतो म्हणजे सुरुंगस्फोटामुळे जिथपर्यंत माती ढासळली आहे तितकीच खाली येते असं ड्रायव्हरच्या बोलण्यावरुन ज़ाणवलं याला माझ्या अंदाजाने अजुन एक कारण असेल ते म्हणजे झाडं पार वरपर्यंत तोडली जात नाहीत. परिणामी खालची माती निसटुन जाते पण वरची माती मात्र झाडांची मुळं धरुन ठेवत असावीत. असो...

निसर्गाने भुतानमधलं स्वागत मात्र अप्रतिम केलं... ढगांचे पुंजके... रिपरिपणारा पाऊस...हिरव्यागार डोंगररांगा... असंख्य पक्ष्यांचा किलबिलाट... प्रवासाचा शीण असा जाणवलाच नाही आणि दुपारी 3 च्या सुमारास थिम्फु आलं सुध्दा.

No comments:

Post a Comment