28 July, 2012

प्रेम सुकुन गेलंय
बकुळफुला सारखं,
गंध मात्र दरवळतोय...


मैत्री निष्पर्ण झालीय
ग्रीष्माचा तडाखा सोसत,
वठलेलं खोड मात्र उभंच आहे...


वात्सल्य आटुन गेलंय
दुष्काळाची चाहुल घेत
निवडुंग मात्र बहरतोय ....


भावना जळुन गेल्यात
कापरासारख्या,
राख देखील उरली नाही...

नाती संपुन गेलीत,
आयुष्य संपत आलंय,
अस्तित्वाच्या पाऊलखुणा पुसल्या जातील
एका क्षणात!!

--
मृणाल भिडे
28 जुलै 2012




26 March, 2012

पाउस आता निनादणार नाही.

गच्च भरलेला तो बारावीचा कोचिंग क्लासेस चा छोटा वर्ग... टारगट मुलांमध्ये फेमस असलेला तो शिक्षक (??)  नामक प्राणी... त्याच्या तासाला बसायचं  म्हणजे जीवघेणी शिक्षा असायची. पण अचानक कधीतरी ठरलेला विषय रद्द व्ह्यायचा आणि तो न सांगता उगवायचा... कलटी मारायला पण मिळायचं नाही. त्यादिवशी असंच झालं आणि तो प्राणी उगवला... बाहेर पाउस यायला सुरुवात झालेली... तो वर्गात आल्यावर पोरांनी दंगा केला आज पावसावर आणि तिच्यावर बोला म्हणून.... मी शिस्तीत दुसर्या बाकावर डोक टेकून कानात इअरफोन्स घातले... गाण्याचा आवाज वाढवणार इतक्यात पहिली ओळ कानावर आली... ती गेली तेव्हा पाऊस रिमझिम निनादत होता... या माणसाला हि कविता माहिती असेल ही मला अपेक्षाच नव्हती.. इतके दिवस फक्त पहिल्या दोन ओळी कुठल्यान कुठल्या संदर्भात वाचल्या होत्या.. नकळत इअरफोन्स काढले गेले... आणि डोळे मिटून तल्लीन होऊन ती कविता ऐकली... इथेच ग्रेस नावाच्या वादळाशी झालेली पहिली ओळख..

कविता संपल्यावर मलाच त्यावरती बोलायला लावल... काय बोलले ते आठवत नाही आता... पण ती काळ-वेळ आठवते... आणि क्लास मधून बाहेर पडताना चक्क त्या प्राण्याला मी म्हटलं देखील. मला ह्या कवितेची तुमच्या कडून अपेक्षा नव्हती...  बिचारयाचा चेहरा पडला.. कारण त्या माणसालाही समजलेल कानात इअरफोन्स घालून बसणारी ही एकमेव मुलगी चक्क आज इअरफोन्स काढून बसली होती...

आज हे ग्रेस नावाच वादळ शांत झालंय. कॉलेज च्या दिवसात झपाटल्या सारख्या कविता वाचलेल्या... मध्यंतरी त्यांना बरं नसल्याचं समजलं तेव्हा पुन्हा एकदा त्या कविता वाचायला हव्यात असं ठरवलेलं.. राहूनच गेलं... घर थकलेले संन्यासी... भय इथले संपत नाही... पाऊस कधीचा पडतो (हे माझं अजून एक आवडत गाणं)... अशा अनेक कवितांवर लिहायचं ठरवलेलं... आता मात्र नेट लावून लिहायला हवं... हीच खरी त्यांना आदारांजली ठरेल.. 

24 February, 2012

कौस्तुभ आमटे यांच्या आवाहनाच्या निमित्ताने


14 जानेवारीला ठाण्यात कौस्तुभ आमटे आले होते. दुर्दैवाने माझ्याजवळ कॅमेरा नव्हता त्यामुळे मोबाईल मधल्या रेकॉर्डींगवरच समाधान मानावं लागलं. ऑडिओ क्लिप्सची क्वालिटी फारशी चांगली नाहीय. तरीही सर्व लिंकस इथे देते आहे.

मी काही वर्षापुर्वी आनंदवन प्रकल्पाला भेट दिली तेव्हा आणि त्यानंतरही आजपर्यंत जेव्हा जेव्हा हा विषय निघतो तेव्हा ज्या परस्पर विरोधी प्रतिकिया ऐकायला मिळाल्या... त्या सहजपणे आठवत राहिल्या..... मॅगसेसे पुरस्कार मिळाला तेव्हा मी पेपर मधली बातमी वाचत होते.. आता काय मॅगसेसे मिळालाय न... फंडिंग सुरु होईल. हा सहजोदगार होता बाजुच्या बायकांकडुन आलेला...
त्यानंतर एकदा असंच दुपारचं प्रवास करत असताना सोशल टुरीझमच्या नावाखाली अकरावी-बारावीचा कॅम्प गेला होता बहुधा... दोन शिक्षिका आपापसात क्रारवजा सुरात बोलत होत्या, आम्ही गेलेलो न... प्रकल्प वगैरे सगळं आवडलं... मुलांनी प्रश्नही खुप विचारले...पण जेवण एकदमच साधं होतं ग.. आणि रात्री लाईट वगैरे नाहीत मग जरा रीस्कीच वाटलं ते...काही चावलं वगैरे तर.. एकतर जंगल आजुबाजुला.. (ह्या वाक्यावर मात्र मला हसु आलं... जसं काय ह्यांची भर जंगलांत झोपायची व्यवस्था केलेली अशा सुरात सुरु होतं)

मी स्वतः गेले तेव्हा आनंदवन प्रकल्प आणि ताडोबा अशी एकत्रित सहल(?) होती. पण काही कारणास्तव ताडोबाला जाणं अचानक रद्द करावं लागलं तेव्हाही थोडा नाराजीचा सुर उमटलाच!

खरंतर आज आयटी अथवा तत्सम ठिकाणी काम करणार्‍या आणि लाखोंनी पगार घेणार्‍या आमच्या तरुण पिढीला काहीच कठीण नाहीय... पण देण्याची वृत्ती हवी... ती कुठेतरी कमी पडतेय. आज महारोगी सेवा समिती जो 55 कोटींचा शाश्वत निधी जमा करतेय त्यासाठी ह्या तरुणाईला फक्त 10 हजार रुपयांची मदत करणं सहज शक्य आहे.
माझ्या लेखी हा त्यांचा अधिकार आहे, त्यांनाही हक्क आहेच आपल्यासारखं आनंदी आयुष्य जगण्याचा. फक्त त्यांच्या आणि आपल्या आनंदाच्या व्याख्या निराळ्या असतील. स्वतःच्या पोटाला चिमटा घेऊन मदत करा असं नाही म्हणत मी... पण एक महिना मॉल/सिनेमा/ अनावश्यक खरेदी टाळून तो पैसा तिथे द्या बसं इतकीच अपेक्षा आहे. आणि जे कराल ते मनापासुन करा...
आणि ही मदत तुमच्या Corporate Social Responsibility मध्येही बसेल... कारण आज त्यालाही Annual Personal Appraisal मध्ये महत्व आलंय!!
अर्थात सारं काही निराशाजनक नाहीय. कारण 55कोटींच्या सहयोग निधीसाठी आजपर्यंत 13.50 कोटी जमा झालेत...

बस! इतकंच...बाकी जे काही आहे, ते सारं काही कौस्तुभ आमटेंनी आपल्या गप्पांमधुन सांगितलंच आहे...

07 December, 2011

सेल्फ-हेल्प

.... माणसं किती अवास्तव महत्त्व देतात ह्या सेल्फ हेल्प च्या पुस्तकांना.... जसं काही हे पुस्तक वाचलं की लगेच दुसर्‍या दिवशी आपण यशाच्या शिखरावर असणार आहोत असं वाटत असतं. पण त्यासाठी मेहनत करायची मात्र बहुतांशी लोकांची तयारी नसते. न मानसिक, न शारिरीक... आर्थिक वगैरे बाबी फार नंतरच्या गोष्टी!!

आज ह्याच पुस्तकांविषयी! मुळात ही पुस्तकं अशा लोकांसाठी असतात की ज्यांना स्वत:च्या आयुष्याला खरेपणाने सामोरं जाण्याची हिंमत नसते, खरंतर संकटं आणि परीस्थिती माणसाला सगळं शिकवते. पण ते शिकण्याची ताकद हवी. आणि ते त्यावेळेला डोकं शांत ठेवुन समजुन घ्यायला हवं... माणुस निराश केव्हा होतो... जेव्हा त्याच्या हातात काहीच नसतं तेव्हा... पण शंभरपैकी नव्व्याणव वेळा त्याची स्वतःची चुक असतेच. लहान असो किंवा मोठी... आणि म्हणुन त्याच्या हातातुन ते निसटलेलं असतं. हे तो/ती लक्षात घेतो का? मुळात स्वतःची चुक मान्य करतो का?? गरज पडली तर समोरच्या माणसाजवळ... मग तो समोरचा कोणी परीस्थितीवर अवंलबुन असतो. बायको-मुलं/ भाऊ-बहीण/ आई-बाबा/ काका-मामा इथपासुन ते ऑफिसमधला बॉस अगदी शिपाई सुध्दा... गैरसमज झाले असतील तर ते दुर करतो का?? पाया चुकला की कळस हाती कसा लागेल हे तो का लक्षात घेत नाही... आणि स्वतःच्या चुका मान्य केल्या त्यातुन बाहेर पडायचा रस्ताही सापडतोच.

अशी पुस्तकं स्पुन-फिडिंग करतात, सांगतात नेमकं काय करा म्हणजे यशस्वी व्हाल... पण तरीही लोक अयशस्वी का होतात आणि ही पुस्तकं सर्वाधिक खपाची का ठरतात??? संशोधनाचा विषय आहे!! माझ्यामते थोड्या-अधिक फरकाने सगळीच पुस्तकं हेच सांगतात की स्वत:वर विश्वास ठेवा, चुका मान्य करा, काम मन लावुन करा... आणि आयुष्य उत्कटपणे जगा... लोकं अयशस्वी होतात कारण मुळात यांना वाटत असतं ‘हो... हे असं च करायला पाहिजे.’ पण चुका मान्य करायच्या म्हटलं की ह्यांचा इगो आड येतो. मग कामात लक्ष लागत नाही. त्यात पुन्हा नव्याने चुका होतात... दुष्टचक्र सुरु होतं. आयुष्य उत्कटपणे जगायचं म्हणजे नेमकं काय ह्यात ही ह्यांचा गोंधळ उडतो... विकएंडसना मॉलमध्ये जाणं, हजार-पाच हजार उडवणं ह्यात आनंद शोधु पहातात. पण खरंच ह्यातुन आनंद मिळतो? मग सचिन-केसरी सारख्या नामवंत टुर्स बरोबर बाहेर फिरणं... ह्यात पैसा खर्च होतो. नक्की गरज असते का ह्या सगळ्याची? साधं आपल्या परीसराच्या आजुबाजुला फिरणं ह्यांच्यासाठी आनंददायी असु शकत नाही... घरात मुलांबरोबर उश्या-तक्के घेऊन मारामारी करणं, बेसुरं का असेना गाणी म्हणणं.. मुळात आजच्या गॅजेटसना पुर्ण बाजुला ठेवुन बोलणं जमत नाही... स्वतःतल्या ‘मी’ ला पहायला घाबरतात हे लोक. आणि म्हणुन गॅजेटसशिवाय कासावीस होतो ह्यांचा जीव.

मी सेल्फ-हेल्प बुकस च्या विरोधात नाहीय पण हताश झाल्यावर हलकी-फुलकी पुस्तकं वाचली तरी ताजंतवानं वाटतं. आज पुन्हा प्रभाकर पेंढारकरांचं रारंगढांग वाचताना लक्षात आलं. काही पुस्तकं सहजपणे परिस्थितीला सामोरं जायला शिकवतात. त्यापैकीच हे एक पुस्तक. साध्या साध्या वाक्यांमधुन नकळत बरंच काही शिकवणारं, विचार करायला लावणारं हे अप्रतिम पुस्तक!
“...मी कोण? हा विश्वातला सगळ्यात मोठा गहन प्रश्न. स्वतःला पाहणे हाही साक्षात्कार होऊ शकतो. मी हे का करतो या प्रश्नाचे उत्तर शोधणारा माणूस जसा अनावश्यक अनेक गोष्टी करणे टाळतो तसा काही गोष्टी कोणत्याही परिस्थितीत झाल्याच पाहिजेत ह्या निर्धाराने उभे रहायचे ठरवतो. ह्या गोष्टी कोणत्या हा शोध प्रत्येकाने स्वतःच घ्यायचा असतो. त्या एकदा ठरल्या की त्या बाबतीत कोणतीही तडजोड न करता झगडणं हाच जीवनाचा उद्देश असतो...”
हा एक... यासारखे असंख्य प्रसंग... सांगता येतील.....

16 June, 2011

एक तरी मैत्रीण असावी
बाईकवर मागे बसावी...
(सालं इथे मी एकटा जरी बाईकवर बसलो तरी ही केकटत असते...एकदा धडपडलास ते पुरे नाही का?)
नी हीरो होंडा सुद्धा मग
करिझ्माहून झकास दिसावी !

एक तरी मैत्रीण असावी
चारचौघीत उठून दिसावी.
(महा बावळट ध्यान आहे!)
बोलली नाही तरी निदान
समोर बघून गोड हसावी !
(ते सांगायला लागत नाही... खिदळखापरीच आहे नाहीतरी...)


एक तरी मैत्रीण असावी
कधीतरी सोबत फिरावी
(हे स्वप्न कधी पुरं होईल? जाम नखरे आहेत अंगात! काय जगाची उस्तवार करते कोण जाणे?)
दोघांना एकत्र पाहून
गल्लीतल्या सगळ्या पोरांची जिरावी !

एक तरी मैत्रीण असावी
जिच्याशी निर्मळ संवाद असावा
कधीतरी छोट्या भांडणाचा
एखादाच अपवाद असावा..
(दर दुसर्‍या मिनिटाला होणारी आणि पाचव्या मिनिटाला संपणारी भांडणं!
नाही झालं तरच तो अपवाद! आणि मोठ्या हिरिरीने भांडते...)

एक तरी मैत्रीण असावी
आयुष्याच्या अनोळखी वळणावर
तुमच्या व्यथा वेदनांवर
तिने घालावी हळूच फुंकर...

एक तरी मैत्रीण असावी
जिच्या मैत्रीत विश्वास रुजावा
तुमचासुद्धा खांदा कधी
तिच्या दुःखाने भिजावा...


एक तरी मैत्रीण असावी
चांदणीसारखी मैत्रीच्या आकाशात
मित्रांचे दिवे मावळले म्हणजे
चालावं पुढे तिच्याच प्रकाशात...
(बापरे! इतका विश्वास टाकायचा तिच्यावर? आधीच डोक्यावर बसलीय... अजुन शेफारेल!!)