29 April, 2024

अमलताश फिल्म

अमलताश .... पुन्हा एकदा !
 राहुल देशपांडे कलेक्टीव्ह करोनाच्या काळात सुरू झालं. मी बरंच सुरूवातीपासून ते फॉलो करत होते... करते आहे. अचानक फेब्रुवारी महिन्यात "तृषा" गाणं ... अमलताशचे पहिले गाणे आले, ऐकले आणि थरारले... पहिल्यांदा आकर्षण, अचंबा वाटला तो अमलताशच्या फुलांचा उल्लेख गाण्यात. ? प्रकाश नारायण संतांच्या घराचं नाव असलेला अमलताश चक्क गाण्यात? काहीच दिवस फुलून अचानक गायब होणारी हि बहाव्याची घुंगरू वजा फुलं काय म्हणून गाण्यात घ्यावी वाटली असतील? मग एकेक गाणं रिलीज होत गेलं... जोडीला युट्यूब व्हिडीओ कव्हर म्हणून (बहूतेक) water color मधली मयुरेश भायदे समीर कुलकर्णी यांची अप्रतिम illustrations... सिनेमा व्यावसायिक नाही हे तर समजलं होतंच. पण प्रायोगिक नाटकं असतात तसा हा सिनेमा? हा बघायचाच. मी फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात पूर्ण ऑडीओ आल्बम स्पोटिफायवर आला. आख्खा दिवस मी "मॅड मॅड मॅड" होऊन तो आल्बम ऐकत राहिले. अगदी ते instrumental pieces ही. 

सतत कुठे रिलीज होतोय कधी रिलीज होतोय याची वाट पाहत होते. "एकदा काय झालं?" सिनेमा मी अशाच आळसापायी चुकवला होता. नंतर तो अजुनही OTT वरही आलेला नाहीय. हा मात्र मी काही झालं तरी चुकवणार नव्हते. म्हणतात न, "पुरी शिद्दत से चाहो तो .. " वगैरे .... तसंच झालं. मी रविवारच्या शो चं तिकीट बुक केलं. थिएटर ला जाऊन जागेवर बसले आणि दीर्घ श्वास घेतला. सिनेमा पाहिला... being a passionate photographer म्हणून तो सिनेमा बेहद आवडला. राहुल देशपांडेची फॅन म्हणून गाणी आवडली. छान त्याच मुडमध्ये तरंगत तरंगत घरी आले.

साधी सोपी (खरंतर चारच ओळीत संपणारी आणि अत्यंत predictable अशी 😉 😀 ) राहुल-किर्तीची प्रेमकथा ... राहुल(राहुल देशपांडे),पवन (भुषण मराठे) आणि त्याचे दोन मित्र अशा चौघांचा Cinnamon Chai नावाचा अस्सल पुणेकरांचा रॉक बँड. आणि दुसरीकडे किर्ती नावाची मुळची भारतीय पण आता कॅनेडियन शेतकरी मुलगी ...

राहुल पुणेकर त्यातही सदाशिवपेठी असल्याकारणाने त्यांचा ऐसपैस स्टुडिओ असुनही गिचमिड जागेत"च" ( च महत्वाचा) रंगणारी jamming sessions... आणि आख्ख्या सिनेमाभर फिरणारे शेंगदाण्याचे लाडुचे हास्यास्पद प्रसंग... ते दाण्याच्या लाडवांचे लाडे लाडे प्रसंग म्हणजे अस्सल रेशमी माहेश्वरीला जुन्या गाऊनची ठिगळं लावल्यासारखे वाटतात. मी तिच्या जागी असते तर दाण्यांची उसाभर करण्यापेक्षा येईल त्या किमतीला दाणे किराणामालाच्या दुकानात विकुन आले असते. तो वेळ दुसरं काही अधिक creative केलं असतं. माझ्यासारख्या नको तितक्या minimalist attitude आणि practical मुलीला ते लाडु खटकलेच. 

तर ते असो.... सिनेमा फक्त दोन कारणांमुळे बघावा.
 1. अप्रतिम अशी सिनेमॅटोग्राफी. तेही तुम्ही जर फोटोग्राफी आणि चित्रकला या दोन्ही कलेच्या बाबतीत aggressively passionate असलात तर आणि तरच हा सिनेमा बघताना तुम्हाला मज्जा येईल. त्या अर्थाने हा सिनेमा मोठ्या पडद्यावर पाहिला त्याचं सार्थक झालं. पुणं हे माझं वैयक्तिक नावडतं असलं तरी शहराच्या प्रेमात असलेली माणसं जेव्हा शहराची फक्त देखणी बाजूच चित्रित करतात तसंच ह्या सिनेमाचं आहे. आणि म्हणुन मी माझी मतं बाजूला ठेवली, मला सिनेमा पाहताना छान वाटलं.

पण. .. लेख लांबेल खरंतर. पण लिहितेच. निम्मा वेळ कॅमेरा पुण्यातल्या रस्त्यावरून आणि खासमखास जागांमधून फिरतो तरीही पुणे शहर एक स्वतंत्र पात्र म्हणुन सिनेमात दिसत नाही. ( In reality Old Pune is itself a good cinematic character. ) सिनेमातली पात्र टिपिकल पुणेरी गोष्टी करतात. उदाहरणार्थ वाडेश्वर भुवन., टेकडीवर जाणे, अमृततुल्य चहा इत्यादी... हे पुणे स्पॉटिंग खुद्द पुणेकरांना कितपत आवडलं असेल कोण जाणे... 

2. राहुल आणि त्यांच्या मित्रांचा बँड कालांतराने बंद झाला असला ( किंवा नाईलाजाने बंद केला असला ) तरी राहुल स्वतः पवनबरोबर वाद्यांचे दुकान चालवतो. बरोबरीने गाणी कंपोझ करणं सुरू असतंच. त्यामुळं संगीत, कविता सिनेमाचा गाभा असला तरी ते हळुवारपणे येत राहतं. अमलताश आल्बम हा एक स्वतंत्र आहे. त्यात असलेली गाणी सिनेमात जशीच्या तशी आलेली नाहीत. शान्ता शेळके यांचे शब्द असलेलं 'सरले सारे तरीही मागे शपथ गळ्याची उरते' हे गाणं आणि मयुरेश वाघ यांचं तृषा हे गाणं फार काळ सोबत राहणार आहे. अमलताश आल्बम ऐकुन सिनेमा बघाल तर भ्रमनिरास होईल. आल्बम जितका श्रवणीय आहे तितक्या ताकदीने कथा उत्तम सुरात, नाट्यमयरित्या पडद्यावर आलेली नाहीय..

आता कथेविषयी... इथे खरंतर फारसं बरं बोलावं असं नाहीय. पण तरीही जे आवडलं तितकंच लिहिते.

बहावा तसा कमी काळासाठी बहरणारा त्यातही सृजनाची चाहूल देणारा वृक्ष मानला जातो. पण बहरतो असा की बघणाऱ्याचा जीव वेडापिसा व्हावा. प्रत्येक पानापानांतून लखलखीत सोनपिवळ्या फुलांचे घोस लटकू लागतात. आणि एकदिवस अचानक बहर ओसरत जातो... बहर ओसरत आला की पावसाची चाहूल लागते. 

राहुल आणि किर्तीची प्रेमकथाही तशीच काहीशी! एका वळणावर दोघे एकत्र येतात. हसतात, गाणी गातात, एकमेकांचे लाड करतात, भरभरून जगतात.. एका कातर क्षणी त्यांना उमगतं हा प्रवास असाच संपणार आहे आणि ... आणि किर्तीला सृजनाची चाहूल लागते. कुठे कॅनडा आणि कुठे सदाशिवपेठ !

जे प्राक्तन आहे, जसं आहे ते स्थितप्रज्ञ राहून स्विकारलेला राहूल पाहताना मीच अस्वस्थ झाले. OT , pre-operative tests मला काही नवीन नाहीत. (इथेही ते शॉट्स विनाकारण लांबवलेत.) मी यातुन गेलेय. मी स्वतः आणि मग आई म्हणुनही ... डोक्यावरचे केस भादरताना पाहणं मला फार रिलेट झालं ... आणि त्याच क्षणार्धात "अमलताश " नावाचा अर्थ काळजात सपकन् घुसला ! खूप कमी वयात मरण जवळून पाहिलेल्या आणि एक स्वल्पविराम आयुष्याला लागल्यावरही पुन्हा उठून उभ्या राहणाऱ्या मला प्रेमाची खुप किंमत आहे. मी निस्वार्थपणे प्रेम करणं हे काय असतं अनुभवलंय आणि हे मी फक्त आज नाही माझ्या पार टीनएजपासुनच्या अनुभवातून म्हणतेय... यात एकतर्फी निखळ प्रेम ते प्रेमाला बसलेले व्यवहाराचे चटके या सगळ्याला हे लागू पडतं. सोबत आणि स्वीकार या दोन्हीकडून मी डील करायला शिकले. अजुनही शिकते आहे. तसंही प्रेमाला व्यवहाराचं, समाजाच्या so called hypocritic बंधनाचं लॉजिक कळत नाही आणि प्रेम करताना फार लॉजिक लावू ही नये. कारण प्रेम करणं ही एकाचवेळी अत्यंत वैयक्तिक आणि वैश्विक गोष्ट आहे. कारण पुर्ण जगात बरंच काही भलंबुरं घडत असताना त्या दोघांच्याच आयुष्यात एक छोटीशीच पण खुप पॉझिटिव्ह गोष्ट होत असते. अशी भावना जी व्यावहारिक पातळीवर ruthlessly competitive आयुष्यात जगायला अर्थ देते.

मी अगदी सुरूवातीला लिहिलंय तसं हे कथानक साधं चार ओळीत संपेल आणि अपेक्षित शेवट असणारं आहे. तरीही हि प्रेमकथा एकाचवेळेस श्वास कोंदुन टाकणारी आहे आणि प्रवाही आहे. असं निखळ, निस्वार्थी प्रेम कि ज्याला कोणत्याही सामाजिक संकेतांचे ओझे नाही की आवश्यकता नाही. प्रेम पूर्णत्वाने न मिळण्याचं दुःख नाही. आणि तरीही वर्तमानात जगत असलेला क्षण उत्कट आहे. जन्म मृत्यूच्या पलिकडचा हा प्रवास आहे.
सिनेमात अनेक रुपकं आहेत, काही कातर, काही अस्फुट काही अबोध क्षण आहेत जे खऱ्या आयुष्यातही असतात असे क्षण फक्त स्पर्श आणि श्वास यांनी भरून काढता येतात. 
You liberate me ...हे फार अर्थपुर्ण गाणं आहे. ज्यांना समुद्र किनाऱ्यावर बसून रहायला आवडतं, शांतता आवडते त्यांना अमलताश आवडेल.

06 March, 2024

अनय

नक्षत्रांच्या गावातून उतरली होतीस तू त्याच्या घरात;
मेघश्याम आभाळाची ओढ तुझ्या रक्तातच होती
हे समजलं होतं त्याला, अगदी पहिल्यापासून,
तुझ्या बाईपणाची जात विजेची, शेजेला घेता न येणारी
ओळखून होता तो आतून, आतून, खोल मनातून
तुझ्या झिळमिळ स्वप्नांच्या मोरपिसांना
त्याने कधी देऊ पाहिले नाहीत आपले डोळे,
आणि नाही गढूळ केले कधी तुझ्या देहात हिंदकळणारे
धुंदमदिर निळे तळे.

त्याच्या मृण्मय आयुष्यात उमटली होती
अमराचा अळता लावलेली तुझी पावले
घरात तुझ्या असण्याचा अविनाशी गंध होता;
काठोकाठ भरून होता तो नुसत्या तुझ्या आसपास वावरण्याने;
तुझ्याशी खोलवर कृतज्ञ होता
पाहिलं त्यानं तुला उंच बेभान उसळताना;
रात्रीच्या रसज्ञ काळ्या अंधारात मिसळताना;
मधुर विषाचे घोट खुळ्या ओठांनी आकंठ घेताना;
पिसावताना, रसावताना,
अस्तित्वाचा कण न्‌ कण
प्रेमाच्या चेहऱ्यावर उत्कट उधळून देताना.

कळली त्याला तहान तुझ्या तृप्तीला लागलेली अतृप्तीची;
दु:खाचं नख लागलेल्या काळजाची तडफड कळली शर्थीची;
कळली कशी असते प्रेमात स्त्री भरतीची आणि सरतीची.
तू हरलीस हे त्याला कळलं, पण निरर्थाच्या वाटेवर
हरवली नाहीस, स्वत्व सांभाळून उरलीस तशीच, हेही कळलं
त्यानं पुढे होऊन तुझ्या पापणीवरचा शोक टिपला,
त्या क्षणी, राधे तुला तुझा पुरुष भेटला.
पुरुष-जो क्षमा करून नाही ऋणी करत;
पाठ फिरवून नाही उणी करत;
घेतो समजून, सावरतो, आवरतो, उराशी धरतो;
आपल्या नसलेल्या स्वप्नांसाठीही आपल्या काळजाचं घर करतो.
राधे, पुरुष असाही असतो.

30 December, 2023

Three of us

#movietime 
#moviereview 
#threeofus 
गेल्या काही वर्षांत थिएटरमध्ये जाऊन सिनेमा पाहणं खुप कमी झालंय. तरीही मला एकदा कायझालं, सॅमबहादुर, three of us हे असले सिनेमे बघायचे होते. जमलंच नाही. असो. नेटफ्लिक्स वर three of us आल्याचं समजलं. लगेच पाहिला. रिव्ह्यू वाचले नव्हते मुद्दामहून. 

जे करण जोहर, चोप्रा ॲन्ड कंपनी, रोहित शेट्टी ॲन्ड कंपनीचे फॅन्स आहेत त्यांनी हा सिनेमा बघुच नका. 

शैलजा आणि दीपांकर देसाई हे मध्यमवयीन जोडपं. आणि सारीका आणि प्रदीप कामत हे दुसरं जोडपं. या चौघांचेही एकमेकांत असलेले तरल.... उत्कट.... प्रगल्भ .... आणि आणि ... मऊ मऊ उबदार गोधडीसारखं नातेसंबंध ! बास हे इतकंच साधं सोपं आयुष्य होतं... आहे ... असेल यावर विश्वास ठेवायला भाग पडणारा हा सिनेमा. 

शैलजाला विस्मरणाचा आजार जडला आहे. ती अचानक दीपांकरला वेंगुर्ल्याला जाऊया, म्हणून विनवते आणि आठवडाभरासाठी ते जातात. तिथे शैलजाची भेट तिच्या बालमित्राशी - प्रदीप कामतशी होते. जुन्या आठवणींना उजाळा मिळतो आणि गतकाळातल्या काही जखमांवरची खपली पुन्हा निघते. उद्गम कविता आणि त्या कवितेचा अर्थ जागोजागी सापडणं हा सिनेमा आहे.

अविनाश अरुण यांचा कॅमेरा चौघांच्या नातेसंबंधांची विचित्र, तरीही अलवार, सुंदर गुंफण टिपत राहतो.
काही संवादातून नात्यात गरजेचा असणारा प्रगल्भपणा दिसतो. 
सारीका मिश्किल पणे प्रदीपला म्हणते, "कवी महोदय, इतक्या वर्षात माझ्यावर कविता लिहावी सुचलं नाही. आज बालपणीचं प्रेम दिसलं तर चार ओळी सुचल्या !" तिच्या या वाक्यावर प्रदीप ज्या उत्कटतेने तिचा हात हातात घेतो, तिला बिलगतो ती कविता त्या क्षणात सारीकाच्या मनात रुजते. तिच्यासाठी नसूनही. ...
किंवा सारिका जेव्हा शैलजाला म्हणते, "अजीब तो लगा, पर अच्छा अजीब लगा" त्या क्षणात या चित्रपटाचा सगळा साधेपणा सामावला आहे. 

एक गंमत आता पोस्ट लिहिताना लक्षात आली. प्रदीप स्वत:ची कविता वाचून दाखवतो आहे आणि कवितेतलं काहीही न कळणारा दीपांकर त्याला 'आगे?' विचारतो. प्रत्यक्षात दीपांकरची भूमिका साकारणारा स्वानंद किरकिरे स्वत: एक उत्तम कवी आणि गीतकार. हा मुद्दाम जुळवून आणलेला गंमतीशीर योगायोग असेल कदाचित, पण आवडला.
एक प्रसंगात आकाशपाळण्यात शैलजा आणि प्रदिप थोडा वेळ वरती असतात तेव्हा त्यांच्यातला संवाद अद्भुत आहे. 
अजुन एका प्रसंगात दीपंकर प्रदीप बद्दल बोलताना म्हणतो की त्याला पुरूषांवर विश्वासच नाहीय. पण तो माझ्यावर विश्वास ठेवू पाहतोय कारण तुझा माझ्यावर विश्वास आहे. वा ! काय सुरेख संवाद आहेत हे.! हे इतकं मोजक्या शब्दांत बायकोबद्दलचं कौतुक कसं कोण मांडु शकेल?
अजुन एक, सहजच वाटेल पण बॉलिवूडच्या टिपिकल पुरूषप्रधान संस्कृतीला हादरे बसतील असा आहे. फिरुन आल्यावर दीपंकर शैलजाच्या केसांना तेल लावतोय आणि एकीकडे ते दोघं मुलाशी गप्पा मारतात. फोन बंद झाल्यावर अचानक शैलजा वळते आणि विचारते मी भरतलाच विसरले तर? दीपंकर काही न बोलता केसांवरच थोपटतो आणि शांतपणे पुन्हा तिच्या डोक्यावर तेल मुरवत राहतो. इन मिन पाच सात मिनिटांचा प्रसंग पण हे असं बायकोने नवर्‍याकडुन तेल लावून घेणं मराठी सिरीयल मध्ये होईल? आणि झालंच तर background ला एखादं दर्दभरं गाणं वाजेल किमान दोन एपिसोड तरी नक्कीच संपतील यात आणि कन्सेप्ट ची पुरी वाट लागेल. असो च ते एक. 

शेफाली छायाने शैलजा ची भूमिका फारच अप्रतिम साकारली आहे. She is class apart... तिच्या चेहऱ्यावर वरचे हावभाव, बोलके डोळे पाहणं म्हणजे भारी अनुभव ठरतो. जयदीप अहलावत हा माझा आवडता अभिनेता आहे. मी पहिल्यांदा त्याला गब्बर इज बॅक मध्ये पाहिला. छोटा रोल होता. पण लक्षात राहिला. नंतर गँग ऑफ वासेपुर मध्ये... मग आवडतच गेला. He is versatile. Good underplay acting ! स्वानंद किरकरे चा किंचित काही काळ जेलस होऊन स्वतःच दुखावलेला नवरा आणि शैलजासोबत नव्याने नातं घट्ट झाल्यावर समंजस नवरा छान आहे. 

आता गेल्या काही वर्षांत अचानक कुठेतरी हरवल्यासारखं वाटू लागलं होतं, ते आज कितीतरी दिवसांनी पुन्हा अनुभवायला मिळालं. मन तृप्त झालं, शांत झालं, कुणाच्यातरी मांडीवर डोकं असावं आणि त्या व्यक्तीचा प्रेमळ स्पर्श आपल्याला काहीच सुचवत नाहीय, ती वासना नाही, सहानुभूती नाही काहीच नाही... फक्त कपाळावर, चेहर्‍यावर फिरणारे त्याचे हात आपल्या आत त्याचं प्रेम झिरपवत नेतात, मुरवत नेतात, मनाच्या दुखऱ्या अवघड जागेवर खपली धरु पाहतेय असं काहीतरी अनुभवायला मिळालं.

19 December, 2022

मौनमुद्रा

मी देसाईंची श्रीमानयोगी तर असंख्य वेळा वाचली आहे. आतु बाबा तर चिडवायचे देखील... आमच्या बाईंनी पोथी लावलीय. बायका देवाच्या पोथी लावतात आमची मृणाल तशी ही श्रीमान योगीची पोथी लावते. पण इतकं असलं तरी मी कथा-कांदबऱ्यात मनाने इतकी घुसत नाही. पण तसं माझं कवितेच्या बाबतीत होत नाही. 

कविता मात्र माझ्या मनात रेंगाळत राहतात... खुप दिवस, महिने, वर्ष देखील... म्हणूनच मी कविता सहसा वाचायलाच जात नाही. 

मोबाईल डिक्लटरींग करताना हा फोटो सापडला. आवडलेल्या कवितांचं फोटो मध्ये कोलाज करणं हा ही एक माझा आवडता प्रकार होता... आजही आहे.
हि कविता पहिल्यांदाच वाचली तेव्हा कॉलेजमध्ये होते. तेव्हा वाटलं हि कविता ब्रेकअप झाल्यानंतरची आहे 🙄 आज लक्षात येतं हि प्रत्येक लग्न झालेल्या, न झालेल्या प्रत्येकीची गोष्ट आहे. 🙂

"दिवसाच्या चोवीस मात्रा संसाराच्या दहा फुटी खोलीत चपखल बसवणारी विंदाच्या नजरेतली प्रसन्न स्त्री " (झपताल) आणि " प्रचंड कल्लोळ प्राणांत सावरून, ओठांवरची मौनमुद्रा उकलून मोजकं बोलणारी शांताबाई यांच्या नजरेतली ती रुक्ष स्त्री" (मौनमुद्रा) हि दोन्ही तिचीच तर रुपं.... पण एका लेखकानं लिहिलेली कविता आणि लेखिकेनं केलेली कविता याच्यातला मुलभूत फरक तो हाच असेल का?


04 December, 2022

माणसं

पंधरावीस नातेवाईकांच्या गर्दीत 
आपल्या माणसाकडे हळूच पाहणारी माणसं...

आसपासचं जग विसरून
एकमेकांत गुरफटलेली माणसं...

तरूणांच्या उत्साहासोबत
थकली भागली पावलं खेचणारी माणसं...

चुकूनमाकून मिळालेला घराबाहेरचा उजेड
नजरेत भरून घेणारी बुरख्याआडची माणसं....

वारंवार लिपस्टीक/ भांगेचा सिंदुर 
निरखणारी घुंगटाआडची माणसं... 

झाडां-फुलांची नावं लिहीणारी
शोधक नजरेची माणसं... 

पिंजऱ्यातले प्राणी बघताना 
आकाशातले पक्षी उत्सुकतेने पाहणारी माणसं...

जिथे ऐसपैस जागा दिसेल तिथे
खाऊच्या पुड्या उघडणारी माणसं... 

पोराबाळांचा उदंड उत्साह बघून
उद्याच्या काळज्या विसरलेली माणसं...

प्रत्येक वळणावर सेल्फी घ्यायला
उभी राहिलेली माणसं...

लेकीसाठी एक फॅन्टा विकत घेताना
चारचारदा खिसा चाचपणारी माणसं...



...

हि सारीजणं
भविष्यात येऊ घातलेल्या 
धर्म-शीतयुद्धात करपवलेली स्वप्नं घेऊन
कुठे जातील?

काय करतील?

...
...
...
न जाणो
कोणी काय सांगावं
...

हि माणसं एक होतील आणि
पाय रोवून उभी राहतील
माणुसकी आणि अहिंसेच्या कातळावर !