11 March, 2015

मुंबई- कलकत्ता दुरान्तो आणि तिथुन पुढे ‘पदातिक’...


(संपुर्ण प्रवास २९/०४/१२ ते १४/०५/१२ असा १६ दिवसांचा होता. मिळेल त्या कागदांवर लिहुन जपुन ठेवलेल्या नोट्सवरुन आठवेल तसं ब्लॉगसाठी लिहायचा प्रयत्न केलेला आहे.)

मुंबई- कलकत्ता दुरान्तो आणि तिथुन पुढे पदातिकचा प्रवास. गाड्या बदलण्याची सवय आहेच आणि त्या हलत्या गाड्यांमध्ये झोपण्याचीही सवय आहे. पण ह्या वेळेस मात्र दुरांतोने प्रवास करणं माझ्यासाठी कठीण होउन बसलं होतं. रात्री सलग झोप लागली नाही. अर्धवट झोपेत अर्धवट जागेपणी मला नुकत्याच झालेल्या जपानमधील भुंकपाच्या बातम्या आठवत होत्या. माझा एक मित्र त्याच वेळेस तिथे होता. भारतात परतल्यावर तो म्हणाला होता... तुमच्या पायाखालची जमीन हलत नाहीय, तुम्ही एका स्थिर जमिनीवर उभे आहात याची जाणीव खुप दिलासा देणारी असते. खरंय त्याचं! आपण जत्रेत/ एस्सेलवर्ल्डमध्ये चक्रात बसतो, किती वेळ 15-20 मिनिटं! या गाडीला टेक्निकल हॉल्ट्स आहेतच. पण बाकी सगळा वेळ नावेत बसल्यासारखं डुलायचं. पण त्याला देखील लय नव्हती... मध्येच जोरात मध्येच सावकाश... छ्या... काय फालतु गाडी आहे... पण हे सगळं कधी थांबणार हे पक्कं माहिती आहे. इथे जिवाची शाश्वती आहे... तिथे तीदेखील नव्हती. तिथुन जिवंत बाहेर पडायला मिळेल याची त्याला स्वत:लाच खात्री नव्हती... अशाच उलट सुलट विचारात झोप लागली.
      घरात कधी करेन का पण इथे मात्र सकाळी ९.३०लाच नाष्टा झाला. आता सारखं हलत राहुन कंटाळा यायला लागलाय. गाडीतुन उतरलं की गरगरायला लागेल... बाहेर सगळं कोरडं, रखरखीत. लांबवर पसरलेली सुकी शेतं, धुळीने माखलेली बांधाकडेची झाडं-झुडुपं, दागोरी-बेल्हा सारखी छोटी गावं, मध्येच नदीवरचे लांबलचक पुल, कमी झालेल्या-आटत गेलेल्या नदीपात्रात बसलेले कुत्रे, गायी-म्हशी सगळं एका खिडकीपलीकडे फास्ट-फॉरवर्ड होत होतं. उन्हाळाच जणु एका खिडकीपलीकडे येऊन थांबला होता... मी गाडीत बसुन झोपाळल्या डोळ्यांनी पहात होते... पण झोप मात्र लागत नव्हती.

      संध्याकाळी पावणेआठला दुरान्तो मधुन उतरलो आणि रात्री उशिरा पदातिकमध्ये बसलो. कायम दिल्ली, कलकत्ता वगैरे तिथुन पुढे जाणार्‍या ट्रेन्समधलं बेडिंग छान आणि अतिशय स्वच्छ कसं असतं हे मला ना उलगडणारं कोडं आहे. यावेळेस देखील पदातिकमधलं बेडिंग कोरं-करकरीत असावं इतकं स्वच्छ होतं. आणि मुख्य म्हणजे ट्रेन साधारण जितकी हलते तितकीच आणि एका लयीत धावत होती. दोन दिवसांची गाढ झोप लागली.


कविता -२

03 March, 2015

कविता - १

पहिली कविता माझी नाही...दुसरी कविता पहिल्या कवितेचं उत्तर !!! (दुसरी कविता मात्र माझी)

26 August, 2012

आपण परत मागे का जातोय?


आज टिव्हीवरती काकस्पर्शपाहिला... झी टॉकिजचा गाजलेला (की गाजवलेला???) चित्रपट. ज्या लोकांनी जुनं कोकण पाहिलेलं नाही, कथा-कादंबर्‍यांतुन वाचलेलं नाही त्यांच्यासाठी छान छान चित्रीकरण आहे. बाकी आजकाल कोकणाततरी बायका कुठे नऊवारी नेसुन कामं करतात म्हणा. असो. मुद्दा तो नाही. कथा अतार्किक होतीच. कथेचा शेवटही तसाच असणार हे लक्षात आलेलं होतंच... पण तरीही तो अपेक्षेबाहेर अतार्किक झाला. अखेरीस कथेचा नायक हरी म्हणतो... ‘मी कायम तिच्याशी वाईट वागलो. पण तिने माझ्या प्रेमाखातर मी महादेवाला दिलेला शब्द मोडु नये म्हणुन आधीच प्राण सोडला.

कथेचा शेवट असाही होऊ शकतो, ‘महादेव मरतो तेव्हा पिंडाला कावळा शिवला नाही कारण महादेवाचा जीव उमेत अडकला होता... आणि आपल्या भावाने शब्द दिलेला असताना देखील महादेवाचा (म्हणजे त्याच्या आत्म्याचा !!) त्या शब्दावर विश्वास नव्हता. म्हणुनच आपला भाऊ आपल्याला दिलेला शब्द मोडतोय हे समजल्यावर महादेवाच्या आत्म्यानेच उमेला स्वर्गात बोलावुन घेतलं...’ नाहीतरी उमेला काय वाटतंय किंबहुना स्त्रियांना काय वाटतं याला त्या काळी कुठे किंमत होती? मग महादेवाचा आत्मा देखील तसाच विचार करेल नं? मुळात कावळा पिंडाला शिवतो किंवा शिवत नाही याचाच दुसरा अर्थ आत्म्याला विचार करता येतो, त्याला भावना असतात असाही असु शकतो, नव्हे होता आणि आजही आहेच....

आजच्या विज्ञानवादी जगात या अशा आलवणातल्या बायका दाखवण्यामागे, इतर जुन्या रुढी, परंपरा दाखवण्यामागे आणि गाजवण्यामागे (विशेषत: ब्राह्मणांच्या ) नक्की काय अर्थ आहे... या अशा रुढी, परंपरा पाळल्या किंवा मालिका, सिनेमां मधुन गाजवल्या की मगच आपण खरे हिंदुत्ववादी ठरतो का? हिंदुत्वाचा हाच खरा अर्थ आहे का?
हातभर बांगड्या घातल्या, सासु- सुना एकत्र घरात राहिल्या म्हणजेच प्रेम वाढतं हा संदेश मालिकांमधुन का दाखवला जातोय? आज मुंबई मध्ये टीचभर जागेत कोंबुन राहण्यापेक्षा एकाच बिल्डींगमध्ये, एकाच गल्लीत किंवा एकाच गावात दोन वेगवेगळ्या घरांत राहणार्‍या कुंटुबात प्रेम असुच शकत नाही का? काळजी घेतली जाऊच शकत नाही का? ज्यांना शक्य असेल तरी जरूर राहावं पण 300-400 स्क्वे.फुटच्या जागेमध्ये एकत्र राहण्यात काय मजा आहे? आज एकही मालिका किंवा सिनेमा किमान रक्तदानाचं महत्व सांगणारा नाहीय, नेत्रदान, त्वचादान, देहदान वगैरे लांबची गोष्ट आहे... असं का?

चिंता करण्यासारखी गोष्ट आहे!!!

02 August, 2012

वाढदिवस,
दिवाळी नसताना देखील आईकडुन शिकेकाईने धुऊन घेतलेले केस.

वाढदिवस,
आजीने केलेलं मायेचं औक्षण.

वाढदिवस,
मैत्रीणींबरोबर खाल्लेली भेळ.


वाढदिवस,
"अहों" नी आणलेल्या भेटीचं अप्रुप.

वाढदिवस,
"हॅप्पी बत्दे अज्जु" म्हणत गळ्यात पडलेले नाजुक हात.

वाढदिवस,
नचिकेताला भेटण्याची तीव्र होत जाणारी ओढ...

--
मृणाल भिडे.
2 ऑगस्ट 2011