15 June, 2024

सवाष्ण कादंबरी ( डॉ. क्षमा गोवर्धने-शेलार)

#सवाष्ण

आमच्या काळात अक्कल फुटायच्या वयात रुढार्थाने मुलांच्या हातात पु. ल. देशपांडे, रणजित देसाई वगैरे लेखक हातात दिले जायचे. मला व्यंकटेश माडगूळकर आवडायला लागले. नंतर तुंबाडचे खोत हाती लागलं. गोनीदांचे मृण्मयी वाचलं. या अशा पुस्तकांत वतनदार संस्कृती, ब्राह्मण दलित जातीची उतंरड, सुक्ष्म भेद हे केंद्रस्थानी होते. ठिकठिकाणच्या चालीरिती, परंपरा, बायकांची स्वयंपाकघरापुरती मर्यादित असलेली सत्ता, त्यांची खानदानी आदब, पुरूषांचा बाहेरख्यालीपणा त्यातुन बायकांची होणारी घुसमट बरेच कंगोरे उमगायला लागले. मृण्मयी पुस्तक नायिकाप्रधान आहे. पण गुढ, रहस्यमय नाही. मी वाचलेल्या काही नारायण धारप आणि रत्नाकर मतकरी यांच्या गुढकथा/कांदबरी आहेत पण पुरूषसत्ताक संस्कृतीला मध्यभागी ठेवून लिहिल्या गेल्या आहेत.

या पार्श्‍वभूमीवर मी नुकतीच वाचलेली #सवाष्ण कादंबरी वेगळी उठून दिसते. म्हटलं तर सरळ सोपी गोष्ट ... ज्यांचं कथा कादंबरी या प्रकारातले वाचन भरपूर आहे त्यांना हि कादंबरी पुढे काय वळणं घेत जाईल याचा अंदाज येऊच शकतो. सहज येऊ शकतो पण ...

पण... हि कथा आहे सर्वार्थाने समाधानी असणाऱ्या "बाजिंदा" ची... आणि तिने वासनांध "नाना"ला दिलेल्या शापाची... सोन्याने मढलेल्या, खानदानी आदब सांभाळून असणाऱ्या सवाष्णींचा घास घेणारा तो शाप ! भरलेले संसार उध्वस्त करणारा तो एक शाप ! 
" या वाड्यात हळद-कुंकवाचे करंडे आ वासून पडून राहतील... "
फक्त एकच प्रकरण तिच्यावर असलेले आणि तरीही तिचं प्रत्येक पानापानांतून जाणवत राहणारं मुक अस्तित्व हि या कादंबरीची खरी नायिका... 

ठिकठिकाणी शापवाणीवर तोडगा फिरत असणाऱ्या दुर्गाआजीला ऐकुन घ्यावं लागलं, "जे पेरलंय तेच उगवणार दुर्गाबाई !!" हि दुसरी नायिका ! नानाची बायको हिरा शापवाणीने जाते पण त्यावर विश्वास न ठेवणारी मध्यमवयीन दुर्गा म्हातारपणी मात्र विजुच्या बायकोला - लताला मात्र कुलदेवीचं अष्टक अखंडित म्हणत शापापासुन जपत राहते... तेव्हा वाड्याचे संस्कार तिच्यात उतरल्याची जाणीव होते.

या सगळ्यात समांतरपणे सुरू होणारी आणि वाड्याच्या भागधेयाशी येऊन थांबणारी विजु-लताची प्रेमकथा. अवखळ लताचं परिपक्व विचारांत रुपांतर होणं याची ही गोष्ट. आपल्या विजुचे प्राण वाचावेत यासाठी तिने केलेले जगावेगळे अग्निदिव्य... हा खरा क्लायमॅक्स !!
हि लता तिसरी नायिका...

तर्क, मानवी विचार, मानसिक परावलंबत्व, अधोगती, अंधश्रद्धा, परंपरा, रितीरिवाज या सर्वाचा परस्परसंबंध दाखवत शेवटपर्यंत खिळवून ठेवणारी, वेगवान गावाकडची सुंदर गाणी असणारी ही कादंबरी जरूर वाचावी अशी आहे. 
- मृणाल भिडे (१५ जुन २०२४)